हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी विश्वनाथ धामाचे ऐतिहासिक आणि आध्यात्मिक महत्त्व सांगितले. काशी विश्वनाथ धाम हे आपल्या भारतीय परंपरा, आध्यात्मिकता आणि सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे. या ठिकाणी असलेल्या जुन्या परंपरा भविष्याला दिशा देशात. येथे छत्रपती शिवाजी महाराज आले होते. त्यांचे चरण या ठिकाणी पडले होते, असे गौरवोद्गार यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील काशी विश्वनाथ धामला भेट दिली. यावेळी त्यांच्या हस्ते विश्वनाथ धामचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी उपस्थितांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, आज काशी विश्वनाथ धाम अकल्पित ऊर्जेने भरले आहे. आज येथील वैभवात आणखी विस्तार होतोय. हा नवा परिसर म्हणजे आपली भारतीय संस्कृती, आध्यात्मिकता आणि भारतीय सनातन संस्कृतीचे प्रतिक आहे. भारतीय परंपरा, ऊर्जा, गतीशीलता या ठिकाणी आल्यावर दिसून येते. या ठिकाणी केवळ श्रद्धेचेच दर्शन घडते, असे नाही तर भारताच्या गौरवशाली इतिहासाची अनुभूतीही मिळते.
काशी विश्वनाथ या ठिकाणी आपण विश्वनाथाच्या चरणी नमन करतो तेव्हा गंगेला स्पर्श करत येणारी हवा आपल्याला आशीर्वाद देते. महादेवाच्या चरणी ध्यान लावताना गंगेवरच्या लहरी आपल्याला दैवी आनंद देतात. गंगेत खूप शक्ती आहे. आजचं हे कार्य म्हणजे गंगेचा आशीर्वाद आहे,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटले.
Special day for us all. Inauguration of Shri Kashi Vishwanath Dham. https://t.co/Kcih2dI0FG
— Narendra Modi (@narendramodi) December 13, 2021
पंतप्रधान मोदींनी केले ‘हे’ तीन महत्वाचे संकल्प
पंतप्रधान मोदी यांनी यावेळी तीन महत्वाचे संकल्प केले. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक भारतीयांमध्ये परमेश्वराचा अंश आहे. त्यामुळे मी तुम्हाला काही मागू इच्छितो. हे माझ्यासाठी नाही, तर आपल्या देशासाठी तीन संकल्प करा. स्वच्छता, सृजन आणि आत्मनिर्भर भारतासाठी सततचे प्रयत्न करा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. मोदी पुढे म्हणाले की, तिसऱ्या संकल्पाची आत्ताच सुरुवात करावी लागेल. हा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आहे. आपल्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाली. जेव्हा भारताच्या स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील. तेव्हा मोठा सोहळा होईल. त्यावेळी भारत कसा असेल, त्यासाठी आत्तापासून काम करावे लागेल, असे आवाहन मोदी यांनी केले.