राज्यातील हायव्होल्टेज लढती कोण जिंकलं??

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । २०१९ च्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आता जवळपास हाती आले आहेत. निकालानंतर अनेक प्रस्थापितांचं दिवाळ निघाल्याचं पहायला मिळालं आहे. वृत्तवाहिन्यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार महायुतीचं सरकार पुन्हा स्थापन होईल हे खरं ठरलं असलं तरी शिवसेना आता काय विचार करणार याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे. शरद पवार या व्यक्तिने ही निवडणूक फिरवली असाच या निकालांचा अर्थ लावण्यात येत आहे.

कर्जत-जामखेडमध्ये भाजपचे महत्त्वाचे नेते राम शिंदे यांना खिंडीत पकडण्याचं धोरण राबवत शरद पवारांचे नातू रोहित पवार यांनी २ वर्ष आधीच तयारी करत हा मतदारसंघ पिंजून काढला. विद्यमान आमदारांनी न केलेली कामं त्यांनी लोकांमध्ये मिसळून करून देण्याचा सपाटा लावला. राम शिंदेंनीही मुख्यमंत्री, पंतप्रधान यांना सोबत घेत आपला गड वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला परंतु लोकांच्या नाराजीचा फटका त्यांना बसला आणि ते पराभवाच्या खाईत लोटले गेले.

परळी मतदारसंघात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन भावा-बहिणींच्यात झालेल्या लढतीत धनंजय मुंडे यांनी बाजी मारली आहे. जवळपास २० हजार पेक्षा जास्त मताधिक्य घेत पंकजा मुंडेंना त्यांनी धोबीपछाड दिला आहे. प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात केलेल्या भावनिक राजकारणाचा पंकजा मुंडेंना फटका बसल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोल्हापूर दक्षिणमध्ये आमचं ठरलंय हे लोकप्रिय वाक्य उच्चारत सतेज पाटील यांनी लोकसभा निवडणुकीपासून वातावरणात रंग भरायला सुरुवात केली. मित्रपक्षाचा उमेदवार जड झाला की त्याला पाडायचं अशीच भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली. यावेळी कोल्हापूर दक्षिणमधून अमल महाडिक यांच्यापुढे सतेज पाटलांचा पुतण्या ऋतुराज पाटील यांनी तगडं आव्हान उभं केलं आणि कोल्हापुरात महापुरानंतर आलेल्या सरकारविरोधी नाराजीचा फायदा काँग्रेस पक्षाने उठवला. ऋतुराज पाटील हे मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

कोथरुडमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकांमधून निवडून या असा सल्ला दिला आणि चंद्रकांत पाटलांनी त्याची अंमलबजावणी केली. किशोर शिंदे या मनसेच्या उमेदवाराला इतर सर्व विरोधी पक्षांनी सहकार्य केलं. स्थानिक विरुद्ध बाहेरचा असं स्वरूपही या लढतीला देण्यात आलं. आता मजबूत पक्षसंघटन जिंकणार की विरोधकांची एकी हे अद्यापही स्पष्ट झालं नसलं तरी अंतिम फेरीअखेर चंद्रकांत पाटील थोडक्या मताधिक्याने निवडून येतील असा अंदाज आहे.

कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाडण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. अतुल भोसलेंनी संस्थात्मक बळाचा, राज्यस्तरीय आणि केंद्रीय यंत्रणेचा फायदा घेत सर्व ताकद पणाला लावली आहे. पृथ्वीराज चव्हाणांच्या आधी ३५ वर्ष कराड दक्षिणवर राज्य केलेल्या विलासकाका उंडाळकर यांनी आपल्या मुलाला विजयी करण्यासाठी जंगजंग पछाडले आहे. तिन्ही उमेदवारांकडे हक्काची ५० हजार मते आहेतच, जिंकून येण्यासाठी आवश्यक असलेली ज्यादा मते घेण्याकडे पृथ्वीराज चव्हाण यांनी आगेकूच केली आहे. पहिल्या फेरीपासून ३ हजारांचं लीड टिकवण्यात पृथ्वीराज चव्हाण यशस्वी ठरले आहेत.

कणकवलीमध्ये सेना-भाजप युती झाली तरी नारायण राणेंवर आपला पूर्वीपासूनचा राग धरून असलेल्या शिवसेनेने सतिश सावंत यांना नितेश राणेंविरुद्ध उभं करून वेगळी खेळी खेळली मात्र नितेश राणे यांनी विरोधकांना निष्प्रभ करत याठिकाणी विजय मिळवला.

माण-खटावमध्ये मागील १० वर्ष कोणताही विरोधक समोर असला तरी त्याला न जुमानणाऱ्या जयकुमार गोरे यांना यंदाच्या निवडणुकीत तगडे आव्हान मिळालं असतानाही शेखर गोरेंचा वापर करून घेत सत्तेचा चेंडू आपल्याकडे ठेवण्यात जयकुमार गोरे यंदाही यशस्वी झाले आहेत. प्रभाकर देशमुखांनी या ठिकाणी चांगली लढत दिली मात्र विजयासाठी आवश्यक मते मिळवण्यात ते कमी पडले.

Leave a Comment