Mumbai News : मुंबईची वाढणार कनेक्टिव्हिटी ; भारतीय रेल्वे जोडणार 250 नवीन उपनगरी सेवा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Mumbai News : मुंबईच्या बाबतीत बोलायचे झाल्यास रेल्वे खूप महत्वाची भूमिका बजावते. लोकल ट्रेन्सचा वापर त्यातही प्रामुख्याने केला जातो. मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढवण्याकडे रेल्वे प्रशासनाचा कल असून त्याच बाबतचा महत्वपूर्ण निर्णय भारतीय रेल्वे कडून घेण्यात आला आहे. भारतीय रेल्वेने पुढील पाच वर्षांसाठी मुंबईसाठी एक विशेष योजना आखली आहे, ज्यामध्ये 250 नवीन उपनगरी सेवा जोडल्या जाणार आहेत.

याशिवाय रेल्वे नेटवर्कमध्ये सुधारणा करण्यात येणार असून मुंबईतील रेल्वे प्रवास सुलभ करण्यासाठी नवीन मेगा टर्मिनल बांधण्यात येणार आहे.
याविषयी बोलताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं की, मुंबई आणि त्याच्या उपनगरी भागातील वाहतूक सुधारण्याच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून गाड्यांची ‘क्रॉस मूव्हमेंट’ कमी करण्यासाठी उपनगरीय नेटवर्कची पुनर्रचना करण्याचा रेल्वेचा मानस आहे.

दोन गाड्यांमधील अंतर कमी करण्याचा विचार

दोन गाड्यांमधील अंतर सध्याच्या 180 सेकंदांवरून 150 सेकंदांपर्यंत कमी करण्यासाठी नवीन तंत्रज्ञान लागू करण्याचा रेल्वेचा विचार असल्याचे मंत्री म्हणाले. ते म्हणाले की, उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवा वेगळे करण्यावर अधिक लक्ष दिले जात आहे. “उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या रेल्वे सेवांवर मोठे लक्ष दिले जात आहे,” असे वैष्णव यांनी स्पष्ट केले.

पनवेल-कळंबोलीत नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स

मुंबईच्या उपनगरीय रेल्वे प्रणाली दररोज 3,200 सेवा चालवते, ज्यामध्ये 75 लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. कोस्टल रोडचा विकास आणि मुंबईत टप्प्याटप्प्याने मेट्रो रेल्वेच्या अंमलबजावणीमुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील वाहतूक अधिक सुलभ होईल. याशिवाय, नवी मुंबईतील पनवेल-कळंबोली येथे एक नवीन कोचिंग कॉम्प्लेक्स बांधले जात आहे, ज्याचा वापर लांब पल्ल्याच्या गाड्यांसाठी टर्मिनल म्हणून केला जाईल.

पुण्यातही नवीन टर्मिनल

पुणे रेल्वे स्थानकावरील गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने हडपसर, उरुळी, खडकी आणि शिवाजीनगर येथे नवीन टर्मिनल बांधण्याचाही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी उल्लेख केला.

अर्थसंकल्पात रेल्वेसाठी 2,62,200 कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मध्ये रेल्वेसाठी 2,62,200 कोटी रुपयांच्या विक्रमी वाटपाची घोषणा रेल्वेमंत्र्यांनी केली. या रकमेपैकी 1,08,000 कोटी रुपये सुरक्षेशी संबंधित कामांसाठी खर्च केले जाणारआहेत. महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची घोषणा रेल्वेमंत्री वैष्णव यांनी केली. राज्यात सध्या 81,000 कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू आहेत, ज्यामुळे रेल्वे नेटवर्कचे संपूर्ण विद्युतीकरण झाले आहे, असे त्यांनी अधोरेखित केले. याव्यतिरिक्त, अमृत भारत स्टेशन इनिशिएटिव्ह अंतर्गत, रेल्वे संपूर्ण महाराष्ट्रात 128 स्थानकांचा पुनर्विकास करण्यात येणार आहे.