हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चानी जोर धरला असताना दुसरीकडे राष्ट्रवादी शरद पवार गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट या दोन्ही गटांनी (Sharad Pawar And Ajit Pawar)सुद्धा एकत्र यावं अशी मागणी राजकीय वर्तुळात सुरु झालीय.. विशेष म्हणजे पवार कुटुंबातीलच आमदार रोहित पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असे आवाहन केले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील तशीच इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चेला हवा मिळाली आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रवक्ते विकास लवांडे (Vikas Lawande) यांनी काका- पुतण्याच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर मोठं भाष्य केलं आहे… तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर कोणत्या अटीवर एकत्र येऊ शकतात ते सुद्धा सांगितलं आहे.
काय म्हणाले विकास लवांडे ?
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येतील किंवा येऊ शकतात अशा पद्धतीचे वृत्त नेहमीच येते. खरं पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात खटला सुरू आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा इंडिया आघाडी, महाविकास आघाडातील महत्त्वाचा पक्ष आहे. हा पक्ष विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे तर दुसरीकडे अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रतिगामी विचारांच्या भाजपासोबत सत्तेत आहे. दोन्ही पक्ष एकत्र यावं असं कोणाला वाटत असेल तर त्यांना माझा नम्र पणाने सांगणं आहे, जेव्हा अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेतून, महायुतीतून बाहेर पडेल, भाजपासोबतचं नातं तोडेल तेव्हाच हे दोन्ही पक्ष एकत्र येण्यावर विचार होऊ शकतं. एकत्र येण्याच्या फक्त अफवा आहेत. या बातम्यांत कुटलंही तथ्य नाही, असं विकास लवांडे यांनी स्पष्ट केलं.
दरम्यान, मागच्या काही दिवसापासून शरद पवार आणि अजित पवार यांच्यातील भेटीगाठी वाढल्या आहेत. एप्रिल महिन्यात, दोन्ही नेते ३ वेळा भेटले. २१ एप्रिल रोजी पुण्यातील साखर संकुलात आयोजित एका तांत्रिक चर्चासत्रात शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र दिसले. त्यापूर्वी १२ एप्रिल रोजी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार आणि अजित पवार एकाच मंचावर दिसले. एवढच नव्हे तर त्याच्या आधी अजित पवार यांचे पुत्र जय यांच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमालाही काका- पुतणे एकत्र आले होते. राजकारणात काहीही होऊ शकतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार हे कालही माझे दैवत होते, आजही आहेत अशा प्रकारचं भाष्य काही दिवसांपूर्वी केलं होतं. त्यामुळे दोन्ही पवार एकत्र येणार या चर्चा राजकीय वर्तुळात रंगत असतात.