देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही; NEET प्रकरणावरून किरण मानेंनी सरकारचे वाभाडे काढले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मागील अनेक दिवसांपासून देशात वैद्यकीय प्रवेश परीक्षा म्हणजे नीटच्या परीक्षेवरुन सावळा गोंधळ सुरु आहे. आधी पेपरफुटी आणि त्यानंतर अचानक रद्द केलेली पीजी परीक्षा, यामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गातून मोठा संताप व्यक्त केला जातोय. त्यातच विरोधक सुद्धा सरकारवर टीकेची झोड उठवत आहेत. आता या वादात प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने यांनी उडी मारली आहे. किरण माने यांनी सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट शेअर करत सरकारचे वाभाडे काढलेत. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा असं म्हणत किरण माने यांनी संताप व्यक्त केलाय.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी –

केंद्रात कशीबशी सत्ता आली म्हणून कितीही टणाटणा उड्या मारूद्यात… या टग्यांना महाराष्ट्रात ठाकरे, पवारांची आणि देशात राहुल गांधींची जबरदस्त दहशत बसलेली आहे. इलेक्शन कमिशनपास्नं इव्हीएमपर्यन्त सगळे हाताशी घेऊनही जनतेनं लाथ घातल्यामुळे या हुकूमशहांचा माज ठेचला गेलाय. एरवी, मणिपूर धिंड आणि कुस्तीगीर महिला लैंगिक शोषणासारख्या गंभीर मुद्यांकडे माजोरडेपणानं डोळेझाक करणारे हे दगडाच्या काळजाचे लोक… NEET परीक्षेमधल्या घोटाळ्याला या कोडग्यांनी भिकसुद्धा घातली नसती. उडवुन लावलं असतं. पण केंद्रात कुबड्या घेऊन सत्तेत आलेत. न ऐकून सांगतायत कुणाला??

इकडे आदित्य ठाकरेंनी ‘ॲॅंटी पेपर लीक कायदा आणून सीईटी आयुक्तांवर कारवाई करावी’ असा इशारा देणारी दणदणीत प्रेस काॅन्फरन्स घेतली… तिकडे राहुल गांधींनीही असं रान पेटवलं… लगेच अनाजीपंतांपास्नं रंगाबिल्लापर्यंत सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकली !आदित्य ठाकरेंच्या आग्रही मागणीपुढे केंद्रसरकारला नाक घासावं लागलं. ‘ॲॅंटी पेपर लीक’ कायद्याला शेवटी मंजुरी द्यावीच लागली. आता पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षांची शिक्षा होऊ शकते. डायरेक्टर जनरल सुबोधकुमारलाही हाकलावं लागलं. राहुल गांधींनी केलेल्या गंभीर आरोपांपुढे झुकून युजीसी नेटची आणि NEET ची सीबीआय चौकशीही केली जाणार आहे. पण… एवढंच पुरेसं आहे का?

विद्यार्थ्यांचं आत्तापर्यंत झालेलं नुकसान कोण भरुन देणार??? या परीक्षा रद्द करून तरूण पोरापोरींच्या करीयरशी जीवघेणा खेळ खेळला जातोय. मागच्या दहा वर्षांत जवळजवळ पन्नास पेपर लीक झालेत. कितीतरी हुशार, प्रतिभावान पोरापोरींचे आयुष्य उद्धवस्त झालंय. काहींनी आत्महत्या केल्यात. काहींनी गुणवत्तेला मुरड घालून कमी दर्जाच्या नोकर्‍या स्विकारल्यात. याचा जाब सरकारला हडसून-खडसुन विचारायला हवा. या देशात शिक्षण व्यवस्थेचा पुर्णपणे सत्यानाश झालेला आहे. सत्ताधार्‍यांना ‘हिंदु-मुस्लीम, मराठा-ओबीसी, दलित-सवर्ण, मंदिर-मस्जीद’ यापलीकडे काहीही दिसत नाहीये. देश चालवणे म्हणजे फक्त मंदिर बांधणे नाही ! जमत नसेल तर सरळ राजीनामा देऊन हिमालयात ध्यान करायला जा. ‘काबिल’ माणूस बसवा खुर्चीवर.