औरंगाबाद : कोरोनाच्या जागतिक संकटाने तत्त्वज्ञानापासून ते सामान्य जीवन संघर्षाचे पैलू नव्याने पाहायला लावले. सोशल डिस्टन्सिंगमुळे बाहेरील व्यक्ती भेटत नसल्याने रोगापेक्षा उपाय भयंकर, असे म्हणण्याची वेळ आधीच विजनवासाचे चटके सोसत असलेल्या वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांवर आली आहे.
कोरोनाचे नियम काहीही असो. आप्तांनीही पाठ फिरवलेल्या अनेक आश्रमांतील वृद्धांची अशीच माणूस भेटीसाठी घालमेल होत आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण राज्यात संचारबंदी करण्यात आली होती. आरोग्याच्या अनेक समस्यांशी लढा देत असलेल्या ज्येष्ठांना या वयात धावपळ करणे शक्य होत नाही. अशावेळी युवासेनेच्या वतीने कांचनवाडी येथील मातोश्री वृद्धाश्रमात रोगप्रतिकारक शक्ति वाढविण्यासाठी व्हिटॅमिन – सीच्या औषधी वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाचे आयोजन युवासेना सरचिटणीस धर्मराज दानवे यांनी केले होते. याप्रसंगी उपशहर प्रमुख – ऋषिकेश मुळे, मधुर चव्हाण, सागर भारस्कर, कृष्णा मोटे, राजेश बनकर, शिवा आहेर, देविदास खरात, आकाश दानवे, हरीश पाटील, शुभम शिंदे यांच्यासह युवासेनेचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.