हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मासिक पाळी हि फक्त मुली-स्त्रीयांची समस्या नसून ही एक सामाजिक समस्या आहे. मासिक पाळी म्हणजे चार-चौघात न बोलण्याचा विषय. त्यामुळे पाळीविषयी खुलेआम चर्चाच होत नाही, आपण सर्वजण जन्माला आलो आहोत ते या अस्तराच्या कृपेमुळेच. आणि त्यालाच आपण अपवित्र, अशुद्ध आणि विटाळ मानतो. नैसर्गिक क्रियेचा एवढा बाऊ का करावा? या कारणास्तव विकसनशील देशामध्ये अनेक वर्षापासून मासिकपाळीच्या काळात मुली –स्रियांनी काय करावं, काय करू नये, यावरचा वाद सुरू आहे. धर्म, परंपरा, चालीरितीच नाव घेताना काही परंपरा मात्र आपण विसरत आहोत का ? खरे पाहता आपण सर्वच एका स्त्रीच्या उदरात जन्मलो. हेच मासिकपाळीचे रक्त आईच्या गर्भाशयात असताना आपले सरक्षण व पुरक पोषक वातावरण देत असते. ज्या रक्ताने आपली वाढ केली ते रक्तच आपण विटाळ ठरवायचे का?
“युनिसेफच्या २०१२ च्या अहवालानुसार ८७ % महिला मासिक पाळीच्या दिवसांमध्ये चिंध्या (कापड) वापरतात .७९% महिलांचा या दिवसांमध्ये आत्मविश्वास कमी होतो. तर ३६% मुलीच मासिक पाळीच्या दरम्यान शाळेत जातात .तर २३% मुलींचे शाळा गळतीचे प्रमाण आहे. कारण शाळेत आजही पाण्याची सोय नसणे ,अस्वच्छ शौचालय व सॅनिटरी नॅपकीनच्या विल्हेवाटीसाठी पुरेशा सोयी सुविधा आजही उपलब्ध नाहीत. राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वानुसार “मासिक पाळी आरोग्य आणि व्यावस्थापन” हा सामाजिक प्रश्न असून समाजातील आणि कुटुंबातील बंधने व नियम बदलण्याची गरज आहे. मासिक पाळीमध्ये स्रीया–मुली अपवित्र असतात, तिला स्पर्श वर्ज असतो, मासिक पाळीचे रक्त अपवित्र /घाण असते म्हणून तिला बाजूला बसविले गेले पाहिजे इ. अशास्त्रीय बाबी ज्या आपण अनेक पिढ्यान पिढ्या सांभाळत आलो आहोत .हे समाजाच्या मानसिकतेमध्ये खूप खोलवर रुजले आहे.
आज ह्या सर्व पितृप्रधान परंपरा आणि गैरसमज यांनाच प्रश्न विचारणे गरजेचे आहे. मासिक पाळी संबंधी गैरसमज, अंधश्रद्धा तसेच यासोबत जोडले गेलेले कलंक जर दूर करायचा असेल, तर या विषयी “चुप्पी” तोडण्याची गरज आहे. सर्वानीच मासिक पाळीच्या स्वच्छतेला प्रोत्साहन देणे, याविषयावर बोलण्याची व आवश्यक पावल उचलण्याची गरज आहे . मासिक पाळीच्या स्वच्छतेवर लक्ष ठेवल्यामुळे स्थिरतेवर सकारात्मक परिणाम होऊ शकतो. स्वच्छता व लैंगिक शिक्षण यामुळे स्रीया व मुलींना त्यांच्या शरीराविषयी वैद्यानिक माहिती व काळजी कशी घेता येईल .तसेच स्रीया व मुलींचे जीवनमान सुधारण्यावर प्रभाव टाकण्यासाठी पुरेसे पाणी व स्वच्छता असणे आवश्यक आहे.
युनिसेफच्या माहितीनुसार मासिक पाळीसंबधी आरोग्य सुधारण्यासाठी व संवाद वाढविण्याची गरज आहे .असे असूनही याबाबतीत खूप कमी प्रयत्न झाले असल्याचे दिसून येते. मात्र परंपरेने हा विषय सहन करण्याच्या व न बोलण्याच्या वर्गात टाकून दिला. पण या लाजेपायी, न बोलाण्यापायी असंख्य प्रश्न आज हि निर्माण होत आहेत. हे लक्षात घेणे व यावर काम करणे आता महत्वाचे वाटते.
BBCने २०११ साली केलेल्या एका अभ्यासात या प्रश्नाचं प्रतिबिंब पडल्याचे दिसते भारतातल्या महिलांमध्ये जननसंस्थेशी निगडीत ७०% आजार हो मासिक पाळी दरम्यान अस्वच्छतेमुळे होतात. वारंवारच्या जंतुसंसर्गामुळे गर्भाशयाच्या कॅन्सर सारखे गंभीर आजार तर संभवातातच पण गर्भाशयाभोवती सुज येऊन कंबरदुखी व पोटदुखी कायमची मागे लागण्याच प्रमाणही भारतीय महिलांमध्ये लक्षणीय आहे. असे अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे.
“मुली व महिला मासिक पाळीबद्दल बोलत नाहीत म्हणजे सर्व काही ठीक चाललय अस नाही. उलट याविषयी न बोलण्यामुळे त्या संदर्भातल्या खाजगी व सार्वजनिक प्रश्नांची व्याप्ती समाजासमोर येत नाही. हे अधोरेखित करत मासिक पाळी विषयीची कोंडी, स्वच्छता व्यवस्थापनाची भूमिका यांना चालना देण्याची वेळ आली आहे कारण मासिक पाळी हि प्रजनन क्षमता व मातृत्व यांच्यातील संबंध स्त्रीत्वाशी निगडीत आहे .
म्हणूनच २०१२ मध्ये सार्वजनिक आरोग्यमध्ये असलेल्या अनेक महत्वाच्या गटांनी मासिक पाळीवर मासिक शांतता भंग करणे सुरु केले व जगभरातील मासिक पाळीवरील असणाऱ्या समस्यांकडे लक्षवेधून सुरुवात केली .तेव्हापासून २८ मे हा मासिक पाळी (वार्षिक जागरुकता दिवस ) म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो .
– सुलक्षणा रुपेश सावंत सामाजिक कार्यकर्त्या
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा