Monday, December 8, 2025
Home Blog Page 6712

राज्यसेवेतील नवीन प्रशासकीय अधिकारीच न्यायाच्या प्रतिक्षेत

images
images

समांतर आरक्षणामुळे पुणे व नागपूर येथे होणारी प्रशासकीय प्रशिक्षणे लांबणीवर

पुणे प्रतिनिधी| महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात आलेल्या राज्यसेवा परिक्षा २०१७-१८ च्या अडचणी थांबायचं नाव घेत नाहीत. खुल्या प्रवर्गातील १७ जागांसाठी इतर प्रवर्गातील उमेदवार निवडले गेल्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणास अजून उशीर झाला आहे. त्या १७ जागांसाठी बाकी उमेदवारांना वेठीस का धरलं जातंय? असा संतप्त सवाल यशस्वी विद्यार्थ्यांकडून येत आहे.

राज्यसेवा २०१७ या परीक्षेचा निकाल एप्रिल महिन्यात (२०१८) लागणार होता, परंतु त्याला जवळपास महिनाभर उशीर झाला. याशिवाय औरंगाबाद खंडपीठात असलेल्या याचिका क्रमांक ४१५९/२०१८ ला अनुसरुन परीक्षेच्या निकलातील १७ उमेदवारांची निवड झाली होती. ही निवड ग्राह्य धरण्यासाठी, किंबहुना याचिकेवरील निकाल देण्यासाठी महाधिवक्ता उपस्थित असणे गरजेचे आहे. मागील २ महिन्यांपासून महाधिवक्ता अनुपस्थित असल्यामुळे आणि या नेमणुकी त्वरित व्हाव्यात यासाठी सारखेच मंत्रालयाचे उंबरठे झिजवावे लागल्याने उमेदवार नाराज झाले आहेत. सरकारने तातडीने याबाबतीत पावले उचलावीत अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

काश्मीरमधील बारामुल्ला परिसरात ९ वर्षीय चिमुरडीवर सामूहिक बलात्कार

gang rape
gang rape

सावत्र आईच्या सांगण्यावरुन सावत्र भावानेच मित्रांसोबत केले पाशवी कृत्य

बारामुल्ला, काश्मीर | येथील उरी परिसरातील जंगलात एका मुलीचा मृतदेह आढळून आला. घटनेच्या तपसाअंती २४ ऑगस्टला बेपत्ता झालेल्या चिमुरडीचा हा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. मुलीच्या सावत्र आईच्या सांगण्यावरुनच सावत्र भावाने त्याच्या मित्रांसाहित हे पाशवी कृत्य केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गळा दाबून मारल्यानंतर ओळख पटू नये म्हणून चाकूने त्या मुलीचे डोळेही काढून टाकण्याची क्रूरता या नराधमांनी केली आहे. या गुन्ह्याबद्दल पोलिसांनी आतापर्यंत ५ जणांना ताब्यात घेतले आहे. अधिक तपासासाठी एसआयटीची नेमणूक करण्यात आली आहे.

बोनियार पोलीस स्टेशनमध्ये २४ ऑगस्टला मुलगी हरवल्याची तक्रार नोंदविण्यात आली होती. गावकऱ्यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावदेखील केला होता. २ सप्टेंबरला मुलीच्या गावातील घरापासून १ किलोमीटर अंतरावर हा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आला. पीडित मुलीच्या वडिलांना २ बायका आहेत. यापैकी एक फहमीदा, ही त्याच गावात राहत असून, दुसरी खुशबू ही झारखंडची आहे. फहमीदा बाहेरची कामे व शेळीपालन करते तर खुशबू घरकामात असते. खुशबू हीच त्या पीडित मुलीची आई आहे. आपल्या सवतीबाबत असलेल्या आकसामुळे,नवऱ्याच्या दुसऱ्या बायकोप्रति असलेल्या अधिक जवळीकतेमुळे आपण हे कृत्य केल्याचं फहमीदाने सांगितलं. आपला मुलगा साहिलला तिने हे कृत्य करायला सांगितलं. आणि खुनानंतर त्यावर ऍसिड सुद्धा टाकण्यात आलं. या घटनेचा अधिक तपास उरी पोलीस स्टेशनचे मेहरजुद्दीन रैना व इकबाल अहमद करत आहेत.

मला भावलेले शिक्षक !!

teachers day
teachers day

शिक्षकदिन विशेष | गौरी नारायण मोरे, छकुताई देठे

‘छडी लागे छम छम विद्या येई घमघम – छम छम छम’ याप्रकारे आम्ही आमच्या शिक्षकांच्या छड्या घेत तर कधी चुकवत १० वी पर्यंतच शिक्षण गावातच पूर्ण केलं. पुढच्या शिक्षणाची सोय गावात नसल्यामुळे आम्ही आमचा शैक्षणिक मोर्चा साताऱ्याकडे वळवला. अगदी शेजारच्या काकूंकडे जायचं म्हटलं तरी सोबत लागणारी आई तिकडे नव्हती, की बसायच्या बाकावर मधून रेघ मारून दोन हिस्से पाडणारी मैत्रीण तिकडे नव्हती. नवीन ठिकाणी मला अगदी गहिवरुन आल्यासारखं होई. कदाचित ग्रामीण भागामध्ये वाढलेल्या मुलीला साताऱ्याची जीवनशैली रुचली नसावी. ११ वी व १२ वीची दोन वर्षे कशीतरी काढली आणि पदवीसाठी साताऱ्यातील नामांकित यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सला प्रवेश घेतला.
पूर्वीच्या कॉलेजमध्ये मी १०० च्या पटीमध्ये विद्यार्थी पहायचे, पण इथं मात्र डोळे आणखीच झूम करुन हजारच्या पटीत विद्यार्थी पहायला मिळाले. एखाद्या जत्रेत फिरल्यासारखं वाटायचं त्यावेळी. वेगवेगळ्या विषयाचे शिक्षक यायचे अन जायचे, तासाला बसून खूप कंटाळा आल्यामुळे अशीच एकदा बाहेर गेले तेव्हा दोन मुली ओरडतच म्हणाल्या – वर्गात ये गौरी, सर आलेत. धावतपळतच वर्ग गाठला आणि पटकन जागा पकडली. सरांचं निरीक्षण करण्यातच २-३ मिनिटं गेली. उंच बांधा, गोरा वर्ण, धडधाकट देह, राकट चेहरा अशी पन्नाशीतील व्यक्ती माझ्यासमोर उभी होती. त्यांनी सर्वांना बसायला सांगितलं आणि स्वतःची ओळख करुन दिली. “मी हसबे सर, तुम्हाला mathematics शिकवणार आहे.” “एक लक्षात घ्या मुलांनो, गणिताचा विद्यार्थी कधी उपाशी राहत नाही, काही न काही तो करत असतोच” ही सरांची त्यावेळची वाक्य आजही आठवतात. कदाचित याच वाक्यांनी मी पुढे गणित विषय ठेवण्याचा निर्णय घेतला असावा.

“तासाला पाणी प्यायचं नाही, मी शिकवत असताना मला तहान लागत नाही, मग तुम्हाला लगेच कशी फाशी लागतेय?” या दहशतीमुळे त्यांच्या तासाला पाणी पिणं कधी जमलंच नाही. ‘नवीन मुद्दा नवीन पानावर सुरु करण्याच्या त्यांच्या अट्टहासामुळे नीटनेटकेपणाची सवय मला लागली’. या शिस्तीमुळे एक-दोनदा त्यांचा ओरडासुद्धा मी खाल्ला होता. गणितीय आकडेमोडीसोबत आयुष्याचं गणित शिकवायलाही ते कमी पडले नाहीत. त्यांच्यासोबतच्या पहिल्या भेटीला आज जवळपास ६ वर्ष पूर्ण होतील. या ६ वर्षांत फक्त कॅलेंडरच्या तारखा बदलल्या. सर अजूनही तसेच आहेत – साधे आणि संयमी. आपल्या कर्तव्यात ते जराही कसूर ठेवत नाहीत. त्यांची शिकवण्यावरील निष्ठा खूपच प्रेरणादायी आहे. पन्नाशी उलटूनसुद्धा व्यायामासाठी ते अजिंक्यतारा किल्ल्यावर नियमितपणे जातात. पंचविशीतील तरुणांना लाजवेल असा त्यांचा उत्साह आहे. शिकवण्यासोबत शिकण्याचीही आवड असणाऱ्या हसबे सरांनी मागील वर्षीच आपली पीएचडी सुद्धा जिद्दीने पूर्ण केली. आधी विद्यार्थिनी असताना आणि नंतरच त्यांची सहयोगी शिक्षिका असताना पावलोपावली माझ्या ज्ञानाच्या कशा विस्तारतच चालल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडताना, आयुष्यात उभे राहताना मी पाहत आहे. अशा या सदाबहार शिक्षकाला यंदाच्या शिक्षकदिनानिमित्त खूप साऱ्या सदिच्छा.

गौरी मोरे – 9112621363


शिक्षकरुपी वडील – अवताडे सर

शिक्षकदिन म्हटले की अगदी अंगणवाडीपासून आठवण यायला सुरुवात होते….अगदी शिक्षकदिनाला केलेली भाषण असोत किवा शिक्षकांसाठी नकळत कार्यकम घेऊन अचानक केलेले सत्कार असो….अन दहावी मध्ये असताना इतर वर्गात घेतलेला तास असो ….एक दिवस असा असतो हा की त्या दिवशी सर्वच शिक्षकांची खूप आठवण येते…अन मग त्यांना अचानक कॉल कधी केला जातो ते पण समजत नाही…..विशेषतः शाळेतील शिक्षकाना जेव्हा वेल सेटल्ड झालेले विद्यार्थी संपर्क करतात तेव्हा त्यांच्यासाठी ती खूप आनंदाची गोष्ट ठरते….शिक्षकांबद्दल जेव्हा मी विचार करायला लागते तेव्हा मला पहिल्यांदा अंगणवाडीच्या कोळी मैडम आठवतात…. त्यांच्याकडेच मी आयुष्याचे धड़े गिरवायला शिकले….अगदी मनापासून त्या आम्हा लहान विद्यार्थ्यांची काळजी घ्यायच्या……..अंगणवाडीत मी देऊळात (त्यावेळचा वर्ग) बसायची नाही….. त्यासाठीसुद्धा मी खूप वेळ घेतला होता पण त्या कधी चिडल्या नाहीत….
प्राथमिक शाळेत मला एक वर्ष फोके गुरूजी होते….त्यांनी मराठीतील मुळाक्षरे काढायला सांगितली की मी A,B,C,D काढायची पहिल्यांदा ते रागवले पण नंतर मला समजावून सांगितले….. त्यांनीच मला लिहायला वाचायला शिकवले….. त्यांनंतर दुसरीपासून मला मासाळ उर्फ़ ढेरे मैडम शिकावायला आल्या….. त्या खूप मन लावून शिकवायच्या ….आम्हाला प्रेरित करायच्या…..सर्वांच्या पालकांशी सुद्धा त्यांचा व्यवस्थित संवाद होता….. शाळेत तर शिकवायच्याच पण घरीसुधा सकाळी लवकर बोलावून शिकवायच्या…. आजच्या काळात शाळेत शिकवून बाहेर शिकवणीकरता भरमसाठ फी आकारणाऱ्या अन शिक्षणाचे बाजारीकरण करणाऱ्या शिक्षकांची तुलनेत मैडम ना देवमाणूसच म्हणायला हवे…. त्या कधीच विद्यार्थ्यांना कोणतीही मदत करायला मागेपुढे पाहत नसत…..मला वाचन, भाषण करण्याचे सवय त्यांनीच लावली…. कधीही आईची कमी भासूु दिली नाही असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही त्यांच्याबाबतीत…. असे निस्वार्थीपणे प्रेम करणारे अन शिकवणारे शिक्षक भेटल्यामुळेच मी पुढे वाटचाल करू शकली…..ह्या मैडम मला कॉलेज ला असताना सातारा मध्ये भेटल्या….. तर अगदी आनंदुन गेल्या आणि सोबतच त्यांच्या मुलीच्या लग्नाचे निमंत्रण ही दिले….
‌ माझी माध्यमिक शाळा तर माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरली आहे ती म्हणजे तिथल्या शिक्षकांमुळे….. मला जो काही मिळवता आले त्याचे श्रेय माझ्या या शिक्षकाना जाते….माझी माध्यमिक शाळा तर माझ्या आयुष्यातील मैलाचा दगड ठरली आहे ती म्हणजे तिथल्या शिक्षकांमुळे….. मला जो काही मिळवता आले त्याचे श्रेय माझ्या या शिक्षकन जाते….आमच्या शाळेतील सगळेच शिक्षक अगदी मनापासून शिकवायचे ….केवळ वर्गातील अभ्यास करायलाच नव्हे तर अवांतर वाचन, दररोज पेपर वाचन ,खेळ, या सगळ्याच बाबतीत सतत प्रोत्साहन द्यायचे…. त्यामुळे आम्ही घडत गेलो…..मला परीक्षा फी वगैरे भरायला खूप उशिर व्हायचा…. पण कधीच रागवले नाहीत….कधी कधी शिक्षकानीच माझी फी भरलीय….परीक्षा,स्पर्धा यासाठी बाहेरगावी जाण्याचा खर्चसुद्धा न सांगता केलाय….मला शाळेत असताना जामदार मैडम होत्या त्या म्हणजे जणू माझी मैत्रीणच….अजूनही आमची मैत्री कायम आहे….अगदी हक्काने घरी बोलावत्तात….. तसेच पाचवीमध्ये माझे वर्गशिक्षक होते पावले सर…. मी तशी लाजाळु होते एखाद्या स्पर्धेत भाग घेणे, पुढे येऊन बोलणे याबाबत खूप न्यूनगंड होता….परंतु त्यांच्या बोलण्याने मी खूप एक्टिव बनले….तसेच साळवी सर,शेंबडे सर यांचाही माझ्या वैचारिक जड़णघडणीत खूप वाटा आहे….त्यांनी वेळोवेळी मला अवांत्तर पुस्तके उपलब्ध करून दिली त्यामुळे मला विचार करायला लागली…….मला शाळेतील सर्व शिक्षक अगदी स्पष्ट आठवतात किंबहुना मी त्यांना विसरुच शकत नाही…. माझे विज्ञानाचे शिक्षक R. G. आवताड़े सर, हिंदीचे चंदनशिवे सर, इंग्रजीचे केंदुले सर,P. E चे जोशी सर, चित्रकलाच गवळी सर….गणिताच्या शिक्षकांबद्दल मी सविस्तर बोलेन….गणित हा माझा खूप आवडता विषय…. त्यामुळे माझे अन गणिताच्या शिक्षकाचे नाते नेहमीच वेगळे राहिले….एक भावनिक आपलेपणा कायम जाणवत राहिला…. जगदाळे सर मला गणित शिकवायचे अगदी सहावीपासू न….त्यांच्या गणित शिकवायची हातोटीच खूप मस्त होती….सगळ्यांना सामिल करून घेऊन गणित सोडवायचे त्यामुळे 100% सर्वांचे लक्ष फळ्याकड़े असायचे….अन दूसरे गणिताचे शिक्षक म्हणजे S. T. आवताड़े सर….हे सर माझ्या आयुष्यात येणे म्हणजेच एक वेगळी घटना ठरली….ते मला नववी व दहावी मध्ये भूमिती शिकवायचे ….भूमितिचे आकार शिकवत शिकवत त्यांनी आमच्या जीवनालाही आकार दिला…. ते विद्यार्थिकेंद्री शिक्षक आहेत….विद्यार्थ्यानी शिक्षक शाळेत शिकवन्यापूर्वी स्वतः घरातून वाचून आले पाहिजे….एखादी गोष्ट जमत नसेल तर त्यासाठी प्रयत्न तरी केले पाहिजेत असे त्यांना वाटायचे….दहावीत असताना माझी दूरस्थ गुरुकुलची सरावपरीक्षा सुरु होती….ते सलग जवळ जवळ एक महिना पेपर चालू होते…अन माझे तब्येतीकडे अजिबात लक्ष नव्हते ….एके दिवशी सर वर्गात आले बहुतेक त्यांना घरच्यानी सांगितले असावे …त्यांनी माझी विचारपुस केली अन पटकन खिशातून पैसे काढून दिले अन म्हटले पेपर सुटला की दवाखान्यात जा अजून पैसे लागले तरी सांग…. असे शिक्षक असल्यावर शाळा घर का वाटणार नाही…. मला या अशा शिक्षकांमुळे शाळा नसली की करमायचेच नाही…मला माझे शिक्षक खूप आवडतात…. अजूनही मी शिकतेय याच्या पाठीमागे त्यांची प्रेरणा आहे….दहावी नंतर सर्व शिक्षकानी ग्रामस्थांच्या सहकार्याने माझ्या पुढील शिक्षणाचा खर्च उचलला….फक्त खर्चच नव्हे तर वेळोवेळी अजूनही विचारपुस करत असतात….S. T. आवताड़े सर यांनी तर मला मुलगी म्हणूनच स्वीकारले….. अन मला हक्काचे कुटुंब मिळाले…..मला वाटते एखाद्याच्या आयुष्यात यापेक्षा मोठी गोष्ट ती कोणती नसेल….

छकुताई देठे – 9545340169

माझ्या आठवणीतील शिक्षक

Teachers Day
Teachers Day

शिक्षकदिन विशेष | अक्षय चंद्रकांत फडतरे (इनामदार), संध्या जाधव

पाचवीच वर्ष पूर्ण झालं. पुढील शिक्षणासाठी मी आणि माझा मित्रांनी गावातील high school म्हणजेच न्यू इंग्लिश स्कूल, जिहे इथे admission घेतलं. मी नेहमीच या शाळेबद्दल,इथल्या शिक्षाकांबद्दल माझा मोठ्या भावांकडून आणि मित्रांकडून ऐकत आलेलो होतो. मुख्याध्यापक सूर्यवंशी सर ते नाना शिपाई पर्यंतचा सर्व स्टाफ ओळखीचाच होता. शाळेत शिकत असताना बऱ्यापैकी सर्वांनाच गणित हा सर्वात कठीण विषय वाटत असतो. असा कठीण ,भयंकर ,भीतीदायक विषय शिकवणारे शिक्षक म्हणजे आमचे केंजळे सर. केंजळे सर हे कटापूर म्हणजे आमच्या शेजार गावचेच. इयत्ता ५ वी ते ७ वी च्या वर्गाला ते गणित शिकवत असत. केंजळे सर हे आमच्या शाळेतील कार्यक्षम आणि सक्रिय असे शिक्षक होते ज्याला आपण ‘हाडाचे शिक्षक’ असे म्हणतो. इयत्ता ४ थी तून किती आणि कोणकोणते विद्यार्थी ५ वी मध्ये प्रवेश घेणार आहेत यावर त्याचं खूप बारकाईने लक्ष असायचं. दर उन्हाळ्याच्या सुट्टीत ते अशा मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांनी स्वतःच्या पाल्याला ५ वी ला कस आपल्या शाळेत पाठवतील, यासाठी ते विशेष प्रयत्न करत. एक शिक्षक म्हणून ते गणित हा विषय फार आवडीने, सोपा करून शिकवत असत. त्यामुळेच मला गणिताची कधी भीती वाटली नाही. केंजळे सरांचा अभ्यासक्रम नेहमी परीक्षेच्या किमान २ आठवड्यापूर्वी शिकवून व्हायचा आणि त्यानंतर सुरु व्हायचं अतिशय भयानक असं उजळणी सत्र. या २ आठवडे उजळणी सत्रामधे आमच्या खेळण्यावर बंदी असायची. मुलगा खेळताना दिसला तर मुलीने नाव सांगायचं आणि मुलगी खेळताना दिसली की मुलांनी नाव सांगायचं, असा सरांचा नियम असायचा. त्यात भर म्हणजे सर शेजारच्या गावचे असल्यामुळे रोज फेरफटका मारायचे गावातून. आम्ही सगळेच खूप भीत होतो सरांना. पण सरांचं शिकवण आणि उजळणी सत्र याच फलित म्हणजे मला नेहमी गणितात पैकीच्या पैकी गुण पडायचे,मग ती घटक चाचणी असो किंवा सत्र परीक्षा असो. त्यांच्या प्रत्येक वर्गामध्ये ज्यांना गणितात पैकीच्या पैकी गुण मिळायचे त्या सर्वांना सर बक्षीस म्हणून काहीतरी भेटवस्तू द्यायचे.सरांच जस शिकवण्यात प्राविण्य होतं तसंच ते खेळात सुद्धा तरबेज होते. आमच्यासोबत ते खो-खो, कबड्डी आणि क्रिकेट खेळताना स्वतः सहभाग घ्यायचे. तसेच आंतरशालेय स्पर्धांचे आयोजन करणे आणि सक्रिय सहभागासाठी प्रोत्साहन करणे,यामध्येही ते नेहमी पुढे असत.याव्यतिरिक्त सरांचं वैशिष्टय म्हणजे सर नेहमीच आर्थिक अडचणीत असलेल्या विदयार्थ्यांना मदत करत असत.त्यांच्या या सवयीमुळे तर त्यांचा अतिशय आदर वाटायचा.ते स्थानिक असल्यामुळे शाळेचं स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन वेळेस ध्वजारोहण कोणाकडून करायचं,यामध्येही सरांचं मत नेहमीच निर्णायक असायचं. माझासोबतच सरांचं नातं सांगायचं झालं तर माझासाठी ते एक उत्तम मार्गदर्शक होते आणि आजही आहेत. ‘नोकरी करणार असशील तर class l कर’,अस ते नेहमी मला सांगायचे. कधी आजारी पडलो तर घरी भेटायला यायचे. आजही माझी आणि सरांची जेव्हा गाठ पडते तेव्हा ते कितीही घाई असली तरी आवर्जून ५ मिनिटं का होईना बोलतात. बरं वाटतं,आपुलकी वाटते.

आज जेव्हा मला योगेशचा फोन आला तेव्हा तो मला म्हणाला की, ‘माझा आठवणीतील शिक्षक या विषयावर एक लेख लिहून पाठव’. तेव्हा चटकन माझा मनात केंजळे सरांचा विचार आला आणि मला जे जे वाटलं ते मी लिहिलं. अजून लिहायचं होत पण शब्दमर्यादा आहे.

अक्षय – ९६६५१६२०२३


मला भावलेले शिक्षक – संध्या जाधव

आपल्या आयुष्यात शिक्षणाची सुरुवात होत असताना शिक्षक ही व्यक्ती खूप महत्त्वाची भूमिका पार पाडत असते. आपल्या त्या लहानग्या विश्वाची जणू रोल मॉडेलच, कारण आपण प्रत्येक गोष्ट त्यांच्याकडे पाहत शिकत असतो. मग ते लहानपणी अंगणवाडीत घरापासून थोडं दूर राहून शाळेत मन रमवणाऱ्या बाई, अक्षर वळणदार यावं यासाठी शुद्धलेखनाचे गृहपाठ करवून घेणारे गुरुजी, बोर्डाच्या परीक्षेत यश मिळावं म्हणून जादा तास घेऊन शिकवणी देणारे सर हे सगळेच माझ्यासाठी महत्वाचे. पण मला जे शिक्षक मनापासून भावले ते ह्या सगळ्यानंतर भेटलेले कुमार मंडपे सर.

सातारा मध्ये ग्रॅज्युशन करताना नकळतपणे विवेकवाहिनी आणि नंतर अंनिसशी जोडले गेले. आपल्याला अपेक्षित असणारं काम करण्यासाठी हा योग्य विचारमंच आहे हे ज्यावेळी आतून पटलं तेव्हा याच्या साप्ताहिक बैठकांत आणि कृतिकार्यक्रमात हिरिरीने भाग घ्यायला लागलो. इथेच भेटले मला कुमार मंडपे सर, रयत शिक्षण संस्थेमधून मुख्यध्यापक म्हणून दीर्घकाळ सेवा बजावलेले आणि नंतर निवृत्त झालेले.
वैचारिक भूमिका पक्की होण्यासाठी साप्ताहिक बैठकीचे स्वरूप वाचन, चिंतन, विचार समजावून घेणे आणि ते व्यक्त करण अस असायच. यामध्ये आम्हाला मंडपे सरांकडून योग्य मार्गदर्शन मिळायचं. शांतपणे विचार मांडणं, अनुभवाचे किस्से गोष्टीप्रमाणे सांगणं, चमत्कार शिकवणं आणि प्रबोधनाची गाणी यामध्ये सरांचा उत्साह कमालीचा असायचा. आपण जे बोलतो तसाच आचरणात आणण्यासाठी कदाचित वेळ लागतो, मग ते व्यक्त करायचं की प्रत्यक्ष आचरणात आणेपर्यंत शांत बसायचं अशा संभ्रमात असणाऱ्या मला त्यांची ‘तू बोलगी, मूह खोलगी, तबही जमाना बदलेगा‘ हि दिलेली शिकवण दिशादर्शकच ठरली. एखाद्या गोष्टीबाबत नव्या कार्यकर्त्यांना बोलतं करण आणि सहभागी करून घेणं सरांना छान जमायचं. एखादा विचार आचरणात आणण्याअगोदर त्याचा उच्चार आणि प्रचार करण किती महत्वाचं आहे हे आम्हाला जाणवायला लागलं. बैठक संपल्यानंतर आजच्या अभ्यासक्रमात कार्यक्रमात झालेले बदल सर जाणीवपूर्वक विचारायचे, आमच्या वेळी हे असं असायचं हे आवर्जून सांगायचे त्यामुळं त्याच्याशी गप्पा मारताना मला मजा यायची.
संविधानात सांगितलेलं कर्तव्य आणि शाळेमध्ये शिकलेल महत्वाचं मूल्य म्हणजे वैज्ञानिक दृष्टीकोन, हे शाळेतील मुलांमध्ये जोपासण्यासाठी अंनिसचा एक कार्यक्रम आहे, एक पुस्तक मुलांना द्यायचं त्यामध्ये गोष्टी आणि त्यातून आपण काय शिकलो अशा स्वरूपाचं, ह्यातील गोष्टी अगोदर मुलांना शिकवायच्या आणि त्यावर एक परीक्षा घ्यायची असा कार्यक्रम असायचा. हे पुस्तक मंडपे सर आणि मंडपे मॅडम यांनी लिहिलेलं. या कार्यक्रमकरिता सरांबरोबर जाण्याचा योग आला, लहान मुलांना गोष्टीतून मूल्य सांगण्याचं सरांचं कौशल्य भारीच होत.
असाच सरांच्या घरी एक दोनदा जाणं झालं त्यावेळी त्यांचे विचार त्याच्या घरातील गोष्टीमध्ये पण दिसून आले, विचार जगणारे आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवनारे हे शिक्षक आणि निवृत्ती नंतरही हे काम मनापासून करणारे एक कार्यकर्ते मला नेहमीच भावले.

संध्या महात्मा जाधव – ७७५६८६६३९४

शिक्षक दिनाच्या तुम्हाला व तुम्हाला घडवलेल्या गुरुजनांना खूप साऱ्या शुभेच्छा.

पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंचे पुण्यात भव्य व्यापार विक्री केंद्र सुरु.

eco friendly
eco friendly

निसर्गकट्टा | सुनिल शेवरे

पर्यावरणाचे महत्व लक्षात घेऊन सेंद्रिय शेतीमाल, रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने, सेंद्रिय वस्त्रे या पर्यावरणपूरक वस्तूंचे ‘अद्रिष’ हे व्यापार विक्री केंद्र पुण्यात ‘सात्विक’तर्फे समारंभपूर्वक सुरु झाले. पुण्यातील कोरेगाव पार्क येथे कणेरी मठ कोल्हापूर येथील काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले. गणेशाची पूजा करून त्यांनी उद्घाटन केले.

या प्रसंगी शुभेच्छा देताना ते म्हणाले की, पुण्यामध्ये ‘अद्रिष’चे उद्घाटन करताना खूप आनंद होत आहे सामान्य माणसांच्या निरोगी आणि तंदुरुस्त जीवनासाठी शून्य कचरा व्यवस्थापन आणि पर्यावरणपूरक हे व्यापार विक्री केंद्र स्तुत्य उपक्रम आहे. या उद्घाटन कार्यक्रमास पुणेकरांनी गर्दी केली. अद्रिषचे अक्षय अगरवाल ,सौरभ साळुंखे,गजेंद्र चौधरी यांच्या या उपक्रमाला पुणेकरांचा खूप प्रतिसाद लाभला. उद्घाटन करताना गाईची पूजा करून, गाईला सेंद्रिय अन्न खावयास देऊन अनोख्या पद्धतीने उद्घाटन केले.

पुण्यातील अद्रिष या पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तूंच्या व्यापार विक्री केंद्रात किराणासामान , स्वयंपाक घरातील उपकरणे ,गृहपयोगी वस्तू , सेंद्रिय वस्त्रे , रसायनमुक्त सौंदर्य प्रसाधने हे सारे कमी दारात उपलब्ध आहे. कापडी पिशव्या , समान बसतील अशी पर्यावरणपूरक व प्रदूषणमुक्त खोकी उपलब्ध आहेत.घरपोच सेवा देखील या व्यापार विक्री केंद्रातर्फे दिली जाणार आहे. निरोगी आणि प्रदूषणमुक्त जीवन शैलीची ही वाटचाल आहे असे अक्षय अगरवाल उद्घाटन प्रसंगी म्हणाले.

भारतातील शून्य कचरा व्यवस्थापन सेंद्रिय जीवनशैली संकल्पना राबवणारे प्रमुख हे व्यापार विक्री केंद्र आहे .‘सात्विक’तर्फे अदृश्य (अद्रिष) पर्यावरणपूरक शून्य कचरा व्यवस्थापनाच्या अनुशांगाने रसायनमुक्त जीवनोपयोगी वस्तू असलेले इको फ्रेंडली व्यापार केंद्र सुरु झाल्यामुळे पर्यावरण प्रेमी व आरोग्याबद्दल दक्ष असणाऱ्या पुणेकरांची मोठी सोय झाली आहे. कोल्हापूरच्या कणेरी मठाचे श्रध्देय पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या संकल्पनेतून शुद्ध व निरोगी जीवनासाठी आवश्यक असणारी सेंद्रिय आणि रसायनमुक्त जीवन पद्धती सात्विकमध्ये साकारली असून त्यांची सर्वत्र २५ केंद्रे असून ,’अद्रिष’ हे पुण्यात नव्यानी सुरु झाले आहे.
सेंद्रिय शेती करणाऱ्यांना हमी भाव आणि ग्राहकांना कमी भावात माल मिळेल व समाजात विषमुक्त अन्नाविषयक जागरूकता येईल. हे जाणून घेऊन अक्षय अगरवाल आणि सौरभ साळुंखे व गजेंद्र चौधरी यांनी सात्विक तर्फे अद्रिष म्हणजे ‘अद्रुश्य’ची सुरुवात केली . या प्रसंगी बाबासाहेब साळुंखे (माजी शास्त्रज्ञ- कृषी महाविद्यालय पुणे )आणि कृषी क्षेत्राशी निगडीत अनेक दिगाज्जांची विशेष उपस्थिती लाभली.आभार प्रदर्शन बाबासाहेब साळुंखे यांनी केले.

कास पुष्पपठार पर्यटकांसाठी खुले

kaas
kaas

सातारा | अमित येवले

कास पुष्प पठार आता विविधरंगी नैसर्गिक फुलांनी बहरत असून वन विभागाने हे पुष्पपठार पर्यटकांसाठी सोमवारपासून खुले केले आहे.
शनिवार आणि रविवारी (सुट्टीच्या दिवशी) कास पठारावर जाण्यासाठी ऑनलाईन बुकींगही संकेतस्थळावरुनच करुन यावे लागणार आहे. इतर दिवशी इथे तिकीट उपलब्ध असणार आहेत.

कास पठार हे सौंदर्याची खाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्याचप्रमाणे जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून ते समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याची नवी पर्यटनाची ओळख म्हणून हे ठिकाण पुढे येत आहे.

बुकिंग वेबसाइट –

http://www.kas.ind.in

पर्यटकांसाठी अधिक

★ प्रवेश शुल्क – 100/-

★ 12 वर्षाखालील व 65 वर्षावरील लोकांना फी नाही.

★ सोबत वय ओळख पटावी म्हणून कुठलेही शासकीय ओळखपत्र आणावे.

★ ३ हजार व्यक्तींना दररोज प्रवेश.

छत्तीसगडमधील ५०० माओवादी सीआरपीएफ च्या ताब्यात

maoist
maoist

रायपूर | केंद्रीय राखीव पोलिस दलाने केलेल्या कारवाईत मागील वर्षभरात एकट्या छत्तीसगडमध्ये तब्बल ५०० हून अधिक माओवाद्यांना ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे. देशाच्या वेगवेगळ्या राज्यांत सक्रिय असलेल्या या माओवाद्यांना पकडण्यासाठी देशभरात जवळपास १० लाख सैनिकांचं जाळं तयार केल्याची स्पष्टोक्ती केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महानिदेशक आर आर भटनागर यांनी दिली. कट्टर डाव्या विचारसरणीचा प्रभाव रोखण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचंही ते म्हणाले. राज्य पोलीस दलांचंही या कामात महत्वाचं योगदान राहिलं आहे.

गडचिरोली मधील आंबटपल्ली गावात दारुबंदीसाठी प्रभातफेरी

muktipath
muktipath

गडचिरोली | “दारू सोडा, आरोग्य जोडा”, “दारूची बाटली फुटली पाहिजे, गावाची दारू सुटली पाहिजे” या घोषणा देत आंबटपल्ली गावात दारूच्या निषेधार्थ प्रभातफेरी काढण्यात आली. दारुबंदीच्या निर्णयाचे स्वागत करत दारू विक्रेत्यांनी एका दिवसापूर्वी उपलब्ध दारूची विल्हेवाट लावून या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला. ‘मुक्तीपथ’ या महाराष्ट्र शासन, सर्च संस्था आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने उभी राहिलेली व्यसनमुक्ती मोहीम असून या उपक्रमला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला.

ट्विटर लिंक –

रेस्टॉरंटच्या नावाखाली बिटॉस हॉटेलवर हुक्का बार आणि इतर अवैध धंदे सुरु

local news
local news

मोहम्मदवाडीतील प्रकार; हुक्का बारना पोलिसांचाच आशीर्वाद ,अनेकदा तक्रार करनही पोलिसांचा कानाडोळा

पुणे | सुनिल शेवरे

एनआयबीएम मोहम्मदवाडी येथील बिटॉस रेस्टो एंड बार हॉटेलवर कायद्याप्रमाणे पुणे महापालिकेने सुचना करूनही कोंढवा पोलिसांनी कानाडोळा केल्याचा धक्कदायक प्रकार उघड़किस आला आहे.
सदर हॉटेल हे सचिन ग्यानचंद अगरवाल यांच्या मालकीचे असून हे हॉटेल अमित जयकिशन गोयल आणि दिनेश मोहनलाल गुप्ता चालवतात. एनआयबीएम येथील रूणवाल डायमंड या सोसायटीच्या दुसऱ्या मजल्यावर सदर हॉटेल चालु आहे. या हॉटेल मध्ये टेरेस वर हुक्का , अवैध धंदे, चालू असल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. याविषयी नागरिकांनी आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी वेळो वेळी तक्रार केली. तरिही त्यांची तक्रार घेण्यास कोंढवा पोलिसांनी टाळलं असल्याचं अमित शाह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं.

काय आहे नेमक प्रकरण
सचिन अगरवाल नामक व्यक्तीचे हे हॉटेल असून हॉटेलच्या टेरेसवर अवैध बांधकाम आणि हुक्का बार चालू असल्याचे महापालिका कनिष्ठ अभियंता सुमित गायकवाड़ यांच्या पाहणीत लक्षात आले. तसेच या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अमित शाह वेळोवेळी तक्रार केली आहे, सदर प्रकरणामुळे मोठ्या प्रमाणात रात्रीच्या उशिरापर्यंतच्या चालणाऱ्या पार्ट्या, होणारा गोंगाट नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांचाच अभय असणाऱ्या या हॉटेलवर एप्रिल महिन्यात कारवाई करण्यात आली होती. परंतु काही दिवसानंतर पुन्हा हे धक्कदायक वास्तव पोलिसांच्या संगनमताने सुरु असल्याचं समोर आल आहे, यावेळी पोलिस ठोस कारवाई करतील का? आणि केली तरी ती तात्पुरती मलमपट्टी असेल का ? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

डोळस सण-उत्सव..!!

Dolby
Dolby

सांस्कृतिक नगरी | कृष्णात स्वाती

सण-उत्सव जल्लोषात साजरा करण्याचा नवीन पायंडा पडत असताना, त्या सणांचा मूळ उद्देश सफल होतो का? कोणत्या गोष्टी प्राधान्याने आणि खरंच आनंद देऊ शकतात? गर्दीचा भाग बनून जाण्यापेक्षा गर्दीतलं वेगळेपण सणांच्या निमित्ताने कसं अनुभवता येईल – त्याविषयी स्वानुभवावरून थोडंस..

काल एका पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. तिथे चर्चा चालली होती…

एक: – कोल्हापूरात यावर्षी डॉल्बी वाजणार काय?

दोन: – होय. वाजणार म्हणजे वाजणारच…

तीन: – यावर्षी मिरजेत तरी विचारूच नका. यंदा लोकांकडे पैसा पण भरपूर आहे. निवडणूका जवळ आल्यात ना!

एक: – हे सरकार, कोर्ट उगाचच आमच्या सणांना विरोध करतंय… काही तासांचाच तर प्रश्न असतो.

मी: – काही तास म्हणजे किती? किमान १० – १२ ते अगदी २४ – २४?

एक: – होय. तेच तर म्हणतोय वर्षातून एक दिवस वाजवला डॉल्बी तर काय मोठा फरक पडणार आहे?

मी: – हे डॉल्बीमुळं महाद्वार रोडवरील (कोल्हापूर) एक गॅलरी कोसळून कायमचा अधू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांना विचारायला पाहिजे.

चार: – एक मिरवणूकीत खरी कॉर्नर जवळ खून झाला तेव्हा मी तिथं जवळच होतो. डॉल्बीच्या गोंधळात हे कुणाच्या लक्षात पण आलं नव्हतं.

मी: – लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी, ‘तुम्हाला डिजेची परवानगी देतो. त्यासाठी पालकमंत्री, खासदार, आमदार यांच्या पत्राचीसुद्धा गरज नाही. केवळ तुम्ही तुमच्या आईचे किंवा बहिणीचे एनओसी सोबत आणा.’ असं म्हंटलंय…

दोन: – त्यांचाच तर डॉल्बीला विरोध असतो.

मी: – का? त्याही हिंदू विरोधी आहेत?

एक: – नाही हो, त्यांना आपल्या मुलाची काळजी वाटते.

मी: – आणि शिफारस पत्र देणाऱ्या नेते मंडळी, नगरसेवक, आमदार, खासदारांना?

सर्व: ……..

मी: – आकाशवाणीच्या आज रात्री आठच्या बातमी पत्रात सांगितले, ‘दहीहंडी फोडताना मुंबईत ६० गोपाळ जखमी आणि १ ठार’

दोन: – तसा एखादा अपघात होणारच की!

मी: – मग या अपघातात जखमी झालेल्या, मरण पावलेल्या तरुणांच्या कुटुंबियांना हा प्रथांचा आणि त्या पार पाडण्यासाठी जखमी किंवा “शहीद” झालेल्या आपल्या तरुण मुलांचा अभिमान वाटत असेल!

एक: – तसं कसं होईल?

चार: – अलिकडे सणांना हिडीस स्वरुप आलंय. आणि याला केवळ तरुण कारणीभूत नाहीत. आपल्या राजकारणासाठी त्यांचा वापर करणारे राजकारणी जास्त कारणीभूत आहेत.

मी: – आणि स्वतःला संस्कृतीरक्षक, धर्मरक्षक म्हणवून घेणारे?

एक: – तेही आहेतच. पण आश्चर्य म्हणजे सणांमध्ये होणार्‍या अपघातात या राजकारणी, संस्कृतीरक्षकांच्या घरातील कुणीच जखमी होत नाही आणि बळीही जात नाही. मरतात ती आमच्यासारख्या सामान्य माणसांच्या घरातील मुलं.

दोन:- मिरज दंगलीच्या वेळी तर यांनी वातावरण कसले तापवले होते! आमच्या शेजारच्या मंडळाची स्वागताची कमान स्वखर्चाने आणि सहभागी होऊन उभारणा-या मुसलमान चाचांनाही मारहाण झाली होती. त्यात त्यांचा हात मोडला.

चार:- तेव्हा इचलकरंजीतपण थोडा राडा झाला नव्हता!

तीन: – त्याचा फायदा पुढच्या निवडणूकीत झाला होता.

दोन: – यावर्षीच्या गणपती उत्सवात एकतरी दंगल होणारच. मी सांगतो लिहून घ्या! निवडणूका जवळ आल्यात ना!

एक: – टिळकांनी इंग्रजांविरुद्ध लोक एकत्र यावेत म्हणून सार्वजनिक गणपती उत्सव सुरू केले आणि आज लोक एकत्र येऊन काय करत आहेत!

मी: – मला खरं सांगा, ‘आज सार्वजनिक स्वरुपात केल्या जाणाऱ्या एकातरी धर्माच्या एकातरी उत्सवात खरी भक्ती, धर्म भावना, सामाजिक ऐक्याचा विचार राहिला आहे का?

एक: – खरंतर अपवादात्मक काही मंडळं सोडली तर अजिबात नाही.

तीन: – सण साजरे करणे म्हणजे ताकद दाखवणे, श्रीमंती दाखवणे, अनेकवेळा दहशत माजवणे असं होऊन गेलंय.

पाच: – तुम्हाला सांगतो आमच्या घरातली पोरं गणपती आणि गरब्याच्या काळात नुसती जेवायलाच काय ती घरी येत्यात! घरातल्या कामाचं तर नाव काढंत नाहीत. काही सांगायला गेलो तर, ‘देवाचंच काम करायला जातोय न्हवं!’ म्हणत अंगावर येतात. ‘देवानं आसं कुठं करायला सांगितलंय?’ म्हंटलं तर ‘तुमी लय शानं हाईसा आता गप बसा म्हणत भाईर पडत्यात!

दोन:- आमच्या मंडळात दुसऱ्या मंडळांची जिरवायची तयारी आम्ही महिनाभर आधीपासून करत असतो.

एक: – यंदा वातावरण जरा जास्तीच तापणार आहे. परवा काहीजण, तुम्ही म्हणता तसे धर्मरक्षक, आमच्या मंडळात आले होते. यावर्षीचा गणपती उत्सव जोरदार झाला पाहिजे. आपल्याचे सण आपण नाही मोठ्याने साजरे करणार तर कोण करणार? त्या धर्मातले लोक बघा कसे कट्टर आहेत! त्यांना त्यांची जागा दाखवायची असेल तर नेभळटपणे सण साजरे करून चालणार नाहीत. आपली ताकद दाखवलीच पाहिजे. असे सर्वांचे प्रबोधन करून गेलेत.

मी: – सण साजरे करायचे म्हणजे नेमकं काय करायचं याची अधिक गांभीर्याने चर्चा करायची गरज आहे. धर्म म्हणजे नीती आणि धार्मिक असणं म्हणजे नैतिक असणं असं मानलं जातं. हा धर्म आणि ही धार्मिकता खरंच आज दिसते काय याचा विचार केला पाहिजे. तरुणाईशी संवाद केला पाहिजे. आपण विचार करणारी माणसं या संवादाला कमी पडतोय की काय असा प्रश्न पडतोय!

…कृष्णात स्वाती 8600230660