हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय क्रिकेटचे २ अनमोल रत्न विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) हे आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट आणि T २० मधून निवृत्त झाले आहेत. दोन्ही क्रिकेटपटू आता फक्त एकदिवसीय क्रिकेट खेळताना दिसतील. २०२७ ला होणारी विश्वचषक स्पर्धेवर विराट आणि रोहितचे लक्ष्य आहे. मात्र ज्याप्रकारे विराट कोहली आणि रोहित शर्माने कसोटी क्रिकेट मधून तडकाफडकी निवृत्ती जाहीर केली ते बघता हे दोन्ही खेळाडू खरंच एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेपर्यंत खेळतील का? हा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना सतावत आहे. त्यातच कोहली आणि रोहितच्या वर्ल्डकप संघातील समावेशाबाबत टीम इंडियाचे मुख्य कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) यांनी मोठं विधान केलं आहे.
काय म्हणाला गौतम गंभीर?
एका चर्चेदरम्यान, गौतम गंभीर म्हणाला, विश्वचषक २०२७ च्या आधी टी-२० विश्वचषक आहे. ही स्पर्धा फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घरच्या मैदानावर खेळवली जाईल त्यामुळे ती एक मोठी गोष्ट आहे. सध्या आमचे संपूर्ण लक्ष टी-२० विश्वचषक २०२६ वर आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आपण २०२७ च्या विश्वचषकाबद्दल विचार करू. भविष्यातील स्पर्धांसाठी खेळाडूंचा विचार करताना अनुभव आणि सध्याचा फॉर्म विचारात घेतला जाईल असं गंभीरने म्हंटल, मात्र हे सांगताना कोणत्याही खेळाडूचे वय त्याच्या करिअरच्या आड येत नाही असं म्हणायलाही गंभीर विसरला नाही. जर तुम्ही चांगले रिजल्ट देत असाल तर तुमच्या वयाचा काहीही फरक पडत नाही. फॉर्म आणि फिटनेस हे नेहमीच सर्वात महत्त्वाचे निकष असतील असं गौतम गंभीरने स्पष्ट केलं. म्हणजेच काय तर, रोहित आणि विराट 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकात सहभागी होतील की नाही हे त्यांच्या कामगिरीवर अवलंबून असेल.
वनडे कॅप्टन्सीही गमावणार रोहित शर्मा ?
सर्व फॉरमॅटसाठी एकाच खेळाडूला कर्णधार बनवणे चांगले की आपल्याकडे वेगवेगळे संघ आणि 3 वेगवेगळे कर्णधार असावेत, असा सवाल मुलाखतीदरम्यान गंभीरला विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना गंभीरने 3 ऐवजी 2 कर्णधार सुचवले. पण कसोटी संघाच्या कर्णधारपदाची घोषणा झाल्यानंतर, टीम इंडियाकडे वेगवेगळ्या फॉरमॅटमध्ये 3 कर्णधार असतील. जर गंभीर दुसऱ्या कर्णधाराला चांगला मानत असेल आणि या दिशेने काम करण्याचा विचार करत असेल तर याचा अर्थ असा होतो की रोहितला वनडेची कॅप्टनशीप तर सोडावी लागणार नाही ना? गंभीरच्या मनात नेमकं काय आहे तेच कळायला मार्ग नाही.