हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) बँकांना आणि इतर वित्तीय संस्थांना आर्थिक फसवणूक रोखण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत. ग्राहकांना कॉल करण्यासाठी बँकांना आता विशिष्ट क्रमांक मालिका वापरण्यास सांगण्यात आले आहे. व्यवहारांशी संबंधित कॉल्ससाठी ‘१६००’ सिरीजचा वापर करण्याचे निर्देश आरबीआयने दिले आहेत. तसेच, प्रमोशनल किंवा विपणन उद्देशाने ग्राहकांना कॉल अथवा एसएमएस पाठवण्यासाठी ‘१४०’ सिरीज वापरण्याची सूचना करण्यात आली आहे.
सध्या डिजिटल व्यवहार वाढल्यामुळे फसवणुकीच्या घटना अधिक समोर येऊ लागल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या हिताचे संरक्षण करण्यासाठी या कठोर उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. RBI ने बँकांना ग्राहकांच्या डेटाबेसचे काळजीपूर्वक निरीक्षण करून अनावश्यक माहिती हटविण्यास सांगितले आहे. तसेच, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत.
याशिवाय, रद्द झालेल्या किंवा बंद करण्यात आलेल्या मोबाइल क्रमांकांशी संलग्न असलेल्या खात्यांवर अधिक लक्ष ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. जेणेकरून कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीला आळा घालता येईल. महत्वाचे म्हणजे, बँकांना ३१ मार्च २०२५ पर्यंत या सूचनांचे पालन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आर्थिक सुरक्षितता सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने RBI हे कठोर नियम जारी केले आहेत.
दरम्यान, RBI ने बँकांना आणि बिगर बँक वित्तीय संस्थांना (एनबीएफसी) ग्राहकांच्या खात्यांमध्ये नामांकित व्यक्तींची (नॉमिनी) नोंद करण्यास प्रोत्साहित करण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक खाती आणि लॉकरमध्ये नामांकित व्यक्ती नसल्याने, खातेदारांच्या मृत्यूनंतर त्यांच्या वारसांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागते. त्यामुळे, बँकांनी खाते उघडताना नामांकनाची तरतूद अनिवार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.