Raj Thackeray on Operation Sindoor। भारताने जम्मू काश्मीर येथील पहलगाम हल्ल्याचा बदला घेत रात्री 1.30 वाजता पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ उद्धवस्त केले आहेत. या ऑपरेशनला ऑपरेशन सिंदूर असं नाव देण्यात आल असून पाकिस्तानच्या नियंत्रणाखालील अनेक भागात क्षेपणास्त्रे डागली आहेत. भारताने बहावलपूर, मुरीदके, सवाई, गुलपूर, बिलाल, कोटली, बारनाला, सरजाल आणि महमूना याठिकाणी हल्ले केले. या कामगिरीनंतर संपूर्ण देशभरातून भारतीय सैन्य आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर कौतुकांचा वर्षाव होतोय. मात्र मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी कौतुक तर सोडाच, उलट एअर स्ट्राईक वरून मोदींवर (Narendra Modi) हल्लाबोल केला आहे. युद्ध किंवा एअर स्ट्राईक हा पर्याय असू शकत नाही असं म्हणत राज ठाकरेंनी आपली भूमिका मांडली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे? Raj Thackeray on Operation Sindoor
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ऑपरेशन सिंदूरद्वारे केलेल्या लष्करी कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. राज ठाकरे म्हणाले की, “पहलगामला जेव्हा हल्ला झाला तेव्हा मी जे पहिले ट्विट केले त्यामध्ये सांगितले होते की, ज्यांनी हल्ला केला त्या दहशतवाद्यांना असा धडा शिकवायला पाहिजे जो त्यांच्या पुढील पिढ्यांनाही लक्षात राहिल. पण, दहशतवादी हल्ल्याला उत्तर उद्ध नसतं. अमेरिकेत दहशतवाद्यांनी ट्विन टॉवर पाडले आणि पँटागॉनवर हल्ला केला तेव्हा अमेरिकेन त्या दहशतवाद्यांना शोधून ठार मारले. त्यामुळे दहशतवादी हल्ल्याला युद्ध हे प्रत्युत्तर नसते. त्यामुळे देशात मॉकड्रील करण्याऐवजी कोम्बिंग ऑपरेशन करा. देशातील आपलेच प्रश्न संपत नाही, अशा परिस्थितीत युद्धाला सामोरे जाणे योग्य गोष्ट नाही, असे मत राज ठाकरेंनी मांडलं.
ते पुढे म्हणाले, पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही. तसेच पाकिस्तानला काय बरबाद करणार आहे, तो आधीच बरबाद झालेला देश आहे असं राज ठाकरेंनी म्हंटल. Raj Thackeray on Operation Sindoor
भारतावर पुन्हा हल्ले होतील म्हणून एअर स्ट्राईक केला-
दरम्यान, आज भारतीय सैन्य आणि परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेत पाकिस्तान वर केलेल्या एअर स्ट्राईकबाबत संपूर्ण माहिती दिली. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी थेट संबंध आहे. किंबहुना पाकिस्तान हा दहशतवादाचा बालेकिल्ला आहे. पहलगाम हल्ल्यानंतरही पाकिस्तानने अतिरेक्यांवर कोणतीच कारवाई केली नाही. उलट आरोप करण्यातचं पाकिस्तान मग्न होता. भारतावर पुन्हा हल्ले होतील अशी गुप्त माहिती इनपूटद्वारे आम्हाला मिळाली होती, म्हणून, ते आधीच थांबवण्याची आणि रोखण्याची गरज होती…. त्यामुळे आज मध्यरात्री भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ही कारवाई अत्यंत महत्त्वाची होती. भारतात अतिरेकी पाठवण्यावर रोख लागण्यासाठी ही कारवाई होती अशी माहिती सचिव विक्रम मिस्री यांनी दिली.