हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Maharashtra Politics । मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसने स्वबळाचा नारा देत महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसच्या या भूमिकेमुळे उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंसोबत मुंबई महापालिकेची निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित झाल्यानंतर आता काँग्रेनही मुंबई महापालिकेसाठी नवा भिडू शोधल्याच बोललं जात आहे. मुंबईत काँग्रेस आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीची युती होण्याची चर्चा आहे.
मुंबईत अनुसूचित जाती प्रवर्गातील ४९ जागा- Maharashtra Politics
खरं तर काँग्रेसने यापूर्वी आम्ही मुंबई महापालिका निवडणुकीच्या सर्वच्या सर्व २२७ जागा स्वबळावर लढू अशी घोषणा केली आहे, मात्र त्याचवेळी आम्ही समविचारी पक्षांसोबत चर्चा करू असेही काँग्रेसकडून सांगण्यात आलं होते. आता याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. मुंबईत अनुसूचित जाती प्रवर्गातील ४९ जागा आहेत. याठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा फायदा काँग्रेसला होऊ शकतो असं मानले जात आहे. काँग्रेस आणि वंचित एकत्रितपणे निवडणुका लढले तर हि मते काँग्रेसकडे शिफ्ट होऊ शकतात अस राजकीय विश्लेषकांचे मत आहे. त्याचमुळे काँग्रेस वंचित आघाडीसोबत युती करण्यासाठी इच्छुक असल्याचे बोललं जात आहे. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणातील (Maharashtra Politics) हि नवीन युती असेल.
दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची युती जवळपास निश्चित मानली जातेय. कधीही त्यांच्या युतीची घोषणा होऊ शकते. आता शरद पवारांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. काँग्रेससोबत आघाडी करायची कि ठाकरे बंधूना साथ द्यायची ? या पेचात शरद पवार असतील. काही दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची थेट सिल्वर ओकवर जाऊन भेट घेतली होती. या भेटीनंतर शरद पवार मुंबईत ठाकरे गटासोबत निवडणूक लढवतील असं बोललं जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अंतिम घोषणा त्यांच्या पक्षाकडून करण्यात आलेली नाही. परंतु शक्यतो शरद पवार हे मुंबईत ठाकरे बंधूना साथ देतील अशी शक्यता वर्तवण्यात येतेय.




