हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maha Vikas Aghadi । 29 महानगर पालिकांसाठी मतदान होण्यापूर्वी महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप घडला आहे. शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस यांची महाविकास आघाडी अखेर फुटली आहे. काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार आहेत. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज याबाबत माहिती दिली. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे.
स्वबळाचा नारा कशासाठी ? Maha Vikas Aghadi
उद्धव- राज ठाकरेंच्या राजकीय युतीमुळे काँग्रेसने महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून आज मुंबईत पक्षाच्या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेस पक्ष आगामी निवडणूक स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. आम्ही भाजप विरोधात आणि शिवसेना ठाकरे गटाविरोधात लढण्याचा निर्णय घेतला आहे. या लढाईत सच्चे देशभक्त आणि धर्मनिरपेक्ष लोकांनी आमच्यासोबत यावे. आमच्या हातात सत्ता आल्यानंतर आम्ही मुंबई महापालिकेचा कारभार चांगल्या पद्धतीने सांभाळू असे आश्वासन चेन्नीथला यांनी मुंबईकरांना दिले. मुंबईत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. मुंबईचा हवा तसा विकास झालेला आहे. त्यामुळे आम्ही स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे असं त्यांनी म्हंटल.
एकीकडे महायुतीने कोणत्याही परिस्थितीत मुंबईची सत्ता मिळवायचीच यासाठी जोरदार तयारी केली असताना दुसरीकडे काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेमुळे महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) आणि पर्यायाने आता उद्धव ठाकरेंना मोठा फटका बसू शकतो. काँग्रेसने स्वबळाचा नारा दिल्यानंतर आता शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेससोबत आघाडी करायची कि ठाकरे बंधूना साथ द्यायची ? या पेचात शरद पवार असतील. नुकतंच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची थेट सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार मुंबईत ठाकरे गटासोबत निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अंतिम घोषणा त्यांच्या पक्षाकडून करण्यात आलेली नाही.




