हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील दापचरी येथील जागेची पाहणी करण्यात यावी. यासोबतच राज्यातील 305 कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या बळकटीकरणासाठी सचिवांच्या राज्यस्तरीय केडरच्या निर्मितीसाठी प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर करण्यात यावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. तसेच या बाजारपेठेच्या निर्मितीसाठी पणन, महसूल आणि पदुम आदी विभागांनी संयुक्त पाहणी करावी. राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कृषी उत्पन्न बाजार समित्यांना जागा उपलब्ध नाही. अशा प्रकरणांमध्ये संबंधित जिल्हा सहनिबंधकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव दाखल करावेत अशा सूचनाही फडणवीसांनी दिल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवन, मुंबई येथे ‘महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ’ स्थापन करण्याबाबत बैठक संपन्न झाली. यावेळी मंत्री जयकुमार रावल आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते. शेतमालाला जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कडून पालघर जिल्ह्यात महामुंबई आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठ स्थापन करण्यासाठी हालचाली सुरु आहेत. रुंगीस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेच्या धर्तीवर ही बाजारपेठ उभारण्यात येणार आहे. जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या बाजार व्यवस्थापन प्रतिनिधींनी राज्य शासनाशी चर्चा करून सहकार्याची तयारी दर्शवली आहे.
या प्रकल्पात अनेक आंतरराष्ट्रीय कंपन्यांनीही सहभागाची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय कृषी बाजारपेठेमुळे देश-विदेशात शेतीमालाचा प्रभावी पुरवठा सुलभ होणार आहे. या बैठकीत ठाणे जिल्ह्यातील बापगाव येथे मल्टी-मॉडेल हबसह कृषी पणन विषयक सोयीसुविधा उपलब्ध करणे, नागपूर जिल्ह्यातील काळडोंगरी येथे कृषी पणन विषयक सुविधा प्रकल्प उभारणे, राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करणे , ‘एक तालुका, एक कृषी उत्पन्न बाजार समिती’ स्थापन करणे, आणि आधुनिक संत्रा प्रक्रिया केंद्र उभारणे अशा अनेक महत्त्वाच्या प्रस्तावांचा आढावा घेण्यात आला




