हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – 10 एप्रिल रोजी संपूर्ण देशात हवामानाची विविध रूपं पाहायला मिळणार असल्याची माहिती केंद्रीय हवामान विभागानं दिली आहे. दक्षिण भारतात कमी दाबाचा पट्टा अन तीव्र वाऱ्यांचं क्षेत्र तयार होत असतानाच, उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये उष्णतेची लाट अधिक तीव्र होत आहे. विशेषतः राजस्थान, दिल्ली अन मध्य प्रदेशमध्ये तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. तसेच महाराष्ट्रात उष्णतेची तीव्र झळ, विदर्भात यलो अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.
पुढील 24 तासात वातावरण कसे असणार (Weather Update) –
आयएमडीनं पुढील 24 तासांसाठी दक्षिण भारतात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. तामिळनाडूच्या दक्षिण भागावर आणि बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याउलट, मध्य आणि उत्तर भारतात तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातही उन्हाची तीव्र झळ जाणवणार –
राज्यात उष्णतेचं (Weather Update) प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, विदर्भात सूर्यकिरणांचा तीव्र मारा सुरूच आहे. अकोला येथे राज्यातील सर्वाधिक 44.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. यासोबतच मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातही उन्हाची तीव्र झळ जाणवत आहे.
विदर्भात यलो अलर्ट जारी –
उष्णतेमुळे बाष्पीभवन प्रक्रियेचा वेग वाढत असून, यामुळे वादळी पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होत आहे. हवामान विभागानं विदर्भात पुढील 24 तासांसाठी वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. राज्याच्या इतर भागांमध्ये आकाश अंशत: ढगाळ राहण्याची शक्यता आहे. तसेच बंगालच्या उपसागरात अन तामिळनाडूच्या दक्षिण भागात सक्रिय असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसत आहे. राजस्थानपासून विदर्भाच्या वायव्य भागापर्यंत या प्रणालीमुळे पावसाचे ढग तयार होत असून, काही भागांमध्ये हवामान (Weather Update) अचानक बदलू शकतं.