औरंगाबाद : गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या ऑनलाईन उपस्थितीत औरंगाबादेतील म्हाडाच्या 864 घरांसाठी लॉटरी काढण्यात आली. या घरांसाठी एकूण 8 हजार 226 अर्ज दाखल झाले होते. म्हणजे एका घरामागे जवळपास 10 अर्ज करण्यात आले होते. यावरुन म्हाडावर लोकांचा विश्वास दिसत असल्याची प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिलीय. राज्य सरकारनं पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर या शहरात म्हाडाला जागा उपलब्ध करुन द्यावा. जेणेकरुन तिथे सर्वसामान्य नागरिकांसाठी घरं बांधता येतील अशी मागणीही यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सरकारकडे केलीय.
त्याचबरोबर, नव्या गृहनिर्माण धोरणात आम्ही मुंबईलगत ज्या बिल्डरांच्या जमिनी आहेत, त्यांच्यासोबत संयुक्त करार करुन म्हाडा घरं उपलब्ध करुन देणार असल्याचंही यावेळी आव्हाड यांनी सांगितलं. आव्हाड यांनी ऑनलाईन उपस्थिती लावत आज औरंगाबादेतील 864 घरांची लॉटरी काढली. त्यावेळी ते बोलत होते. औरंगाबाद मंडळातर्फे हिंगोली इथं प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 132, म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 48, पडेगाव-औरंगाबाद येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत 368 सदनिका व म्हाडा गृहनिर्माण योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 168 सदनिका व औरंगाबाद महानगरपालिका हद्दीतील 20 टक्के सर्व समावेश योजनेंतर्गत मध्यम उत्पन्न गटातील 148 सदनिका अशा विविध उत्पन्न गटांतील एकूण 864 सदनिकांची सोडत आज पार पडली.
दिव्यांगांसाठी आव्हाडांची मोठी घोषणा…
मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांच्या यादीत दिव्यांग व्यक्तींचा समावेश आहे. याबाबत त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. म्हाडाच्या लॉटरीमध्ये ५ टक्के घरे दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. तशी घोषणाच गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी तीन दिवसांपूर्वी केलीय. मुंबईत हक्काचं घर असावं, यासाठी अनेक जण प्रयत्न करतात. गृहनिर्माण मंत्रालयाच्या म्हाडा तर्फे उभारल्या जाणाऱ्या प्रकल्पातील ५ टक्के घरं दिव्यांग प्रवर्गासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भविष्यात निर्माण होणाऱ्या सर्व प्रकल्पांसाठी हा निर्णय लागू असणार आहे, अशी माहिती आव्हाड यांनी ट्विट करून दिली.