मोदी 100% व्यापारी, सत्तेसाठी सोनिया गांधींच्याही दारात जातील- सामनातून टीकास्त्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे शंभर टक्के व्यापारी आहेत. व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. त्यामुळे मोदी हे पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे सामना अग्रलेखातून जोरदार निशाणा साधला आहे. तसेच ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडयांवर लटकला आहे असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

पहा काय म्हंटल सामना अग्रलेखात ?

नरेंद्र मोदी 2014 साली प्रथम सत्तेवर आले तेव्हा ‘कॉंग्रेसमुक्त भारता’चा नारा त्यांनी दिला. 2024 साली त्याच काँग्रेसने मोदींच्या गर्वाने फुगलेल्या छातीचा फुगा फोडला आहे. काँग्रेसने मुसंडी मारून भाजपच्या बहुमताचे मुंडके उडवले. किमान नऊ राज्यांतून भाजप हद्दपार झाला. भाजपला तेथे खाते उघडता आले नाही. तामीळनाडूसारख्या मोठया राज्यात भाजपला एकही जागा मिळाली नाही. पंजाब हे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यातही भाजप खाते उघडू शकला नाही. मेघालय, मणिपूर, नागालॅण्ड, सिक्कीम अशा सीमावर्ती राज्यांत भाजपची कामगिरी शून्य आहे. पुद्दुचेरी, चंदिगढमध्येही भाजप उरलेला नाही. (अर्थात मध्य प्रदेशसह बारा राज्यांत काँग्रेसची हीच दयनीय अवस्था आहे.) उत्तर प्रदेशसारख्या राज्यात काँग्रेस व समाजवादी पार्टीने मिळून भाजपला ‘अर्ध्या राज्यातून साफ केले. महाराष्ट्रातील भाजपवर तर मुंडण करून स्वतःचे श्राद्ध घालण्याची वेळ शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने आणली.

भाजपने बहुमत गमावले व नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, चिराग पासवान वगैरे प्रादेशिक पक्षांच्या कुबडय़ा घेऊनच मोदी यांना कडबोळे किंवा खिचडी सरकार बनवावे लागले. मोदी हे कॉंग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, तृणमूल कॉंग्रेसला संपवायला निघाले होते, पण मोदींना ते जमले नाही व हे पक्ष अधिक मजबुतीने उभारी घेऊन पुढे आले. शरद पवार हे भटकती आत्मा व उद्धव ठाकरे नकली संतान असल्याची भाषा मोदी यांनी प्रचारात वापरली, पण त्याच भटकत्या आत्म्याने व नकली संतानाने महाराष्ट्रातून भाजपचे ‘पिंड’ कावळय़ासह उडवून लावले व बहुमत गमावलेला मोदींचा आत्मा प्रादेशिक पक्षांच्या पिंपळावर लटकलेला दिसत आहे. चिराग पासवान यांचा ‘लोजपा’ अमित शहांनी फोडला व चिराग यांच्या काकांच्या हाती दिला. चिन्ह व पक्षही गमावून चिराग उभे राहिले. आज त्याच चिराग यांच्या टेकूवर मोदी सत्ता स्थापन करीत आहेत. मोदी यांचे धोरण हे असे आहे. उद्या ते काँगेस पक्षाचेही गुणगान सुरू करतील व सत्ता टिकविण्यासाठी गरज पडली तर सोनिया गांधींच्या दारात उभे राहतील.

मोदी हे शंभर टक्के व्यापारी आहेत व व्यापारी फक्त स्वतःचा फायदा बघतो. अमित शहा यांनी आंध्रात जाऊन तेलुगू देसमला संपविण्याची भाषा केली होती. चंद्राबाबूंना कधीच ‘एनडीए’मध्ये घेणार नाही, असेही सांगितले होते. नितीश कुमार यांचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न अमित शहा करीत असल्याचा आरोप स्वतः नितीशबाबूंनीच केला होता. आज सत्तेसाठी त्याच नितीश कुमारांचे चरणतीर्थ मोदी-शहांना प्राशन करावे लागले, कॉंगेस सत्तेवर आली तर मुसलमानांना आरक्षण देईल, असा बागुलबुवा मोदी यांनी प्रचारात उभा केला, पण चंद्राबाबू हे स्वतः मुसलमान समुदायास आरक्षण देण्याच्या बाजूने आहेत व तशी त्यांची मागणी आहे. त्यामुळे मोदी यांनी चंद्राबाबूंची मागणी मान्य केली काय? असा प्रश्न पडतो. सत्ता स्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठताना मोदी- शहा यांची दमछाक झाली. मोदी यांचा तोरा उतरला. ‘काँगेसमुक्त भारत’ करण्याच्या फंदात अर्धा भारत ‘भाजपमुक्त’ झाला व मोदींचा तोरा कुबडयांवर लटकला आहे. ‘इंडिया’ने ‘बहुमतमुक्त भाजप’ हे सत्य कृतीत आणले. तरीही मोदी यांना म्हणे जगभरातून अभिनंदनाचे संदेश येत आहेत असा दावा त्यांचे लोक करतात. हे आश्चर्यच आहे!