हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Uttan to Virar Sea Bridge । मागील काही वर्षात महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईचा मोठा कायापालट झाला आहे. अनेक ठिकाणी नवनवीन रस्ते, उड्डाणपूल उभारण्यात आले आहेत, जेणेकरून मुंबईकरांचा प्रवास सुखाचा आनंदाचा आणि आरामदायी व्हावा. आता मुंबईकरांसाठी आणखी एक प्रकल्प मंजूर झाला आहे. महाराष्ट्र सरकारने उत्तन-विरार सागरी मार्गासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) मंजूर केला, हा प्रकल्प अखेर मुंबईच्या किनारी रस्त्यांच्या नेटवर्कचा सर्वात उत्तरेकडील भाग म्हणून काम करेल.
किती कोटींचा प्रकल्प – Uttan to Virar Sea Bridge
पहिला टप्पा एकूण ५५.१२ किलोमीटर लांबीचा आहे, ज्यामध्ये सागरी मार्ग आणि रस्त्याचा समावेश आहे. यामध्ये उत्तन आणि विरार (Uttan to Virar Sea Bridge) दरम्यानचा २४.३५ किलोमीटरचा सागरी मार्ग, ९.३२ किलोमीटरचा उत्तन जोड रस्ता, २.५ किलोमीटरचा वसई जोड रस्ता आणि १८.९५ किलोमीटरचा विरार जोड रस्ता यांचा समावेश आहे. या प्रकल्पाचा खर्च ५८,७५४ कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे. त्यासाठी निधी उभारण्यासाठी, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ला परदेशी कर्जदारांकडून ४४,३३२ कोटी रुपये उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे.
वाहतूक कोंडी मिटणार –
एकूण 55.12 किलोमीटरच्या या नेटवर्कमुळे वाहतूक अधिक सुसाट होईल. पर्यावरणस्नेही डिझाइनद्वारे हा सेतू बांधला जाईल, ज्यामुळे किनारपट्टीवरील प्रवास सोप्पा होईल. सध्या दक्षिण मुंबईतून विरारला जाण्यासाठी एक तासापेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते. परंतु एका हा का उत्तन ते विरार सागरी सेतू तयार झाला तर हेच अंतर अवघ्या ४५ मिनिटांवर येईल. या नवीन सागरी सेतूमुळे उत्तर उपनगरांतील कोंडी कमी होईल, आर्थिक वाढीला चालना मिळेल आणि बंदराशी जोडणीमुळे मुंबईतही व्यापार वाढण्यास आणखी मदत होणार आहे. एकूणच काय तर मुंबईसाठी हा सागरी सेतू गेमचेंजर ठरेल यात शंकाच नाही.




