हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| मुलींच्या जन्मदरात वाढ व्हावी आणि त्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ (Majhi Kanya Bhagyashree Yojana) सुरू केली आहे. या योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बळ कुटुंबांतील मुलींना आर्थिक सहाय्य दिले जाते. केंद्र सरकारच्या ‘सुकन्या समृद्धी योजने’च्या धर्तीवर राज्य सरकारने ही योजना राबवली आहे. आज आपण याच योजनेविषयी माहिती जाणून घेणार आहोत.
योजनेचा लाभ कोणाला?
राज्यातील पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबांना या योजनेचा लाभ मिळतो. मात्र, एका कुटुंबातील जास्तीत जास्त दोन मुलींनाच या योजनेचा लाभ घेता येतो. परंतु यासाठी, मुलीच्या आई-वडिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया (फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन) केलेले असणे आवश्यक आहे.
योजनेचे स्वरूप
मुलीच्या जन्मानंतर तिच्या पालकांना सुरुवातीला ५०,०० रुपये दिले जातात. त्यानंतर शिक्षणाच्या टप्प्यांवर पुढील आर्थिक मदत केली जाते.
पहिलीच्या वर्गात प्रवेश घेतल्यानंतर – ६,००० रुपये
सहावीत गेल्यावर – ७,००० रुपये
अकरावीत प्रवेश घेतल्यानंतर – ८,००० रुपये
१८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर – ७५,००० रुपये
महत्वाचे म्हणजे, लाभार्थी मुलीच्या नावाने व तिच्या आईसोबत संयुक्त बँक खाते उघडले जाते. या खात्यात ५०,००० रुपयांची ठेवी दिली जाते. तसेच, एक लाख रुपयांचा अपघात विमा आणि ५,००० रुपयांचा ओव्हरड्राफ्ट सुविधाही या योजनेअंतर्गत मिळते.
योजनेचा उद्देश
देशातील मुलींचा जन्मदर वाढावा, शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी त्यांना मदत मिळावी, असे या योजनेमागील सरकारचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांतील मुलींना शिक्षणाच्या संधी मिळाव्यात, हा देखील या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
अर्ज कसा करावा?
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र नागरिकांनी महाराष्ट्र सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी. आवश्यक अर्ज डाउनलोड करून महिला व बालविकास विभागाच्या कार्यालयात तो जमा करावा. ‘माझी कन्या भाग्यश्री योजना’ मुलींच्या भविष्याला आर्थिक पाठबळ देणारी महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे अधिक पालकांनी या योजनेचा लाभ आपल्या मुलींसाठी घ्यावा.