‘सारथी’ला मिळाली संजीवनी; ठाकरे सरकारकडून संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । ‘सारथी’ संस्थेसंदर्भात ठाकरे सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सारथी संस्थेला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्यात आली आहे. मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सारथी संस्थेची स्वायत्तता काढून घेण्यात आली होती. त्यामुळे मराठा समाजातून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. मराठा क्रांती मोर्चानं आंदोलनाचा इशाराही दिला होता. यानंतर आता ठाकरे सरकारनं ‘सारथी’ला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचं मराठा समाजानं स्वागत केलं आहे.

‘सारथी’ संस्थेला स्वायत्तता बहाल केल्यामुळे मराठा समाजासाठीच्या योजनांवर निधी खर्च करण्याची मोकळीक मिळणार आहे. तसेच कर्मचारी भरतीही करता येणार आहे. ‘सारथी’ची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर संस्थेच्या कारभारावर सरकारी अधिकाऱ्यांचं नियंत्रण आल्यानं मर्यादा आल्या होत्या. निधीची उपलब्धता, निधीचा विनियोग यासह कर्मचारी भरती, कल्याणकारी योजना अडचणीत आल्या होत्या, असा आरोप मराठा क्रांती मोर्चा तसेच खासदार संभाजीराजे यांनी केला होता.

सारथीला पुन्हा स्वायत्तता बहाल करण्याच्या मागणीसाठी वर्षभर आंदोलनं झाली. अखेर ९ ऑक्टोबर रोजी याबाबतचा आदेश पारित झाला. आता ‘सारथी’ला स्वायता बहाल करण्यात आली आहे. दरम्यान, सारथी बंद होणार नाही असे सांगताना ८ कोटींचा निधी देणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घोषणा केली होती. तर सारथी संस्थेला १ हजार कोटींचा निधी द्या, अशी मागणी संभाजीराजे यांनी केली होती. मराठा समाजातील मुलांच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी सारथी संस्था सुरू करण्यात आली होती. मात्र मागील काही दिवसांपासून ही संस्था विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, स्वायत्ता आणि गैरव्यवहारावरुन अधिक चर्चेत आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”

Leave a Comment