दिलजमाईनंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी विमानातून गाठला थेट गोवा

0
82
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : काही दिवसांपूर्वी सरकारी विमान नाकारल्यावरून राज्यपाल आणि ठाकरे सरकारमध्ये निर्माण झालेले वितुष्ट आता संपुष्टात आल्याची चिन्हं दिसत आहेत. कारण राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी नुकताच गोव्याला जाण्यासाठी सरकारी विमानाने प्रवास केला. या प्रवासासाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी ठाकरे सरकारने दिली होती. त्यामुळे आता राज्यपाल आणि ठाकरे सरकार यांच्यातील संवाद पुन्हा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

काही दिवसांपूर्वी उत्तराखंडला जाण्यासाठी निघालेल्या राज्यपालांना ठाकरे सरकारने विमान नाकारले होते. त्यामुळे राज्यपालांवर सरकारी विमानातून उतरण्याची नामुष्की ओढावली होती. त्यानंतर महाराष्ट्रात मोठे मानपमान नाट्य रंगले होते. दरम्यानच्या काळात गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांबाबत आपली बाजू मांडण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली महाविकासआघाडीचे शिष्टमंडळ राज्यपालांना भेटायला जाणार होते. मात्र, तेव्हा राज्यपाल उत्तराखंडला निघून गेले होते. त्यामुळे राज्यपालांनी ही भेट सरळसरळ टाळल्याचे बोलले जात होते.

मात्र, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा देऊन हा संवाद पुन्हा सुरु केला होता. त्यानंतर उद्धव ठाकरेही एक पाऊल पुढे टाकणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर राज्य सरकारने राज्यपालांना विमान देऊन राज्यपालांच्या कृतीला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची चर्चा आहे. सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती गंभीर झाली आहे. राज्यात कोरोना लस, रेमडिसिव्हीर इंजेक्शन आणि इतर आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. अशातच विरोधी पक्ष सरकारला फारसे सहकार्य करताना दिसत नाही. अशावेळी मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारशी संवाद साधण्यासाठी आणखी एक मार्ग उपलब्ध झाला आहे.

राज्यपाल आणि महाविकासआघाडी सरकार यांचे आतापर्यंत फारसे पटलेले नाही. मात्र, आता संकटाच्या काळात तरी हे दोघे हातात हात घालून चालणार का, हे पाहावे लागेल. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या होत्या. नूतन वर्षाभिनंदन. हे हिंदू नवे वर्ष आपणाकरिता तसेच कुटुंबातील सर्वांकरिता यश, समृद्धी, प्रगती आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो, अशी ईश्वरचणी प्रार्थना, असा मजकूर राज्यपालांच्या पत्रात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here