पायी वारी करणाऱ्यांना मिळणार पेन्शन!! राज्य सरकारचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंढरपूरची आषाढी एकादशी २ दिवसांवर आली असतानाच राज्यातील शिंदे सरकारने वारकऱ्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे. पायी वारी करणाऱ्यांना वारकऱ्यांना सरकार पेन्शन देणार आहे. राज्य शासनाने कीर्तनकार व वारकऱ्यांच्या सोयी- सुविधेकरता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळावर कार्यरत किंवा सेवानिवृत्त भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येईल. पंढरपूर येथे या महामंडळाचे मुख्यालय असणार असून या माध्यमातून परंपरेने महिन्याची पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांना त्यांच्या वृद्धपकाळात पेन्शन देण्यात येणार आहे.

दरवर्षी महाराष्ट्रातील गावागावातून भाविक वारकरी वारीला जातात. या वारीमध्ये प्रामुख्याने कामकरी, कष्टकरी, शेतकरी यांचा समावेश असतो. मात्र दिवसेंदिवस दिंड्यांची संख्या वाढतच चालली असून या पार्श्वभूमीवर वारीच्या व्यवस्थापनाचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले आहे. यासाठी 11 जुलै 2024 रोजी झालेला बैठकीत “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तीर्थक्षेत्रांचा विकास, कीर्तनकार, वारकऱ्यांना अन्न, सुरक्षा, वैद्यकीय मदत, विमाकवच, पायाभूत सुविधा इत्यादी सोयी-सुविधा पुरवण्याकरिता व कल्याणकारी योजना राबवण्याकरिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” कार्य करणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने वारकरी संप्रदायाच्या अडीअडचणी प्रश्न सोडवणे, सर्व पालखी सोहळा मार्गाची सुधारणा करणे, वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्य करिता अनुदान देणे या गोष्टींचा समावेश आहे.

काय आहेत महामंडळाच्या योजना

आषाढी व कार्तिकी वारीसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सुरक्षा, विमा संरक्षण कवच.
कीर्तनकारांना आरोग्य विमा, मानधन सन्मान योजना.
सर्व पालखी मार्गांची सुधारणा, स्वच्छता, आरोग्य, निवारा व सुविधा यासाठी दरवर्षी आर्थिक तरतूद करून नियोजन.
वारकरी भजनी मंडळाला भजन व कीर्तन साहित्यासाठी (टाळ, मृदंग, वीणा आदी) अनुदान.
पंढरपूर, देहू, आळंदी, मुक्ताईनगर, सासवड, पिंपळनेर, त्र्यंबकेश्वर, पैठण, कोल्हापूर संस्थान, शेगाव, तारकेश्वर, भगवानगड, अगस्तऋषी, संत सावतामाळी समाज मंदिर, अरण (ता. माढा, जि. सोलापूर) व इतर तीर्थक्षेत्रांचा विकास.
चंद्रभागा, इंद्रायणी, गोदावरी व इतर नद्या प्रदूषणमुक्त करण्याबाबतची कार्यवाही.