महाविकास आघाडी सरकारने ६ व्यांदा केली कोरोना टेस्टच्या दरात कपात; ‘हा’ आहे नवीन दर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यात कोरोना संसर्गावर पूर्णपणे नियंत्रण मिळवण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने सातत्याने महत्त्वाची पावले टाकत असून आज पुन्हा एकदा कोरोना चाचण्यांच्या दरात कपात करण्यात आली आहे. कोरोना चाचण्यांच्या दरामध्ये राज्य शासनाने सहाव्यांदा कपात केली असून आता चाचणीसाठी ९८० रुपयांऐवजी ७०० रुपये हा दर निश्चित करण्यात आला आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेत घोषणा केली.

विधानसभेत पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना आरोग्यमंत्री बोलत होते. राज्यात कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला नसला तरी नवीन रुग्णांची संख्या कमी होत आहे. ही दिलासादायक बाब आहे. मात्र, अजूनही नागरिकांनी खबरदारी बाळगणे आवश्यक आहे. राज्याचा रुग्णवाढीचा दर हा ०.२१ इतका असून केंद्र शासनाच्या पोर्टलवर रुग्णवाढीचा दर जास्त असलेल्या १४ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश नसल्याचे यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात कोरोना चाचण्यांचे दर सातत्याने कमी केले जात आहेत. केंद्र शासनाने निश्चित केलेल्या ४५०० रुपयांवरुन आता ७०० रुपयांमध्ये खासगी प्रयोगशाळेत कोरोना चाचण्या होणार आहेत. राज्य शासनाने कोरोना उपाययोजनांसदर्भात निर्णय घेताना सामान्य माणूस केंद्रबिंदू ठेऊन निर्णय घेतले. चाचण्यांचे दर कमी करतानाच खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राखीव ठेवल्या. ‘एचआरसीटी’ चाचण्यांचे दर निश्चित केले. प्लाझ्मा बॅगचे दर देखील निश्चित करण्यात आले. मास्कच्या किमतीवरही नियंत्रण आणले गेले. या सर्व उपाययोजना करतानाच नागरिकांना प्रतिबंधात्मक उपाययोजनांकरिता ‘ माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ सारख्या मोहिमेद्वारे आरोग्य तपासणीसोबतच जाणीव-जागृती देखील करण्यात आली, असे टोपे म्हणाले.

लसीकरणासाठी बूथ उभारणार!
राज्यात कोरोना काळात सर्व नागरिकांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजना लागू करण्यात आली. त्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले. त्याचवेळी राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मोफत रक्त देण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे, असे आरोग्यमंत्री टोपे यांनी सांगितले. राज्यात कोरोना लसीकरणाची तयारी सुरू असून केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. मतदानाच्या प्रक्रियेप्रमाणे बूथ बनवून लसीकरण करण्यात येणार आहे, असेही टोपेंनी स्पष्ट केले. राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदांच्या भरतीला चालना मिळाली असून त्याची प्रक्रिया लवकरच सुरू होत असल्याचेही आरोग्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment