हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Mumbai Local Train । मुंबई लोकलने दररोज लाखो प्रवासी प्रवास करत असतात. लोकांचा प्रवास सुखकर, आरामदायी आणि जलद पद्धतीने व्हावा यासाठी मध्ये रेल्वे सातत्याने प्रयत्नशील असते. आताही प्रवाशांच्या भल्यासाठी सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा बहुप्रतिक्षित पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉरला मंजुरी देण्यात आली आहे. या नव्या कॉरिडॉरमुळे आता नवी मुंबईतून थेट वसईत जाता येणार आहे. पनवेल-बोरीवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडोर मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (Mumbai Urban Transport Project) म्हणजेच एमयूटीपीच्या 3 बीच्याअंतर्गत विकसित केला जाणार आहे.
कसा असेल नवीन प्रकल्प ? Mumbai Local Train
सध्याच्या घडीला नवी मुंबईहून बोरिवली किंवा वसईला जायचं म्हंटल तर प्रवाशांना कुर्ला किंवा वडाळ्याला जावे लागते, तेथून ट्रेन (Mumbai Local Train) बदलावी लागते, त्यामुळे साहजिकच प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. परंतु आता पनवेल-बोरिवली-वसई लोकल ट्रेन कॉरिडॉरमुळे प्रवाशाना थेट आणि कुठेही न उतरता प्रवास करता येईल. पनवेल-बोरिवली-वसई हा उपनगरीय लोकल रेल्वे कॉरिडॉर 69.23 किमी लांबीचा असेल आणि त्यासाठी 12,710 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. या मार्गावर एकूण 19 नवीन स्थानके बांधली जाणार आहेत. यामध्ये जुचंद्र, कामन रोड, पाये गाव, खरबाव, डुंगे, कलवार, भिवंडी रोड, पिंपळस, नवी डोंबिवली, कोपर, निळजे, नांदवली, नारिवली, निघू, तळोजे पानचंद, पिंढार, नवाडे रोड, कळंबोली, तेंबोडे, नवीन पनवेल यांसारख्या महत्त्वाच्या भागांचा समावेश असेल.
भिवंडीला विशेष फायदा –
69.23 किमी मार्गाच्या या उपनगरीय लोकल सेवेमुळे (Mumbai Local Train) नवी मुंबई परिसरातून मुंबईच्या पश्चिमेला सहज जाता येणं शक्य होणार आहे. नोकरीसाठी नवी मुंबईतून वेस्टर्न लाईनला येणाऱ्या चाकरमान्यांना याचा विशेष लाभ होईल. तसेच या प्रवाशांच्या वेळेची बचतही होईल. परंतु त्यापेक्षाही सर्वात जास्त फायदा कोणाला होणार असेल तर तो भिवंडीकरांना होणार आहे. ‘लूम पॉवर इंडस्ट्री’ अशी ओळख असलेल्या भिवंडी शहराला आता नवी मुंबई आणि पश्चिम मुंबईशी थेट कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. याशिवाय शिळफाटा रोडवरील पलावा, रुणवाल सिटी यांसारख्या मोठ्या गृहनिर्माण प्रकल्पातील रहिवाशांनाही बोरिवली, वसई आणि पनवेल गाठण्यासाठी नवा पर्याय मिळेल. हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर मुंबईच्या उपनगरीय रेल्वेवरील ताण मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे.




