हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Manoj Jarange Patil । मराठा आरक्षणासाठी आंतरवली सराटी येथून निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा ताफा आता मुंबईत धडकला आहे. सध्या हा ताफा कोळीवाडा येथे असून आझाद मैदानाच्या दिशेने कूच करत आहे. आझाद मैदानावर आधीच मराठा समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. लाखोंच्या संख्यने मराठा एकवटला आहे. संपूर्ण मुंबईत भगवं वादळ पाहायला मिळत आहे. आज मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसतील, तसेच उपस्थित मराठा समाजाला मार्गदर्शन करतील.
आरक्षण पाहिजे असेल तर मुंबईला चला अशी साद मनोज जरांगे पाटील यांनी समस्त मराठा बांधवाना घातली होती. आपली लढाई आता आरपारची आहे, गोळ्या घातल्या तरी आता मी घेणार नाही… त्यामुळे मुंबईला चला अशी हाक जरांगे पाटलांनी मराठा समाजाला दिला होता. समाजाने सुद्धा जरांगे पाटलांना चांगला पाठिंबा दिला. जरांगे पाटलांच्या एका हाकेवर संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईत धडकला आहे. हीच मनोज जरांगे पाटील यांची ताकद आहे. मराठ्यांची वाढती संख्या बघून पोलिसांनाही मोठी कसरत करावी लागत आहे. संपूर्ण रस्ते पॅक झाल्याने वाहतुकीतून मार्ग काढणेही अवघड बनलं आहे. आज संध्याकाळी सहा वाजेपर्यंत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी दिली आहे. त्यामुळे संध्याकाळी सहानंतर मनोज जरांगे आणि मराठा आंदोलक काय भूमिका घेणार हे पहाणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यातही फक्त ५००० लोकांनीच उपोषण करावं अशी अट जरांगे पाटलांना घालण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या कोणत्या? Manoj Jarange Patil
1) मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे
2) मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे
3) हैदराबाद गझेटियर लागू करा…तसेच सातारा, मुंबई गॅझेटियर लागू करावे, अशी मागणी मनोज जरांगेंनी केली.
४) सगेसोयरे धोरणाची अंमलबजावणी करावी. ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगे सोयरे घ्या पोट जात म्हणून घ्या.
५) मराठा समाजाच्या नोंदी शोधण्यासाठी स्थापन केलेल्या शिंदे समितीला मुदतवाढ द्यावी
६) मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.




