हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Weather Update – सध्या हवामानात मोठ्या प्रमाणात बदल होताना दिसतायत. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच पुन्हा एकदा राज्यात प्रचंड उष्णतेचा सामना करावा लागणार आहे. विशेषतः, अकोला येथे 44.1 अंश तापमान नोंदवण्यात आलं असून, राज्यातील अन्य भागांमध्येही पारा चाळीशीच्या पुढे गेला आहे. तसेच विदर्भातील काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवू शकतो. कोकण अन उत्तर मध्य महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि दमट वातावरण राहण्याची शक्यता आहे.
तापमानाची तीव्रता वाढणार (Weather Update) –
दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही भागांमध्ये वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. तसेच, या भागात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात सायंकाळनंतरही तापमानाची तीव्रता वाढणार आहे. तसेच मुंबईत आणि किनारपट्टी भागात तापमान काही अंशांनी कमी झाले असले तरी, हवेतील आर्द्रतेमुळे तापमानाचा दाह अधिकच जाणवत आहे. पुढील 24 तासांमध्ये मुंबईत उष्ण-दमट वातावरणाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
उष्णतेच्या लाटेचा इशारा –
IMD (Weather Update) ने राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि इतर 9 राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. राजस्थानच्या सीमाभागात 45.6 अंश तापमान नोंदवले गेले असून, इथे देशातील सर्वाधिक उष्ण क्षेत्र आहे. दक्षिण अन ईशान्य भारतातील राज्यांना वादळी वारे आणि पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. खास करून दक्षिणेकडील किनारपट्टी भागांतील नागरिकांना हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार, नागरिकांना उष्णतेच्या लाटांपासून बचाव करण्यासाठी योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.