Tuesday, December 9, 2025
Home Blog Page 6714

धर्मनिरपेक्षता जपणं महत्वाचं – वंदना चव्हाण

Vandana Chavan
Vandana Chavan

पुणे | सुनिल शेवरे

भारत हा विविधतेचा देश आहे. या देशांत राहणाऱ्या प्रत्येकाला सरकार विरोधात टीका करण्याचा अधिकार आहे असं मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या खासदार वंदना चव्हाण यांनी व्यक्त केलं. पुण्यात आयोजित राष्ट्रवादी पक्षाच्या स्नेहमेळाव्यात त्या बोलत होत्या. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेच्या माध्यमातून दिलेलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य आज हिरावुन घेतल जात आहे. आताच्या विचारवंतांना नक्षलवादी म्हणून पकडून अटक करत आहेत, या देशात सर्व जाती धर्माची माणस राहतात आणि आपला पक्ष सर्वधर्मसमभावाची नेहमी कास धरून आहे. काहीही झालं तरी धर्मनिरपेक्षता जपणं महत्वाच आहे. सध्याचं हुकमी सरकार आहे उलथुन टाकण्याची ताकद राष्ट्रवादीत आहे आणि त्यासाठी सज्ज व्हा, असंही त्या म्हणाल्या. येत्या निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ. दरम्यान अधिक क्षमतेने काम करता येण्यासाठी लोकांना पदमुक्त करा म्हणजे, अस आवाहनही चव्हाण यांनी पक्षश्रेष्ठींना केलं.

या स्नेहमेळाव्यात पुणे शहर अध्यक्ष चेतन तुपे, शहर उपाध्यक्ष कृष्णकांत कुदळे, दत्तात्रय धनकवड़े आदी उपस्थित होते.

बाॅयफ्रेंड सोबत पळून जाण्यासाठी तिने रचला स्वत:च्याच हत्येचा कट

Thumbnail
Thumbnail

बाराबंकी | एका विवाहीत महिलेने बाॅयफ्रेंन्ड सोबत पळून जाण्यासाठी स्वत:च्याच हत्येचा कट रचल्याचा धक्कादायक प्रकार उत्तर प्रदेशात घडला आहे. याप्रकरणी उ. प्रदेश पोलीसांनी आरोपी महीला रुबी आणि तिचा बाॅयफ्रेंड रामू यांना अटक केली आहे. तर रुबीची हुंड्यासाठी सासरच्या लोकांनी हत्या केली आहे अशी तक्रार पोलीसांत करणार्या रुबीच्या वडीलांविरोधात दिशाभूलीचा गुन्हा दाखल केला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, रुबी हीचे बाराबंकी येथे राहणार्या राहूल नावाच्या मुलासोबत जानेवारी २०१६ मधे लग्न झाले होते. मात्र लग्नानंतर रुबीची ओळख रामू नावाच्या मुलासोबत झाली. रुबी आणि रामू यांच्यात प्रेमसंबंध प्रस्थापित झाले. बाॅयफ्रेंन्ड रामू याच्यासोबत लग्न करता यावे यासाठी रुबीने चक्क स्वत:च्याच हत्येचा कट रचला. त्यानुसार वडील हरिप्रसाद यांनी आपल्या मुलीचा सासरच्या लोकांनी हुड्यासाठी खून केला असल्याची तक्रार सफदरगंज पोलीस स्थानकात केली. पोलीसांना काही गोष्टी संशयास्पद वाटल्याने आणि रुबीचा मृतदेह सापडला नसल्याने एफआरआय दाखल करुण घेण्यास नकार दिला. हरिप्रसाद यांनी न्यायालयात धाव घेतली. नंतर न्यायालयाच्या आदेशावरुन जून २०१८ मधे पोलीसांनी रुबीचा पहीला नवरा राहूल याच्याविरोधात एफआरआय दाखल करुन घेतला आणि रुबीचा शोध सुरु केला. यादरम्यान रुबीचे फेसबुक अकाऊंट एक्टीव्ह असल्याचे पोलीसांच्या लक्षात आले. रुबीचा मोबाईल ट्रेक केल्यावर ती दिल्लीमधे राहत असल्याचे पोलीसांना समजले. त्यानुसार उ. प्रदेश पोलीसांची टीम दिल्लीत दाखल झाली आणि रुबी व तिचा बाॅयफ्रेंड रामू ला अटक करण्यात आली.

पोलीसांच्या चौकशी दरम्यान रुबीने तिचा बाॅयफ्रेंड रामू याच्यासोबत लग्न करता यावे यासाठीच स्वत;च्या हत्येचा कट रचल्याचे समोर आले.

जैन मुनी तरुण सागर यांचे ५१व्या वर्षी दिल्लीत निधन

Thumbnail
Thumbnail

नवी दिल्ली | जैन मुनी तरुण सागर यांचे आज पहाटे निधन झाले आहे. त्यांना कावीळ आजाराने बऱ्याच दिवसांपासून ग्रासले होते. तरुण सागर हे आपल्या कडव्या प्रवचनासाठी प्रसिद्ध होते.आपल्या प्रवचनातून राष्ट्रवाद आणि मानवतावाद सर्वदूर पेरणारे संतमुनी म्हणून त्यांची ख्याती होती.
तरुण सागर हे गेल्या काही दिवसापासून कावीळ आजाराने बाधित होते. त्यांचे शरीर उपचाराला साथ देत नव्हते. त्यामुळे त्यांनी जैन धर्मात पवित्र मानला जाणारा संतरा घेण्याचे ठरवले. “संतरा म्हणजे मृत्य समीप आल्याचे समजताच अन्न पाण्याचा त्याग करणे.” या विधीला जैन धर्मात अत्यंत पवित्र विधी मानले जाते. त्या विधी नुसार तरुण सागर यांची प्राणज्योत आज पहाटे मालवली. आज दुपारी तीन वाजता दिल्ली पासून २८ किमी दुर तरुणसागर तीर्थ येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. “रामायणाची सीता आणि महाभारताची गीता ही या देशाची खरी संस्कृती आहे.” अशा प्रकारचे अनेक विचार त्यांनी आपल्या प्रवचनातून दिले आहेत. मानवतावाद आणि राष्ट्रवाद यावर सखोल विचार आपल्या प्रवचनातून ते देत असत. तरुण सागर यांचे खरे नाव पवन कुमार जैन असे होते. १९६७ साली गुहुजी गावी जन्मलेल्या तरुण सागर यांनी १९८१ साली घर सोडले. त्यांनी जैन धर्माचे मुनी होण्याचा निर्णय घेतला. जैन मुनी झाल्या पासून अल्पावधीतच त्यांच्या अमोघ वाणीतून ते प्रसिद्धीच्या शिखरावर जाऊन पोहचले. त्यांना २००२ मध्ये मध्यप्रदेश सरकारने राज्यमंत्री दर्जा देऊन सन्मानित केले होते. तरुण सागर यांच्या जाण्याने जैन धर्मीयांवर शोककळा पसरली आहे.

नागपूरच्या फुटाला तलावात अज्ञात तरुणाने मारली उडी, मृतदेह काढण्यासाठी प्रशासनाची गरबड सुरू

Thumbnail
Thumbnail

नागपूर | नागपूरच्या फुटाळा तलावात एका अज्ञात तरुणाने उडी मारल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तरुणाची ओळख अद्याप पटली नसून सकाळी त्याला उडी टाकताना परिसरातील स्थानिकांनी पाहिले. एक अज्ञात तरुण पाण्यात उडी मारून बुडत असल्याची बातमी स्थानिक लोकांनी पोलिसांना दिली. पोलीस घटना स्थळी धाकल होताच त्यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृतदेह वर काढण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान बोलवून घेतले. घटनास्थळी अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन दलाचे जवान मृतदेह पाण्यातून वर काढण्याचे प्रयत्न करत आहेत. तसेच पोलीस तरुणाची ओळख पटवण्यासाठी तपास करत आहेत.

केरळ डायरी – भाग २

Keral Diary
Keral Diary

विश्वभूषण करूणा महेश लिमये

तुफानातले दिवे व्हारे…
कवी वामन दादा कर्डकांनी म्हटल्याप्रमाणे इथं आलेला प्रत्येक स्वयंसेवक झपाटल्यागत आपआपलं काम पार पाडत असताना दिसला, मग त्यामध्ये लहाणांपासून वृध्दांपर्यंत,
स्त्रियांपासून पुरूषांपर्यंत प्रत्येकजण या तुफानात दिव्याप्रमाणे जळतो आहे आणि आपल्या प्रकाशाचा
उजेड होता होईल तितक्यांपर्यंत पोंहचवण्याचा प्रयत्न करतो आहे.
CYDA ची टिम सुध्दा त्यापासून कांही वेगळी नाही,
कारण संत गाडगेबाबांच्या पुण्यभूमी महाराष्ट्रातून आलेले आम्ही आगोदरपासूनच स्वच्छताप्रिय असणाऱ्या केरळमध्ये स्वच्छता या विषयावर काम करत असताना भरपूर नवनवीन गोष्टी शिकायला मिळत आहेत.
जवळपास आज कामाचा ९ वा दिवस आहे आणि आमच्या टिमने आतापर्यंत ३४ घरांची स्वच्छता केली आहे. केरळ पुराचा फटका येथील विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात बसला कारण यामुळे जवळपास १० दिवस सरकारी सुट्टी जाहीर करण्यात आली होती,
त्यामुळे ते सर्व पूर्वपदावर आणण्यासाठी शाळा, अंगणवाड्या आणि महाविद्यालये यांची स्वच्छता आम्हाला महत्वाची वाटली म्हणून आम्ही त्यावर भर दिला.
इथली आरोग्य व्यवस्था कोलमडून पडू नये म्हणून सार्वजनिक आरोग्यकेंद्रावर आम्ही काम केलं. त्याचबरोबर प्रशासकीय कार्यालयांची स्वच्छता हा पण महत्त्वाचा मुद्दा होता. आमच्या पूर्ण टिममध्ये लोकपंचायत आयटीआय कॉलेज संगमनेरहून ६ विद्यार्थी इलेक्ट्रिशियन,प्लंबर या तांत्रिक गोष्टींवर काम करण्यासाठी होते. त्याचबरोबर त्यांचे उपप्राचार्य बाळासाहेब हासे सर या विद्यार्थ्यांबरोबर काम करत आहेत. खास नागपूरहून सर्पमित्र करण द्विवेदी आला आहे. त्याला स्वच्छतेदरम्यान २-३ किंग कोब्रा जमातीचे साप सापडले त्यांना परत सोडून देण्यात आले. एमएमसीसी महाविद्यालय पत्रकारितेचा विद्यार्थी महेश जगताप, CYDA टिमचे सेक्रेटरी मॕथ्यू मट्टम हे मूळचे केरळचेच पण सध्या पुणेकर झालेले आमच्या संपूर्ण टिमच नेतृत्व करत होते. त्याचबरोबर अकोलेवरून आलेला विकास म्हस्के, मध्यप्रदेशहून आलेले कल्पेश पांडे प्रत्येकाने आपापल्या परीने खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला. काहीपण करून केरळ पुन्हा नव्याने सुरू करणे हेच ध्येय इथ काम करणाऱ्या प्रत्येकाच आहे. केरळ राज्यात १४ जिल्हे आहेत, त्यातील १३ जिल्हे या पूरामुळे पाण्याखाली आले. त्यामुळे याचा भयंकर फटका केरळला बसला आहे.
यातून आता केरळच्या नव्याने उभारणीसाठी पावले उचलली जातं आहेत. “देव भूमी” म्हणून ओळख आसणारा केरळ आज माणसं उभा करत आहेत. या पूर्ण काळात गरीब,श्रीमंत,उच्च,नीच,श्रेष्ठ,कनिष्ठ असा कुठलाच भेद इथे दिसला नाही.
आमचा सकाळचा नाष्टा मंदीरात,
दुपारच जेवण मशीदित
आणि रात्रीची झोप ही चर्चमध्ये होत आहे,
याहून वेगळं आणि काय पाहिजे विविधतेमध्ये एकता,
इथच आपण सर्व एक आहोत हे सिध्द होऊन जातं…
केरळमध्ये मागील १०-१२ दिवसांमध्ये ३-४ जिल्हांमध्ये(कोट्टयम,कोट्टनाड,आलप्पी,इ.) काम करता आलं याच समाधान आहे.

याचा अर्थ काम संपलय असे नाही,
ही तर आता सुरूवात आहे….
आरंभ है प्रचंड….

हरवलेला भारताचा पासवर्ड शोधून देणारे पुस्तक: We the change, आम्ही भारताचे लोक*

We the Change
We the Change

पुस्तकांच्या दुनियेत | सोनम पोवार, सुमित वाघमारे

“…झुं-झपाक बाईकवर मैत्रिणीला सोबत घेऊन फिरायला आवडतं ना? मग मुळात मैत्रीण पटवण्यासारखं वातावरण पाहिजे. तिला घेऊन फिरण्यासाठी तशी जागा पाहिजे.(आम्ही त्याला कॉलेजात डेमोक्रेटिक प्लेसेस म्हणत असू.) तिची जात कोणती का असेना, धर्म कोणता का असेना, शाकाहारी अथवा मांसाहारी का असेना, लग्न करण्याची मुभा पाहिजे. मुळात आनंदानं जगण्यासारखं, हवं ते करिअर करण्यासारखं झिंगाट वातावरण पाहिजे. जॉब्स पाहिजेत. बिझिनेस करायला माहौल पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मैत्रिणीला ‘long drive’ला नेण्यासाठी पेट्रोल स्वस्त पाहिजे, बॉस! तर, हे सगळं राजकारण आहे.”
माझ्या पिढीला राजकारण आणि भारत समजून देण्याची सुरुवात करताना यापेक्षा अधिक उत्तम मांडणी करताच येणार नाही हे नक्की! आणि नेमकं हेच काम करण्यासाठी, संजय आवटे यांनी आपल्या तरुणाईच्या भाषेत लिहिलेलं हे खुसखुशीत आणि सुटसुटीत पुस्तक म्हणजे- We the change, आम्ही भारताचे लोक!

कुणाला देशभक्त आणि कुणाला देशद्रोही म्हणायचं याबद्दलचा एक वाद आपण अगदी अलीकडे पाहिला. अजूनपण अधूनमधून तो चालू असतो. यात आपल्याला कधी एक बाजू बरोबर वाटते, तर कधी दुसरी..आणि कधी कधी साला वीट येतो सगळ्याचा..वाटतं, बस ना यार..च्या मायची काय कटकट लावलीये सारखी! या दोन्ही शब्दांमध्ये “देश” नावाचा जो शब्द आहे, तो मात्र कुणीच समजून घ्यायला नीट तयार नसतं. या पुस्तकातून लेखक आपल्याला आपलाच भारत देश समजावून सांगतात. आपल्याला माहिती असतं, की २८ राज्ये आहेत, १९४७ ला स्वतंत्र झाला, १९५० ला संविधान मिळालं इत्यादी इत्यादी.. पण एवढंच म्हणजे देश असतो का? समजा मी प्रश्न विचारला- तुमच्या कुटुंबाची माहिती सांगा. तर, फक्त आमच्या घरी एवढी जमीन आहे, आणि माझ्या घरात एवढे लोकं राहतात आणि त्यांचा जन्म अमुक अमुक साली झाला, एवढीच माहिती द्याल का तुम्ही? आपल्या कुटुंबाची फक्त मालमत्ता म्हणजे आपलं कुटुंब असतं का? तर नाही! सगळ्या व्यक्ती, त्यांचे स्वभाव (प्रत्येकाच्या नाना तऱ्हा!!), त्यांची कामे, त्याचं महत्व, त्यांनी आपल्या घरासाठी केलेलं कष्ट हे सगळं सांगणं म्हणजे कुटुंबाबद्दल माहिती सांगणं! तर मग भारत नावाच्या आपल्या कुटुंबाबद्दल आपल्याला ही माहिती हवीच ना? तर ही आपल्या कुटुंबाची मस्त माहिती खूप रंजकपणे सांगणारं हे पुस्तक आहे.

या पुस्तकात एकूण ३० च्या आसपास छोटे छोटे लेख आहेत. त्यामुळे सगळं पुस्तक एकसलग आणि अनुक्रमाने वाचलंच पाहिजे असं कोणताही बंधन आपल्यावर नाही. पण लेखकाने आपल्याच सोयीसाठी एकूण ६ भागात ते लेख वर्गीकृत केलेत. ते सहा भागांचा आशय असा: १. आयडिया ऑफ इंडिया घडवताना २. आयडिया ऑफ इंडिया बिघडताना ३. गांधी, नेहरू आणि आंबेडकर ५. संघर्ष की राह! ६. अब कि बारी, सिर्फ हमारी!
या पुस्तकातली मला सगळ्यात आवडलेली गोष्ट सांगतो जी वाचून मी अक्षरशः उडालोच! नेहरू नावाच्या माणसाने लिहिलेली (तेच ते फाळणी त्यांच्यामुळे झाली असे लोकं म्हणतात ते नेहरू) वाक्ये आहेत ही:
“धर्म आणि राष्ट्रीयत्व हे जीनांना समानार्थी शब्द वाटतात! पण तसे ते नाहीत.”, “फाळणी होताच कामा नये. पण, ती होणे अटळ असेल तर नाहक ‘पाकिस्तान’ आणि ‘अखंड हिंदुस्तान’ अशा घोषणा देत बसण्यात अर्थ नाही. असे प्रश्न अधिक परिपक्वपणे सोडवावे लागतात. मात्र देश एक असो कि दोन, हे नक्कीच आहे- जो देश, धर्माला राष्ट्रीयत्व मानण्याची चूक करेल, त्याच्यावर राजकीय आणि आर्थिक स्वातंत्र्य गमावून बसण्याची वेळ येईल!”
आता बोला! शेजारचा पाकिस्तान पाहतोयच आपण! काय सॉलिड डोकं असेल या माणसाचं! त्याने तेव्हाच सांगितलेलं, धर्मावर आधारित देशाचे काय होणार! अन् म्हणूनच आपला देश सगळ्यांनी मिळून धर्मनिरपेक्ष ठेवला!
असो! तर मित्रांनो, आपण लहानपणापासून म्हणतो की विविधतेत एकता हेच भारताचे वैशिष्ट्य आहे. या पुस्तकातून विचारांची, माणसांची, संस्कृतीची हि विविधता कळत जाते आणि आपलं भारत हे खूप मोठं कुटुंब आहे हे लक्षात येतं! ही विविधता आणि त्यायोगे आपला भारत, आपलं हे कुटुंब अधिक चांगल्याप्रकारे समजून घेण्यासाठी वाचायलाच हवं असं पुस्तक: We the change, आम्ही भारताचे लोकं!

पुस्तक : We the change, आम्ही भारताचे लोक
लेखक : संजय आवटे
प्रकाशक: माइंड अँड मिडिया प्रकाशन, पुणे
किंमत- २०० रुपये (सवलतीत)

इथे विकत घेऊ शकता:

नेहमी आमच्या संपर्कात राहण्यासाठी आणि नवीन लेखाची सूचना मिळवण्यासाठी, Like us on: https://www.facebook.com/pustakanchyaduniyet/

तळटीप:
पुस्तक विकत घेऊन वाचणं हे अतिशय महत्वाचं आहे असं आमचं मत आहे. पुस्तकांचा संग्रह असणं ही नुसती अभिमानाची गोष्ट नसते तर आपल्या आसपासच्या माणसांना, व्यक्तींना त्यांच्या प्रगतीसाठी आपण केलेली मदत असते, यावर आमचा दृढ विश्वास आहे. पुस्तक विकत घेऊन आपण आपल्या कुटुंबासाठी, समाजासाठी सर्वांगीण विकासाचे पर्यावरण निर्माण करतो, हा बहुतेकांचा अनुभव आहेच. त्यामुळे पुस्तके विकत घ्या, वाचा आणि आपल्याच प्रगतीसाठी हातभार लावा!

आशा भोसलेंच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त ‘स्वयम’तर्फे महोत्सव

asha bhosale
asha bhosale

पुणे | सुनिल कमल

सिनेसंगीताच्या माध्यमातून निखळ आनंद देण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या स्वयम संस्थेतर्फे नेहमी वैविध्यपुर्ण कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. यंदाही आशा भोसले यांच्या ८६ व्या वाढदिवसानिमित्त आशा भोसले महोत्सवाचे आयोजन केले आहे. यामध्ये ८६ गाण्यांचा समावेश असून तीन दिवस हा कार्यक्रम असणार आहे. यात मोहम्मद रफी, किशोर कुमार आणि इतर गायक-गायिकांबरोबर गायलेल्या गाण्यांचा समावेश असेल अशी माहिती पत्रकार परिषदेत निवृत्त कर्नल विवेक निक्ते यांनी दिली.
सदर कार्यक्रम विनामूल्य असून दिनांक ७,८ व ९ सप्टेंबरला सायंकाळी ५ ते ८ या वेळेत एस.एम्.जोशी सभागृह येथे होणार आहे.

महोत्सवाच्या समारोपाला एक दानपेटी फिरवण्यात येणार असून जमलेला निधी पुण्यातील डॉ अभिजीत सोनवणे यांच्या ट्रस्टला सुपुर्द करण्यात येणार आहे. सोनावणे हे गेली अनेक वर्षे पुण्यातील विविध भागातील भिक्षेकरींवर मोफत औषधोपचार करत असतात त्यांना भिक मागण्यापासून परावृत्त करण्यासाठी कार्य करतात.

अखेर विमानतळावर महाराज आले !!

shivaji maharaj airport
shivaji maharaj airport

मुंबई | अमित येवले

छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव आता ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून या विमानतळाच्या नावामध्ये ‘महाराज’ हा शब्द टाकावा म्हणून मागणी होत होती.
आधीचे नाव हे महाराजांच्या नावात एकेरीपणा दर्शवित असल्याने महाराष्ट्रामधील अनेक संघटना ह्या संबधीत नावात ‘महाराज’ हा शब्द टाकावा म्हणून मागणी करीत होते. आजपासून ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’ या नावाने पूर्णपणे कामकाज आणि व्यवहार केले जातील. या निर्णयाबद्दल महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, वाणिज्य व औद्योगिक मंत्री सुरेश प्रभू यांचे अभिनंदन केले आहे.

‘मंथन’ – सामाजिक प्रगल्भतेची शक्ती

manthan movie
manthan movie

चित्रपटनगरी | घनश्याम येणगे

गुजरात मधील दूध उत्पादक सहकारी संघाच्या उभारणीची हि कथा. श्याम बेनेगल या प्रतिभावंत दिग्दर्शकाने समर्थपणे उभी केली आहे. गुजरातमधल्या ५ लाख शेतकऱ्यांनी प्रत्येकी २ रुपये देऊन क्राऊड फंडिंगमधून या चित्रपटाची निर्मिती केली आहे. भारताच्या दुग्ध क्रांतीचे प्रणेते वर्गीस कुरियन यांच्या व्यक्तिमत्वापासून प्रेरणा घेऊन हा सिनेमा बनवला आहे. वर्गीस कुरियन यांनी स्वतः विजय तेंडुलकर यांच्यासोबत या कथेचे लेखन केले आहे. गिरीश कार्नाड, स्मिता पाटील, नसिरुद्दीन शहा, कुलभूषण खरबंदा, अमरीश पुरी, मोहन आगाशे, अनंत नाग अशा दिग्गज अभिनेत्यांनी यात काम केले आहे.
यात अत्यंत आदर्शवादी अशा पशुवैद्यकीय डॉक्टर राव या तरुणाची भूमिका गिरीश कर्नाड यांनी केली आहे. हा तरुण गावात सहकारी दूध संस्था उभारण्यासाठी येतो. आणि त्याचा गावातील अनेक प्रस्थापित गोष्टींशी संबंध येऊन संघर्ष होतो. कुणाकुणाशी संघर्ष होतो त्याचा तर, खाजगी डेअरीचा मालक असणाऱ्या सावकाराशी (अमरीश पुरी), दूध संघ आपल्याच ताब्यात असावा असे मानणाऱ्या सरपंचाशी (कुलभूषण खरबंदा), आणि गावातल्या जातिव्यवस्थेशी. या सर्व संघर्षांना पुरून उरून डॉक्टर राव लोकांच्या मनात ‘दूध संघ आपल्या मालकीचा आहे आणि त्यात आपला फायदा आहे’ हे बिंबवतात त्याची हि कहाणी.
यातले काही प्रसंग अगदी लक्षात राहतात. २० वर्षांपासून गावाच्या सरपंचपदावर असलेली व्यक्ती म्हणजे खरबंदा दूध संघाची निवडणूक हरतो व तेही दलित उमेदवाराकडून तेंव्हा त्याला झालेला जळफळाट आणि अस्वस्थता कुलभूषण खरबंदाने इतकी जबरदस्त उभी केली आहे कि त्याला तोड नाही. स्वाभिमानी आणि तडफदार अश्या ‘भोला’ या दलित तरुणाची भूमिका नसिरुद्दीन शहा ने केली आहे. ती हि अप्रतिम. वर्षानुवर्षे अन्याय सहन केलेल्या लोकांना आता सहकारी दूध संघामुळे मालकीचा आणि मतदानाचा सामान अधिकार मिळाला आहे. अशी जाणीव तो सतत लोकांना करून देत असतो. ”ई सिसोटी अपनी है अपनी है….. अपनी …..!” असं तो जीव तोडून सगळ्यांना सांगत असतो. चित्रपटात खाजगी डेअरीचा मालक मिश्राजीची भूमिका अमरीश पुरी यांनी केली आहे. अत्यंत गोड बोलणारा पण धूर्त, चालाख आणि दूध संघ फोडण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या वापरणारा व्यापारी त्यांनी उभा केला आहे. चित्रपटात शेवटी राजकीय दबावामुळे डॉक्टर राव यांची बदली होते. ते निघून जात असताना रेल्वेच्या मागे पळणारा नसिर आपल्याला चित्रपटाचा शेवट निराशावादी आहे असा वाटायला भाग पाडतो पण तो तसा नाही. तो कसा आहे हे पाहण्यासाठी चित्रपटच पहा.

दिग्दर्शक – श्याम बेनेगल
संगीत – वनराज भाटिया
कथा – वर्गीस कुरियन, विजय तेंडुलकर
पटकथा – विजय तेंडुलकर
संवाद – कैफी आझमी
छायालेखक – गोविंद निहलानी

पर्यावरणपूरक सेंद्रिय वस्तुंच्या व्यापार केंद्राचे पुण्यात उद्घाटन

agriculture program
agriculture program

शेतकऱ्यांनाही मिळणार हक्काचं व्यासपीठ, १०,००० हजार शेतकरी घेणार सहभाग

पुणे | सुनिल कमल

बदलत्या काळात आपल्या अन्नातील भेसळयुक्त वाढ हळूहळू आकलनशक्तिबाहेरील होत आहे. शेतात वापरल्या जाणाऱ्या रसायनांचे आणि कीटकनाशकांचे प्रमाण चिंतित करण्याजोगे आहे. सेंद्रिय शेती प्रमाणिकरण करण्याचा खर्च सर्वसामान्य शेतकऱ्यांना परवडत नसल्याने शेत मालाची विक्री होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. नेमकी हीच अडचण लक्षात घेऊन सेंद्रिय शेती करणाऱ्यांना हमी भाव आणि ग्राहकांना कमी भावात माल मिळेल. हाइब्रिड अन्नाविषयक जागरूकता येण्यासाठी सिद्धगिरी स्वास्थ्य संस्था पुढाकार घेऊन पर्यावरण पूरक वस्तुंचे ” अद्रीष ” हे व्यापार केंद्र पुण्यात सुरु करीत आहेत. यासाठी महाराष्ट्रातील तब्बल १०,००० शेतकऱ्यांशी संपर्क करून नोंदणी केली असल्याची माहिती संस्थेचे अक्षय अग्रवाल आणि सौरभ साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ते म्हणाले, “शेतीमालासोबतच या व्यापारी केंद्रात किराणासामान , स्वंयपाक घरातील उपकरणे, गृहउपयोगी वस्तु , सेंद्रिय वस्त्रे, सौंदर्य प्रसाधने, कापड़ी पिशवी इत्यादि असतील. विशेष म्हणजे या सर्व वस्तूंची सेवा घरपोचही दिली जाणार आहे.
या व्यापार केंद्राचे उद्घाटन शनिवार दिनांक १ सप्टें रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्यातील ३ सणस कॉर्नर , गल्ली ५ , साउथ मेन रोड , कोरेगाव पार्क येथे कणेरी महाराज मठाचे ( कोल्हापुर ) पूज्यश्री काडसिद्धेश्वर स्वामीजी महाराज यांच्या हस्ते होणार आहे.