बिहारमध्ये मतमोजणीत जोरदार रस्सीखेच; ‘अनेक जागांवर 500-1000 मतांचाच फरक, क्षणाक्षणाला बदलतेय चित्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पाटणा । बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे. बदलत्या कलानुसार उमेदवारांचा जीव खालीवर होत आहे.
सध्या भाजपप्रणित एनडीए आघाडीवर दिसत असली तरी येत्या काही तासांमध्ये हे चित्र पुन्हा पालटू शकते. आतापर्यंतच्या माहितीनुसार बिहार विधानसभेच्या 40 जागांवर उमेदवारांमध्ये केवळ 1000 मतांचा फरक आहे. काही जागांवर हा फरक 500 मतांपेक्षाही कमी आहे. त्यामुळे पुढच्या काही तासांमध्ये महागठबंधन पुन्हा आघाडीवर येईल, असा दावा काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनी केला आहे. (major vote counting remain in bihar says EC)

बिहार विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या टप्प्यात महागठबंधनने मोठी आघाडी घेतली होती. मात्र, नंतरच्या दोन तासांत हे चित्र संपूर्णपणे पालटले असून आता भाजपप्रणित आघाडीने भक्कम आघाडी घेतली आहे. सध्याच्या घडीला एनडीए जवळपास 127 तर महागठबंधन 104 जागांवर आघाडीवर आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रिया श्रीनेत यांनी ‘आज’तक’ वृत्तवाहिनीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी इतक्या लवकर निवडणुकीच्या निकालावर भाष्य करणे चुकीचे ठरेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. अनेक जागांवर दोन उमेदवारांच्या मतात माफक फरक आहे. त्यामुळे हे चित्र नक्की पालटेल. आम्ही महागाई, रोजगार या मुद्द्यांवर निवडणूक लढवली होती. त्यामुळे आम्हाला यश नक्की मिळेल, असा दावा सुप्रिया सुळे यांनी केला.

तर दुसरीकडे बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी एच.आर. श्रीनिवासन यांनीही निकाल येण्यासाठी संध्याकाळपर्यंतचा अवधी लागेल, असे स्पष्ट केले. बिहारमध्ये आतापर्यंत केवळ 20 टक्के मतांची मोजणी झाली आहे. अजूनही 3 कोटी 10 लाख मतांची मोजणी बाकी आहे. त्यामुळे नेमके चित्र स्पष्ट होण्यास सहा-सात वाजतील, असे एच.आर. श्रीनिवासन यांनी सांगितले.

एरवी बिहारमध्ये 73 हजार मतदान केंद्रे असतात. मात्र, यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहारमधील मतदान केंद्रांची संख्या वाढवण्यात आली होती. त्यामुळे यंदा एक लाखाहून अधिक मतदान केंद्रांवरील मतमोजणी करायची आहे. या केंद्रांवर मतमोजणीच्या कमीतकमी 23 ते जास्तीत जास्त 51 फेऱ्या पार पडू शकतात. त्यामुळे मतमोजणीला आणखी वेळ लागेल, अशी माहिती एच.आर. श्रीनिवासन यांनी दिली

महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 7972630753 हा संपर्क क्रमांक Hello News या नावाने सेव्ह करा. तुमचे नाव आणि जिल्हा आम्हाला इथे कळवा. ब्रेकिंग बातम्यासाठी लॉगइन : www.hellomaharashtra.in

Leave a Comment