राज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? राज ठाकरेंचा संतप्त सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । वंचित बहुजन आघाडी, भाजप, एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे (raj thackeray ) यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray) यांना पत्र लिहून राज्यातील मंदिरं लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल करतानाच सर्वात शेवटी मंदिरं उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरं उघडण्याचा लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे.

सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?, असा सवाल करतानाच ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.

सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पावलं उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण मी आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment