हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन BMC Election 2025। महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाने काल पत्रकार परिषद घेत २९ महापालिका निवडणुकीची घोषणा केली. या निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच आता खऱ्या अर्थाने लढाईला सुरुवात झाली आहे. एकूण २९ महापालिकामध्ये सार्वधिक लक्ष्य मुंबई महापालिकेवर आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंना आव्हान देण्यासाठी आणि आपलाच महापौर बसवण्यासाठी भाजपने जंग जंग पछाडलं आहे. तर भाजपची वाढती ताकद बघता उद्धव ठाकरेंनीही मनसेसोबत घरोबा करत युतीचे संकेत दिले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंची युती निश्चित असून कोणत्याही क्षणी त्याची घोषणा होऊ शकतो. मात्र तत्पूर्वी दक्षिण मुंबईत ठाकरे बंधूना डिवचणारे पोस्टर लावण्यात आले आहेत.
काय आहे बॅनरवर–
हे हिंदुत्वाचे नाही झाले, ते मराठी माणसाचे काय होणार
मुंबईकर जागा हो
एका परिवाराच्या नादी लागू नको
मुंबईचा रंग बदलू देऊ नको
मुंबई महापलिका (BMC Election 2025) हा एका कुटुंबाचा व्यवसाय नाही अशा आशयाचे बॅनर दक्षिण मुंबईत लावण्यात आले आहेत. यामध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख नसला तरी टीकेचा रोख हा ठाकरे बंधूंकडे आहे हे स्पष्ट आहे.
ठाकरे बंधुसाठी अस्तित्वाची लढाई- BMC Election 2025
दरम्यान, मुंबई महापालिका निवडणूक हि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. आधीच राज्यातील सत्ता उद्धव ठाकरेंच्या हातून गेली आहे. अनेक निष्ठावान शिवसैनिकांनी भाजप आणि शिंदे गटात उडी मारली आहे. त्यातही वर्षानोवर्षे हातात असलेली मुंबई महापालिका हातातून निसटली तर उद्धव ठाकरेंचं उरलंसुरलं अस्तित्व सुद्धा संपुष्ठात येईल. महाराष्ट्राच्या राजकारणातून ते बाहेर फेकले जातील. हीच अवस्था राज ठाकरेंची आहे. राज यांच्याकडे ना आमदार आहेत ना खासदार आहेत, त्यांची आणि त्यांच्या पक्षाची संपूर्ण भिस्त हि मुंबईवर असेल. मनसेला राजकारणात पुन्हा एकदा उभारी घ्यायची असेल तर कोणत्याही परिस्थितीत मुंबईतील ताकद दाखवून द्यावी लागेल. तर आणि तरच मनसेची महाराष्ट्राच्या राजकारणात दखल घेतली जाईल. त्यामुळे ठाकरे बंधूंसाठी मुंबई महापालिका निवडणूक खूपच महत्वाची आणि राजकीय भविष्य ठरवणारी असेल.




