राज्यातील 193 बस स्थानकांचे रुपडं पालटणार; प्रवाशांना दिलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | ST बस ही प्रवाश्यांची जीवनवाहिनी आहे. खिशाला परवडणारा आणि सुरक्षित प्रवास असल्याने अनेकजण ST प्रवासाला प्राधान्य देत असतात. त्यामुळे त्यामध्ये आणखी काही सुविधा मिळाव्यात ही अपेक्षाही साहजिकच आहे. त्यामुळे एसटी बसमध्ये अनेक सुविधा देण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले जातात. मात्र अनेकदा एसटी उशिराने आल्यामुळे प्रवाश्यांना बस स्थानकामध्ये बसावे लागते. मात्र जर बसण्याचे ठिकाण चांगले नसेल तर सगळा प्रवासाचा मूड जातो. या सर्वावर मार्ग काढण्यासाठी आणि प्रवाशांचा प्रवास आणखी सुखकर होण्यासाठी आता राज्यातील एकूण 193 बस स्थानकांचे रुपडं पालटणार आहे.

मुख्यमंत्र्यांनी केले होते आवाहन

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बस स्थानकांचा कायापालट करण्यासाठी एमआयडीसीने योगदान द्यावे असे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एसटी महामंडळ व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार करण्यात आला. आता त्यानुसार राज्यातील बस स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे.

एकूण 193 बस स्थानकांचे पालटणार रुपडे

राज्यात सध्या एकूण 609 बस स्थानके आहेत. त्यापैकी 563 स्थानके ही कार्यरत आहेत. स्थानके चांगले नसल्यामुळे प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत असे. म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी या बस स्थानकांचा विकास करण्यासाठी आवाहन केले होते. आता त्यामध्ये पहिल्या टप्प्यात एकूण 193 बस स्थानकांचा विकास हा हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानांतर्गंत करण्यात येणार आहे. त्यासाठी एमआयडीसी आणि एसटी महामंडळ यांच्या दरम्यान 600 कोटी रुपयाचा करार झाला आहे.

500 कोटी रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीसाठी देण्यात आले

या बस स्थानकांचा विकास करण्यासाठी देण्यात आलेल्या 600 कोटी रुपयापैकी 500 कोटी रुपये हे रंगरंगोटी व किरकोळ दुरुस्तीसाठी लावण्यात येणार आहेत. तर 100 कोटी रुपयामध्ये खर्चाची निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. या कायापालटामुळे प्रवाश्यांना होणारा त्रास तसेच एसटी चालकांना एसटी चालवण्यासाठी होणार असलेला त्रास मिटेल अशी अपेक्षा आहे.

का घेण्यात आला कायापालटाचा निर्णय?

राज्यातील बस स्थानकांमध्ये व्यवस्तीत सुविधा नसल्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत होते. तसेच स्थानकातील रस्त्यात खड्डे पडल्यामुळे आणि पावसाळ्यात या खड्यात साचलेल्या पाण्याचा चिक्खल होत असल्यामुळे प्रवाश्यांबरोबरच एसटी चालकांनाही याचा त्रास होत होता. त्यामुळे यावर्ती कायमचा तोडगा म्हणून पहिल्या टप्प्यात 193 बस स्थानकांचा विकास करण्यात येत आहे.