महात्मा गांधी हे सूर्य आहेत, त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको; राहुल गांधींचे मोदींना प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रिचर्ड ॲटनबरो यांचा 1982 चा गांधी (Mahatma Gandhi) चित्रपट होईपर्यंत जगाला महात्मा गांधींबद्दल फारशी माहिती नव्हती असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदींना चोख प्रत्युत्तर दिले आहे. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको असं राहुल गांधी यांनी म्हंटल.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवर याबाबत एक विडिओ शेअर करत म्हंटल, “ज्यांच्या जगाचा दृष्टिकोन शाखांमध्ये तयार होतो ते गांधीजींना समजू शकत नाहीत. असे लोक गोडसेला समजतात… गोडसेच्या मार्गावर चालतात. गांधीजी हे संपूर्ण जगासाठी प्रेरणास्थान होते. मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाईन, हे सर्व लोक महात्मा गांधींपासून प्रेरित आहेत. भारतातील कोट्यवधी लोक महात्मा गांधींचा मार्ग अवलंबून सत्य आणि अहिंसेचा मार्ग अवलंबतात.” ही लढाई सत्य आणि अहिंसेसाठी आहे… ती हिंसा आणि अहिंसेवर आहे… जे लोक हिंसा करतात त्यांना सत्य समजू शकत नाही असा टोला राहुल गांधींनी मोदींना लगावला.

महात्मा गांधी हे सूर्य आहेत ज्यांनी संपूर्ण जगाला अंधाराशी लढण्याची ताकद दिली. बापूंनी जगाला सत्य आणि अहिंसेच्या रूपात एक मार्ग दाखवला, जो दुर्बल माणसालाही अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची हिंमत देतो. त्यामुळे शाखेत जाणाऱ्यांचे प्रमाणपत्र नको असं म्हणत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला.

मोदी काय म्हणाले होते ?

ABP या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान मोदींनी दावा केला होता कि महात्मा गांधी हे जगाचे महान आत्मा होते. गेल्या 75 वर्षात महात्मा गांधींबद्दल जगाला सांगण्याची जबाबदारी आपली नव्हती का? त्यांच्याबद्दल कोणालाच माहिती नव्हती. मला माफ करा, पण पहिल्यांदाच त्यांच्याबद्दलची उत्सुकता जगात वाढली जेव्हा गांधी हा चित्रपट बनला. जर जग मार्टिन ल्यूथर किंग, नेल्सन मंडेला यांना ओळखत असेल तर गांधी त्यांच्यापेक्षा कमी नव्हते आणि तुम्हाला हे मान्य करावे लागेल. जगभर फिरल्यानंतर मी हे सांगत आहे असेही मोदींनी म्हंटल.