सातारा जिल्ह्यातील ‘या’ निसर्गरम्य ठिकाणाला एकदातरी भेट द्याच…; सिनेसृष्टीलाही पडलीय भुरळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पावसाळा ऋतू असल्याने आठवड्यातील शनिवार आणि रविवार हा आला कि पर्यटक पर्यटनाच्या ठिकाणी हजेरी लावू लागले आहेत. सातारा जिल्ह्यातही अशी पर्यटनाची काही ठिकाणे आहेत कि त्या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने भेटी देतायत. जिल्ह्यातील अशा पर्यटन ठिकानांची भुरळ हि सिनेसृष्टीलाही पडली आहे. सातारा जिल्हा हा खरे तर देशातील सर्वोत्तम पर्यटन जिल्हा मानला जातो आहे. या जिल्ह्यातील वाई तालुकाही पर्यटनाच्या दृष्टीने समृद्ध आहे. महाभारतकाळातील विराट राजाची नगरी अशी वाईची ओळख आहे. या ठिकाणी निसर्गासह धार्मिक, ऐतिहासिक अशी अनेक ठिकाणी पहायला मिळतील.

कृष्णा नदीच्या काठावर दक्षिण काशी म्हणून वाई हे विख्यात धार्मिक क्षेत्र आहे. कृष्णा नदीवर अनेक घाट व प्राचीन मंदिरे आहेत. सरदार रास्ते यांनी वर्ष 1672 मध्ये एकाच दगडातून घडविलेली ढोल्या गणपतीची भव्य मूर्ती, सिध्देशार मंदिर, त्यातील सिध्दनाथची संजीवन समाधी, गंगा रामेश्वर, काशी विश्वनाथ, लक्ष्मी नारायण, समर्थ रामदास स्वामी स्थापित रोकडोबा हनुमान मंदिर अशी मंदिरे आहेत.

Dholaya Ganpati temple

वाईचे ‘हे’ आहे खास वैशिष्टय

स्वामी केवलनाद यांनी येथे वेदशास्त्राची शिकवण देणाऱ्या प्राज्ञ पाठशाळेची स्थापना केली. मराठी विश्वकोशाचे प्रकाशन वाई येथूनच होते. वाईहून पाचगणीकडे जातला पसरणीच्या घाटाच्या सुरुवातीलाच सरकारचे रेशीम उत्पादन केंद्र आहे. येथे 30 एकर क्षेत्रावर तुतीची लागवड होत असून त्यावर रेशमी किडे पोसले जातात.

Dholaya Ganpati

ढोल्या गणपती

ढोल्या गणपती मंदिरामुळे वाईची प्रसिध्दी वाढली आहे. गणपती आळीच्या घाटावर कृष्णा तीरी हे वाईतील सर्वात मोठे व भव्य मंदिर पेशव्यांचे सरदार गणपतराव भिकाजी रास्ते यांनी बांधले, गाभाऱ्यात गणपतीची पाषाणाची 6 फूट उंच व लांबी 7 फूट अशी बैठी मूर्ती आहे. मंदिराच्या भव्य सभागृहाच्या तिन्ही बाजूंनी कमानी आहेत. गणपती मंदिराजवळ काशिविश्वेश्वर शंकराचे मंदिर आहे. पूर्वेस महाव्दार व त्यावरती नगारखान्याची खोली आहे. मंदिरासभोवताली तटबंदीची उंच व रूट अशी भित आहे. महाव्दारातून आत गेल्यावर दगडी महर, दोन दीपमाळा व नंदी मंडप दिसतो. या नदीची भव्य मूर्ती कुळकुळीत जसा चकचकीत पाणी व सुबक आहे. सामान्य खालक खाली शिवलिंग आहे.

Dhom Dam

धोम धरण

वाईपासून सुमारे 10 कि.मी. अंतरावर असलेले धोम धरण प्रसिद्ध आहे. येथेच कृष्णा नदीच्या काठावर बांधलेले महादेवाचं मंदिर पाहण्यासारखं आहे. भुईज हे गाव सातारा-पुणे रस्त्यावर वसले आहे. भृंग ऋषींची समाधी येथे आहे. त्या नावावरुन या गावाला भुईज नाव पडले. मंदिराच्या खाली ऋषींची समाधी व ध्यान धारणेची खोली आहे.

Kalubai Temple, Mandhardev

काळूबाई मंदिर, मांढरदेव

महाराष्ट्रामध्ये प्रसिध्द असलेले व लाखो भाविकांचे कुलदैवत असलेले काळुबाई देवीचे स्थान हे वाई तालुक्यातील मांढरदेवी डोंगरावर आहे. डोंगराच्या पठारावर मांढरदेव हे गांव आहे. या पठराची समुद्र सपाटीपासून उंची 4517 फूट आहे. काळूबाईचे मंदिर किमान 350 वर्षांपूर्वीचे आहे.

minavali ghat

मेणवली

वाई तालुक्यातील कृष्णा नदी काठी असलेले मेणवली गावात पेशवाईतील एक मुत्सद्दी व राजकारणी नाना फडणवीस यांचा गढीचा वाडा आहे. कृष्णा नदीच्या काठावरील केदार घाट व मंदिर प्रेक्षणिय आहेत. घटावरील एका छोट्या मंदिरात भली मोठी धातूची घंटा अडकविली आहे. वसई युध्दातील विजयानंतर चिमाजी अप्पा यांनी येथील किल्ल्यावरुन पोर्तुगीजांची ही एक क्विंटल वजनाची घंटा येताना विजय चिन्ह म्हणून आणली होती. नदी काठावरील घाट चंद्रकोरी आकाराचा असून मेणवलेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. पांडव गड वाई शहरापासून 6 किमीवर वायव्य दिशेला हा गड आहे. चौकोनी आकाराचा माथा असलेला हा गड आहे. पन्हाळ्याचा शिलाहार राजा भोज याने इ.स. 1200 च्या दरम्यान हा किल्ला बांधला. गडावर जाण्यासाठी पहिला डोंगर चढून दुसरा उंच डोंगर चढावा लागतो. वाटेत विहीरी आहेत. पायवाट अरुंद व धोक्याची आहे. माच्यावर पाण्याची अनेक तळी आहेत. पडलेल्या वाड्याच्या मध्यभागी पांडजाई देवीचे व दुसरे एक अशी देवीची दोन मंदिरे आहेत.

Vairatgarh Fort

वैराटगड किल्ला

सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर डोंगररांगेतील हा किल्ला ट्रेकर्स च्या दृष्टीने मध्यम समजला जातो. वैराट गड हा वाई प्रांतात येणारा किल्ला आहे. वाई पासून 8 कि.मी. अंतरावर असणारा हा किल्ला एका दिवसात पाहून येऊ शकतो. 3 हजार 340 फूट उंचीचा हा किल्ला गिरीदुर्ग प्रकारातील आहे. पायथ्याच्या गावापर्यंत जाणाऱ्या बसेस व इतर गाड्या यामुळे या परिसरातील भटकंती फारच सोपी आहे. वैराटगड हा शिलाहार राजा भोज याने अकराव्या शतकात बांधला. शिवकाळातही किल्ला केवळ एक लष्करी ठाणे म्हणूनच वापरात होता.

शिवरायांनी जेव्हा वाई प्रांत जिंकला तेव्हा ह्या परिसरातील वैराटगड, पांडवगड हे किल्ले देखील स्वराज्यात सामील करून घेतले. पुढे 1818 मध्ये किल्ला इंग्रजांनी ताब्यात घेतला. गडावर थोड्याफार प्रमाणात काही पडक्या वस्तूंचे अवशेष आहेत. प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूस कड्याच्या खालच्या बाजूस पाच ते सहा टाकी आहेत. उजव्या बाजूस छोटी गुहा आहे. साधारणतः 20 ते 25 पायऱ्या चढून गडावर पोहचता येते. डाव्या हातालाच मारुतीचे मंदिर आहे. तर मंदिराबाहेर सुद्धा मारुतीची एक मूर्ती आहे. आजुबाजूला काही प्रमाणात चौथरे दिसतात. गडाची तटबंदी अजूनही बऱ्याच प्रमाणात शाबूत आहे. गडावर एक सदर आहे. तिची रुंदी साधारण 10 फूट आहे. गडाच्या प्रवेशद्वाराच्या विरुद्ध दिशेला कड्यामध्ये एक खाच आहे.

Kamalgad Fort

किल्ले कमळगड

धोम धरणाच्या जलाशयाच्या मागील बाजूने एक डोंगररांग पुढे आलेली आहे . दोन्ही बाजूंनी पाण्याचा वेढा असलेल्या या डोंगररांगेतून काळ्या पाषाणाचा एक डोंगर मान वर काढून आल्यासारखा उंचावला आहे. त्याचे नाव आहे ‘कमळगड ‘. रुढार्थाने सर्व किल्ल्यांवर असणारी तट – बुरूज असे कोणतेच अवशेष या किल्ल्यावर नाहीत . पण या सर्वांहून न्यारा असा टवटवीत निसर्गाचा अमाप खजिना कमळगडास लाभला आहे.