हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या राजकीय वर्तुळात अनेक घडामोडी घडत आहेत. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या दोघांना देखील काँग्रेसचे नेते नाना पटोले (Nana Patole) यांनी काँग्रेसमध्ये येण्याची खुली ऑफर दिली आहे. ज्यावरून राजकीय वर्तुळात मोठ्या चर्चा सुरू झाल्या आहेत. नाना पटोले यांच्या याच वक्तव्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदेंच्या भगव्या रंगाशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांचा भाजपशी संबंध आहे. एकनाथ शिंदेंचा भगवाशी काही संबंध नाही. भाजपच्या ताटाखालचे मांजर झाली आहे. त्यांच्या हाती भाजपचा झेंडा आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या हातात भाजपचा झेंडा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा आहे. तो उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे”
पृथ्वीराज चव्हाणांना विचारा…
त्याचबरोबर, “एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेसमध्ये जाणार होते. पृथ्वीराज चव्हाणांना विचारा…अहमद पटेल आता नाहीत. पण एकनाथ शिंदेंची दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा झाली होती. हे सर्वात जास्त मला माहिती आहे,”असा खळबळजनक दावा देखील संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.
दरम्यान, “महायुतीचं सरकार ढोंगी आणि दुतोंडी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर,आत्महत्येवर तोंड उघडत नाही. बुलढाण्यातील कैलास या शेतकऱ्याला कृषी क्षेत्रातील पुरस्कार मिळाला मिळाला होता. कृषी मंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून त्यांनी आत्महत्या केली आहे. फक्त कैलासची आत्महत्या नाही तर सर्व शेतकऱ्याची ही आत्महत्या आहे. सरकार काहीच करत नाही. हे सरकार खोक्या बोक्याच्या मागे लागले आहे पण शेतकऱ्यांचे प्रश्न कधी सोडवणार?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.