मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? विशाळगड हिंसाचारावरून किरण मानेंचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात झालेल्या कारवाईवरून आता राजकारण तापलं आहे. विशाळगडावरील मशिदीत हिंसक जमावाकडून तोडफोड करण्यात आली होती. याशिवाय, विशाळगडाच्या परिसरातील गजापूर आणि मुस्लीमवाडी परिसरातील घरादारांचेही जमावाकडून नुकसान करण्यात आले होते. या हिंसाचारानंतर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, आपल्या बेधडक शैलीसाठी प्रसिद्ध असणारे मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी फेसबुक पोस्ट करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. शेंबडं पोरगंबी सांगेल की हे सगळं विधानसभा निवडणुक डोळ्यापुढं ठेवून चाललेलं आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? असा सवाल सुद्धा त्यांनी केला.

किरण माने यांची पोस्ट जशीच्या तशी

“ओ माने… विशाळगड अतिक्रमणावर लिहा की.” अशा कमेन्ट गेल्या पंधरा दिवसांत अनेक अनोळखी अकाऊंटवरनं यायला लागल्या. चेक केलं तर कुणी ओळखीचं नाही. सगळी प्रोफाईल लॉक. सहसा आयटी सेलच्या गटारातली घाण पसरवायला अशी डुक्करपिलावळ नेमलेली असते. बर्‍याचजणांच्या पोस्टवर मी अशा कमेन्ट बघितल्या. अतिक्रमण काय कालपरवाचं नाही. बर्‍याच वर्षांपासूनचं आहे. मग नेमकं आत्ताच का यावर असं रान पेटवलं जातंय??? मग मी यावर उत्तर द्यायचो की “ही अतिक्रमणं हटवणं हे सरकारचं काम आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री झोपलेयतय का? असले निष्क्रीय, भ्रष्टाचारी लोक सत्तेत बसवले की हेच होणार.” डुक्करपिलावळ गपगार व्हायची. जिथून आदेश आलेत त्या नाजुक जागेवरच रट्टा बसल्यावर काय बोलणार?

अहो, शेंबडं पोरगंबी सांगेल की हे सगळं विधानसभा निवडणुक डोळ्यापुढं ठेवून चाललेलं आहे. लोकसभेत महाराष्ट्रानं मुस्काडात दिलीय. आता विधानसभा पाहिजे असेल तर बाकी कुठला मुद्दाच हातात नाही. सगळ्या क्षेत्रात बोंबाबोंब. सगळे उद्योग गुजरातला गेलेत. बेरोजगारीचा कहर झालाय. पेपर फुटताहेत. रस्त्यांची दुर्दशा झालीय. शेतकरी आत्महत्या तिपटीने वाढल्यात. मग यांच्या हातात एकच मुद्दा रहातो – ‘हिंदु-मुस्लीम’ ! केवळ त्यासाठी हे अतिक्रमणाचे नाटक सुरू होते. बरं हे जे अतिक्रमण आहे, ते सगळ्या जातीधर्माच्या लोकांनी केलंय. विशाळगडाच्या पायथ्याला जे अतिक्रमण आहे ते वनविभागाच्या अखत्यारीत येतं. वर जे आहे, ते पुरातत्त्व खात्याच्या…

आता गंमत अशी आहे की परवा जी दंगल घडवून आणली गेली, ती या दोन्ही ठिकाणी झाली नाही ! ती झाली गजापूरला !! जे विशाळगडाच्या पायथ्यापासून तीन किलोमीटर दूर वसलेलं जुनं गांव आहे. अतिक्रमणाशी कसलाही संबंध नसलेल्या तिथल्या मुस्लीम समाजाला विनाकारण टारगेट करून प्रचंड प्रमाणात नासधूस करण्यात आली. याचाच अर्थ ही दंगल घडवणारे कुणी शिवभक्त नव्हते, कुणाच्या तरी आदेशावरून आलेले दंगलखोर होते. त्यांचा हेतू गडावरचे अतिक्रमण वगैरे नसून काहीतरी वेगळाच होता. असो. ही घटना जरी दुर्दैवी असली तरी आपल्यासाठी अभिमानाची एक गोष्ट आहे… ती म्हणजे एवढे होऊनही महाराष्ट्र शांत आहे. कुठेही हिंदु-मुस्लीम तेढ निर्माण झालेली नाही. कुठेही याचे हिंसक पडसाद नाहीत. पुन्हा एकदा सिद्ध झाले की हा शिव-शाहु-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. अहो, छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या हयातीत विशाळगडावरच्या दर्ग्याला हात लावला नाही. शिवरायांचे वडिल शहाजी महाराज आणि चुलते शरीफजी यांची नांवेच ‘शहाशरीफ’ या मुस्लीम सुफी संतांवरून ठेवलेली आहेत. शिवरायांच्या विचारांचा खरा वारसदार असलेला अस्सल मराठमोळा मावळा कधीच असल्या धर्मद्वेषाला बळी पडणार नाही !

विशाळगडावरील अतिक्रमणाबाबतीत महाराष्ट्र सरकारने त्वरित पावलं उचलावीत. कुठल्याही नागरिकाच्या जीवाची हानी न होता आणि कसलीही धार्मिक तेढ निर्माण न होता हे काम झाले पाहिजे. भावाबहिणींनो, सरकारच्या मनात असेल तर हे काम सहजसोपे आहे. आज महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिला सुरक्षा, रस्त्यांची दुरावस्था, टोलनाक्यांवरची लूट, स्पर्धा परीक्षांमध्ये होणारे घोटाळे, ड्रग्ज रॅकेट अशा अनेक भयानक गोष्टींचा विळखा महाराष्ट्राला पडलेला आहे. आपण त्यावरून लक्ष हटवायचे नाही. जय शिवराय… जय भीम ! अशी पोस्ट करत किरण माने यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.