नवी दिल्ली | पोलादपूर जवळ आंबेनळी घाटात २८ जुलै रोजी घडलेल्या बस अपघातातील मृतांना आज लोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. संसदीय शिष्टाचारा नुसार आज सकाळी अकरा वाजता लोकसभेचे कामकाज सुरू होताना लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांनी शोकप्रस्ताव वाचून दाखवला. त्यानंतर लोकसभेच्या सर्व सदस्यांनी मृतकांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी दोन मिनिटे उभे राहून मौन पाळले.
दिनांक २८ जुलै रोजी दुपारी १२ च्या सुमारास पोलादपूर जवळ मिनी बसचा अपघात झाला. या अपघातात ३० लोक जागीच ठार झाले होते. फक्त एक व्यक्ती या अपघातातून बचावला होता. बस मधील सर्व लोक हे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी होते. या घटनेवर राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी ही ट्विटरच्या माध्यमातून दुःख व्यक्त केले होते.
आंबेनळी अपघातातील मृतांना लोकसभेत श्रध्दांजली
Maratha Kranti Morcha | गिरीश बापट यांच्या घरा समोर मराठा आंदोलकांची निदर्शने
पुणे | गिरीश बापट यांच्या शनिवार पेठेतील घरा समोर आज सकाळी मराठा आंदोलकांनी जोरदार निदर्शने केली. ‘आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतं देत नाय घेतल्या शिवाय राहत नाय’ अशा आशयाच्या घोषणांनी बापट यांच्या निवासस्थानाजवळील परिसर दुमदुमून गेला होता.
संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले आहे. पुण्यामध्ये आज दिलीप कांबळे यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. तसेच राष्ट्रवादी कॉग्रेसच्या शहर अध्यक्षा खासदार वंदना चव्हाण यांच्या घरासमोर ही आंदोलक ठिय्या देणार आहेत. मराठा आंदोलकांनी कालपासून लोकप्रतिनिधींच्या घरा समोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. काल लातूरमध्ये संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घरासमोर झालेल्या आंदोलनात पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली होती.
मराठ्यांनी लाखोंच्या संख्येने मूक मोर्चे काढले त्यावेळी सरकारला जाग का आली नाही ? – छत्रपती शाहू महाराज
कोल्हापूर | मुख्यमंत्र्यांनी आज सह्याद्री अतिथीगृहावर मराठा समाजातील प्रतिष्ठित लोकांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीला कोल्हापूरातून इतिहासकार जयसिंग पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांना आमंत्रण होते. शाहू महाराजांनी बैठकीला जाण्या आगोदर दसरा चौकात ठिय्या आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना (Maratha Morcha) भेटण्याचे ठरवले. आंदोलकांना भेटल्यावर शाहू महाराजांनी बैठकीला न जाण्याचा निर्णय घेतला. ‘मोठया प्रमाणावर लाखोंच्या संख्येने मराठ्यांनी मूक मोर्चे काढले त्याच वेळी सरकारला जाग का आली नाही..आत्ता आंदोलन भडकल्यावर हे बैठकीचे नाटक कशाला ?’ असे शाहू महाराज म्हणाले.
दरम्यान आज सह्याद्रि अतिथीगृहावर मुख्यमंत्री मराठा समाजातील प्रमुख व्यक्तींनसोबत बैठक घेणार आहेत. या बैठकी साठी मराठा समाजातील कलाकार, लेखक, विचारवंत, संशोधक आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
सांगवीत आढळला बेवारस मृतदेह
पुणे | सांगवीमध्येऔंध कामगार वसाहती जवळ एक बेवारस मृतदेह आढळला आहे. मृतदेहावर धारधार शस्त्रांचे वार असून डोक्यात दगड घालून ओळख पुसून टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मृत व्यक्तीच्या खिशात आधार कार्ड सापडल्याने मृताची ओळख पटू शकली आहे. अजित नंदकुमार भुईया (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव असून तो झारखंडचा मूळ रहिवासी आहे.
खून मध्यरात्री झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला आहे. खून करून मृतदेह त्या ठिकाणी रात्रीच्या अंधारात आणून टाकला होता पहाटे लोक बाहेर पडल्यावर त्यांनी पोलिसांना फोन लावल्याने हा प्रकार उजेडात आला आहे. सांगवी पोलीस हत्येचा पुढील तपास करत आहेत.
नितीन गडकरींनी केली नव्या रेल्वे मार्गाची घोषणा
नवी दिल्ली | धडाडीचे निर्णय घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या नितीन गडकरी यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आणखी एका नव्या निर्णयाची घोषणा केली आहे. मनमाड – इंदोर रेल्वे मार्गाची घोषणा गडकरी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत केली आहे. ३६२ किलोमीटर लांब लोहमार्गाच्या खर्चाची अंदाजित रक्कम ८,५७४ कोटी रुपये इतकी आहे. त्याचा महाराष्ट्रात येणारा भाग १८६ किलोमीटर इतका असून मध्यप्रदेशात १७६ किलोमीटर एवढा भाग येतो आहे.
बहु प्रतिक्षित असणारा हा रेल्वे मार्ग मंजूर झाल्याने देशाच्या या भागात आनंद व्यक्त केला जात आहे. महाराष्ट्रातील खान्देशाला मध्यप्रदेशाशी जोडण्यात हा लोहमार्ग दुवा ठरणार आहे. सुभाष भामरे यांच्या लोकसभा मतदारसंघाला या लोह मार्गाचा सर्वाधिक फायदा होत असल्याने त्यांनी गडकरींचे आणि मोदींचे आभार मानले आहेत.
निलंगेकरांच्या घरासोमोर पोलीस आणि आंदोलकात बाचाबाची
लातूर | मराठा आंदोलकांनी दिनांक १ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट लोकप्रतिनिधींच्या घरा बाहेर ठिय्या देण्याचा संकल्प केला आहे. या संकल्पा नुसार मराठा आंदोलकांनी वसंतराव नाईक चौकातून मोर्चा काढून आर एस कॉलिनीतील संभाजी पाटील निलंगेकर यांच्या घराकडे मोर्चा वळवला आणि विशिष्ठ अंतरावर लावलेले बॅरिगेस्ट कार्यकर्त्यांनी तोडून लावले. तेव्हा पोलिस आणि आंदोलकांच्यात बाचाबाची झाली. आंदोलक हिंसक रूपात असल्याने पोलिसांनी माघार घेतली आणि निलंगेकरांच्या घरा समोर आंदोलकांनी ठिय्या दिला.
मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी करत मराठा आरक्षणाचा प्रश्न लवकर सोडवण्याची मागणी केली. तर संभाजी पाटील निलंगेकर यांना मराठ्यांबद्दल कणव असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली
माजी उप – सरपंचाची दगडाने ठेचून हत्या
सासवड | भिवरी गावचे माजी उपसरपंच संतोष साधू दळवी (वय ३६) यांची पूर्व वैमनस्यातून दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. यासंदर्भात साधू अनंता दळवी यांनी सासवड पोलिसात फिर्याद दिली आहे.
हाती आलेल्या माहीतीनुसार संतोष दळवी यांच्यावर गावठी कट्ट्याच्या साहाय्याने गोळी झाडण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतू तो प्रयत्न अयशस्वी झाल्याने आरोपींनी दळवी यांना दगडाने ठेचून मारले. सदरची घटना मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास घडली आहे.
दत्तात्रय कटके, भारत कटके, दादासाहेब कटके, हेमंत गायकवाड, दीपक भांडवलकर, अक्षय गायकवाड, आदेश पवार, बाळू गायकवाड, मोहन गायकवाड यांच्या विरुद्ध फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सदर सर्व आरोपी भिवरी गावचे रहिवाशी आहेत. पोलीसांनी अद्याप कोणालाच अटक केली नसुन घटनेचा तपास सासवड पोलीस करत आहेत.
आम आदमी पक्षात उभी फूट, अरविंद केजरीवाल यांची चिंता वाढली
भटिंडा (पंजाब) | आम आदमी पार्टीच्या पंजाब युनिट मध्ये सध्या बेकीचे वातावरण असून उद्या पक्षाचे प्रमुख नेते सुखपाल खैरा यांनी आपल्या समर्थकांची भटींडा येथे बैठक बोलावली आहे. सुखपाल खैरा यांना मागील काही दिवसात पक्षाने विरोधी पक्ष नेते पदावरून हटवून तेथे जातीने दलित असलेल्या हरपाल सीमा यांची नेमणूक केली होती. सीमा यांच्या नेमणुकी पासून पक्षात नाराजीचा सूर उमटत चालला आहे. पक्षाला जर दलित चेहरा पुढे करायचा आहे तर पंजाब चा प्रदेशाध्यक्ष दलित का नेमला जात नाही असा सवाल सुखपाल खैरा यांनी पक्ष नेतृत्वाला केला आहे.
दरम्यान पंजाब प्रभारी असलेले मनीष सिसोदिया यांनी भटींडामध्ये होणाऱ्या रॅलीला पक्ष विरोधी कृती म्हणले असून बंडखोरांना योग्य धडा शिकवण्यात येईल असे म्हणले आहे. सिसोदिया यांचे हे वक्तव्य म्हणजे एकाधिकारशाहीचे उत्तम उदाहरण असल्याचे सुखपाल खैरा यांनी सोशल मीडियाचा आधार घेत म्हणले आहे.
पंजाब युनिट मध्ये उधळलेली बंड खोरी पक्षासाठी धोक्याची घंटा असल्याचे बोलले जाते आहे. याच पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल पंजाबचा दौरा आखत असल्याचे बोलले जात आहे. सुखपाल खैरायांच्या सोबत पार्टीचे सात ते आठ आमदार असल्याने त्यांना पक्षांतर बंदीच्या कायद्याला सामोरे जावे लागण्याचा संभव आहे.
मंत्रालयासमोर महिलेने केला आत्महत्येचा प्रयत्न
मुंबई | जमिनीचा निकाल आपल्या विरोधात लागला या नैराश्यातून एका महिलेने मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला. मंत्रालयाच्या गेट वर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान दाखवल्याने त्या महिलेचा जीव वाचला असून मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सदर महिलेला ताब्यात घेतले आहे. राधाबाई साळुंखे असे या अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.
मंत्रालयासमोर आत्महत्या करण्याचा नवीन पायंडाच महाराष्ट्रात पडतो आहे. या आधीही बऱ्याच लोकांनी मंत्रालयाच्या समोर आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. राधाबाई साळुंखे या बीडच्या रहिवाशी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
दीपक मानकर अखेर पोलिसात हजर
पुणे | जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेले माजी महापौर दीपक मानकर आज पुणे पोलिसांसमोर हजर झाले. त्यांना अटक करून लागलीच शिवाजी नगरच्या सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. दीपक मानकर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक असून एका भूखंड खरेदी प्रकरणात दीपक मानकर आणि सुधीर कर्नाटकी या दोघांनी जितेंद्र जगताप यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप मानकर यांच्यावर आहे. मृत्यू पूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत जितेंद्र जगताप यांनी मानकर यांचे नाव लिहील्याने त्यांच्या न्यायालयात केस चालू आहे. जितेंद्र जगताप यांनी दीपक मानकर यांच्या नावाची चिठ्ठी लिहून रेल्वे खाली जीव देऊन आत्महत्या केली होती. ही घटना २ जून २०१८ रोजी घडली होती.
दीपक मानकर यांनी पुणे सत्र न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये अटक पूर्व जमीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता परंतु सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आणि त्यांना १० दिवसात पोलिसांना स्वाधीन होण्यास सांगितले होते. त्यानुसार आज मानकर पोलिसांसमोर शरण आले. जितेंद्र जगताप आत्महत्या प्रकरणात विनोद भोळे अमित एनपुरे, सुधीर सुतार, निशांत कांबळे आणि अनिल पवार यांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे.










