Weather Update| महाराष्ट्रातील (Maharashtra) अनेक भागांमध्ये उन्हाच्या झळा बसायला लागल्या असतानाच अवकाळी पावसाचा अंदाज हवामान खात्याकडून (Meteorological Department) व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये सोमवारपासून पुढील तीन दिवस हलक्या पावसासोबतच गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. (Weather Update)
हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिमेकडून वाहणारे थंड वारे अरबी समुद्र ओलांडून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात पोहोचत आहेत. याचवेळी, बंगालच्या उपसागरावरून येणारे बाष्पयुक्त वारे मध्य प्रदेशाच्या दिशेने सरकत आहेत. या दोन्ही प्रकारच्या वाऱ्यांची टक्कर पश्चिम मध्य प्रदेश तसेच नंदूरबार, धुळे आणि जळगावच्या उत्तरी भागात होण्याची शक्यता आहे. यामुळे ३ ते ५ फेब्रुवारी या कालावधीत तुरळक ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी बरसतील.
हलक्या पावसाची शक्यता (Weather Update)
दरम्यान, राज्यात पुढील आठवडाभर ढगाळ वातावरण राहणार असल्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. बंगालच्या उपसागरातून ताशी ३० ते ३५ किमी वेगाने वाहणारे आर्द्रतायुक्त वारे महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहेत. परिणामी, राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ हवामान राहील. मात्र, हलक्या पावसाची शक्यता केवळ उत्तर महाराष्ट्रापुरती मर्यादित असेल. इतर भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण राहील आणि तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, उत्तर महाराष्ट्रात गारपीट झाल्यास रब्बी हंगामातील पिकांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या पुढील अंदाजाकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे. तसेच, शेतकऱ्यांनी आपल्या पिकांची काळजी घ्यावी.