हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भाजप नेते आणि राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांचे नग्न फोटो प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं. गोरेंनी आक्षेपार्ह फोटो पाठवल्याचा आरोप करत महिलेने खळबळ उडवून दिली.. गंभीर आरोपांमुळे गोरेंच मंत्रिपद जातंय कि काय अशी शकयता निर्माण झाली होती. परंतु ज्या महिलेने आरोप केले तीच महिला १ कोटींची खंडणी घेताना पोलिसांच्या सापळ्यात अडकली आणि जयकुमार गोरे सेफ झाले. त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विधानसभेत जयकुमार गोरेंच्या प्रकरणावर भाष्य करत सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप केलाय. या प्रकरणाची चौकशी होईल पण असे कुणाला तरी राजकीय जीवनातून उठवणे चुकीचे आहे असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
विधानसभेत बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, जयकुमार गोरे यांची ज्या प्रकरणात निर्दोष मुक्तता झाली आहे ते प्रकरण पुन्हा उकरुन काढून त्यांना बदनाम करण्याचे काम केले. आपण राजकारण करतो, पण कोणाला जीवनातून उठवायचं अशा हेतूने राजकारण योग्य करणे योग्य नाही. ती केस 2016 मध्ये रजिस्टर झाली असून 2019 मध्ये संपली, ते तेव्हा भाजपमध्ये नव्हते. पण काही गोष्टी उकरुन काढल्या आहेत. मी त्यांच्या हिंमतीची दाद देतो, एखादा व्यक्ती अशा परिस्थितीत दोषी आहोत की नाही आहोत, घरच्यांना समाजात अपमान नको म्हणून अशा गोष्टी मिटवण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांनी लाचेची मागणी झाल्यानंतर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार केली. तक्रारीनंतर ट्रॅप लावला, सगळं संभाषण टेप झालं, सगळी मागणी टेप झाली. मागणी टेप झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि पैसे देताना आरोपीला पकडलं. हा ब्लॅकमेलिंगचाच प्रकार होता.
या प्रकरणात तीन तक्रारी झाल्या आहेत.पहिली तक्रार जयकुमार गोरे यांनी केली. दुसरी तक्रार विराज रतनसिंग शिंदे यांनी केली आहे तर तिसरी तक्रार उमेश मारुती मोहिते यांनी तळबीड पोलिस स्टेशनमध्ये केली आहे. आरोपी महिला सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचा खोटा प्रचार करण्यात आला त्यासंदर्भात मोहिते यांनी तक्रार करण्यात आली होती. तर चौथी तक्रार शेखर पाटोळे यांनी केली आहे. दोन इसमांनी त्यांच्याकडील हार्ड डिस्क मारहाण करुन घेतली असे म्हटले आहे. या प्रकरणात आरोपी महिला, पत्रकार तुषार खरात आणि अनिल सुभेदार यांना अटक करण्यात आली आहे. या सगळ्यांनी जो कट रचला आहे याचे सगळे पुरावे सापडले आहेत. व्हॉट्सअॅप संभाषण, दिडशे फोन सापडले आहेत. पण दुर्देवाची गोष्ट अशी या लोकांच्या संपर्कात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे लोक होते. प्रभाकर देशमुख आरोपींशी शंभर वेळा थेट बोलले आहेत. सुप्रिया सुळे आणि रोहित पवार यांचेही तुषार खरात यांच्याशी काॅल झाले आहेत. आता या प्रकरणाची चौकशी होईल पण असे कुणाला तरी राजकीय जीवनातून उठवणे चुकीचे आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल.