सलग तिसऱ्या वर्षी भरले जायकवाडी धरण; 18 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण अशी ख्याती असलेले जायकवाडी धरण सलग तिसऱ्या वर्षी भरत आले आहे. या वर्षी हे धरण तब्बल 95 टक्के भरले आहे. हे धरण एका दशकात फक्त दोन ते तीन वेळा भरत असते. मात्र, दशकाच्या पहिल्याच वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्यात उत्साहाचं वातावरण निर्माण झाले आहे. जायकवाडी धरणाचा जलसाठा 95 टक्के पेक्षा जास्त झालेला असताना पाणलोट क्षेत्रातून 1 लाख 38 हजार क्‍युसेक अशा मोठ्या क्षमतेने आवक सुरू झाल्याने जायकवाडी धरणाचे 18 दरवाजे बुधवारी सकाळी 11 वाजून सात मिनिटांनी अर्ध्या फुटाने वर उचलून 9 हजार 432 क्‍युसेक गोदापात्रात विसर्ग सुरू करण्यात आला. आवक लक्षात घेता टप्प्याटप्प्याने विसर्गात वाढ केली जाईल असे मुख्य अभियंता विजय घोगरे यांनी स्पष्ट केले. दरम्यान गोदावरी पात्रात विसर्ग केल्याने गोदावरी दुथडी भरून प्रवाही झाली.

गोदावरी नदीच्या पात्रात विसर्ग सुरू करण्यात आल्याने प्रशासनाच्यावतीने गोदाकाठावरील गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या धरणात एक लाख 38 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू असून धरण 95 टक्के भरल्याने परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये, म्हणून प्रशासनाने आज धरणातून विसर्ग सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या हस्ते धरणात दाखल झालेल्या नवीन पाण्याचे विधीवत जलपूजन करून दरवाजे उघडण्यात आले. यावेळी धरणाचे 10 ते 27 क्रमांकाचे दरवाजे सहा इंचांवर उचलून प्रत्येकी 524 क्युसेक असा एकूण 9 हजार 432 क्युसेक विसर्ग गोदावरी पात्रात करण्यात आला.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संभाजी गव्हाणे, मुख्य अभियंता विजय घोगरे, कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव, उपकार्यकारी अभियंता प्रेरणा बागुल, ज्ञानदेव शिरसाट, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, नगरपालिका मुख्याधिकारी संतोष साबळे, शाखा अभियंता विजय काकडे आदी उपस्थित होते.

Leave a Comment