औरंगाबाद | शहराला यावर्षी पहिल्यांदा मंत्रिपद मिळाले आहे. केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मंत्रिमंडळ मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन संवाद साधला. मागासभागातील अपूर्ण राहिलेले प्रकल्प, रस्ते, मराठवाड्यातील आंतरराष्ट्रीय परिषद सभागृह आणि ऑरिक सिटीमध्ये मोठ्या औद्योगिक समूहाची गुंतवणूक व्हावी याला प्राधान्य देऊन काम करणार असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. पहिल्यामंडळ बैठकीत नवीन मंत्रांना खाते समजून घेण्यास सांगण्यात आले. यावेळी नारळ निर्यातीवरही चर्चा करण्यात आली.
रेल्वेतील पीट लाईन, विमानतळ धावपट्टीची लांबी वाढवणे, रेल्वे आणि औरंगाबाद औद्योगिक शहरात मोठी गुंतवणूक यासाठी आवश्यक ती सर्व कामे करण्यावर भर देण्यात येणार आहे. डीएमआयसी प्रकल्प गुंतवणूक वाढावी म्हणून संबंधित मंत्र्यांबरोबर बोलून तसे प्रस्ताव घ्यावे लागतील. अपूर्ण राहिलेल्या कामांना निधी मिळेल अशी आवश्यक तयारी करावी लागेल. निधी देण्यासाठी आवश्यक त्या मागण्या तयार करून घेणे आणि निधी देणे ही प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न करु असे डॉ. कराड म्हणाले.
निती आयोगाचे सदस्य अमिताभ कांत यांनीही गेल्या काही दिवसात डीएमआयसी प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर आंतरराष्ट्रीय परिषद सभागृह केले जाईल, असे सांगितले होते. आता डॉ. कराड वित्त राज्यमंत्री झाल्याने या प्रकल्पास गती मिळेल असे सांगण्यात येत आहे.