तुम्ही माझे मितवा आहात; माजी विद्यार्थ्याचे शाळेतल्या शिक्षकाला पत्र

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

शिक्षकदिन विशेष | आज ५ सप्टेंबर अर्थात शिक्षकदिन. माझ्या शैक्षणिक क्षेत्रात मला थोडे उशीरा भेटले पण योग्य वयात योग्य समज देऊन योग्य दिशा दाखवणारे माझे शिक्षकरूपी वडील भेटले ते म्हणजे सध्याचे यशवंत हायस्कूल कराड चे मुख्याध्यापक श्री पाटील डी.डी.सर

सर, तुम्ही माझ्या आयुष्यात उशीरा भेटलात पण योग्य वयात योग्य समज देऊन योग्य ती दिशा मला तुम्हीच दाखवली….आणि इथून पुढे मी जी काही शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल करेन यात तुमचा खारीचा वाटा असेल …कारण तुम्ही तासाला शिकवताना देखील आम्हाला पुस्तकी ज्ञान कमी आणि व्यवहारिक दृष्ट्या उपयुक्त ज्ञान हे कायम देत आलाय आणि या मुळे तर तुम्ही विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून ओळखले जाता….तुम्ही मुलांना हाताचा मार कमी पण शब्दांचा मार योग्य वयात आणि योग्य त्या ठिकाणी देता ज्याने तो विद्यार्थी परत ती चूक करताना १० वेळा विचार करेल…

बहुतांशी शाळेत शिकवणाऱ्या सगळ्याच शिक्षकांकडे छडी, विषयाचं पुस्तक, डस्टर आणि खडू असतात…पण मला हेवा वाटायचा सर तुमचा ….तुम्ही अगदी सरळ साधे पणाने कायम राहिलात….तुम्ही वर्गात येताना कधीच छडी आणली नाही…यामुळे विद्यार्थ्यांना हे माहिती होते की हे सर मारणार नाहीत …आणि विना पुस्तक अगदी पॉइंट नुसार शिकवण्याची कला सगळ्याच शिक्षकांत नसते ओ…!

तरुण शिक्षकांना technology चा वापर करून शिकवता येत नाही पण तुम्ही वयाने एवढे तरुण नसून देखील ज्या त्या वेळी जी ती technology वापरून तुम्ही आम्हाला शिकवलंय…आणि तेव्हाच तुमचं वाक्य देखील आठवतंय की, ” काही विद्यार्थ्यांना शिकवलेल एकवेळ समजत नाही पण ऐकलेल आणि बघितलेल चटकन लक्षात येत”….आणि खास विद्यार्थ्यांना समजावं यासाठीचा तुमचा तो अट्टाहास नेहमीच आवडायचा सर…!!परवाच तुमची समर्थ भारत परिवारातर्फे मुलखात घेण्यात आली …आणि महत्वाचं म्हणजे हा परिवार देखील तुमच्याच विद्यार्थ्यांचा आहे….तर त्या मुलाखतीवेळी मला २ वर्षातून पुन्हा एकदा यशवंत मध्ये येऊन तुमच्या तासाला बसलोय असच वाटल काही क्षणांसाठी….आणि त्यावेळी तुमच्या गप्पा, तुमचे अनुभव, तुमचं कार्य ऐकायला मिळालं ज्याने की तुमचा आदर अजूनच बळकट झाला आमच्या मनात…!!

आणि खरंच त्या २०१७ च्या बॅच च्या मुलांनी अगदी योग्य आणि रास्त सनद लिहून दिलीये…अगदी यशवंत च्या कोणत्याही विद्यार्थ्याच्या हुबेहूब त्या तुमच्या प्रतीच्या भावना आहेत…वडीलांननतरचे खरंच माझ्यादेखील आयुष्यात तुमच्यासारख्या च शिक्षकांचं स्थान आहे…आणि तुमच्या प्रेरणेमुळे आणि पाठिंब्यामुळे च आजवरचा शैक्षणिक प्रवास खूप छान झाला….इथून पुढचा देखील होईल यात शंका च नाही …तुम्ही जेव्हा १२ वी च्या निकलादिवशी कॉल केला तेव्हा अक्षरशः सर भरून आलेलं…आपलेपणाची तुमची विचारपूस नेहमीच भावते…
माझ्या यशवंत च्या प्रवासात तुम्ही आवडते , लाडके , आणि माझा मितवा आहात ( मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या ) …
आणि मला अजुन पण तुमच्या गणित शिकवताना च्या ट्रिक्स आठवतात हीच कॅसेट परत परत लावायची, फॅशन साठी कंस घाला, हे झाकायच ते उघडायचं… असं बरंच काही… जे की आम्हाला ११-१२ वी ल पण उपयोगी पडलं…आणि त्यावेळी मात्र तुमची आठवण आली बरं का सर….कारण तुमचं एक शिकवलेल गणित झोपेत जरी विचारलं तरी ज्या त्या पायरीने अगदी तुमच्या आवाजाच्या चालीनुसर मला तरी यायचं वैयक्तिक….
आणि तुमच्या विषयी आदर तर मला ६ वी पासूनच होता ….तुम्ही शिकविलेलं गणित तर भारी असायचाच पण त्याआधी पण मी तुमचं विज्ञान शिकलोय…ते देखील तितकच भारी….

विद्यार्थ्याकडे एक शिक्षक म्हणून कधी पाहिलच नाही तुम्ही…तुम्ही कायम त्याचा मित्र बनत आलाय…त्यामुळे तुमचे विद्यार्थी देखील तुमच्याकडे अगदी बिनधास्त व्यक्त होतात….आणि यात फक्त मुलं च असतील असं काही नाही तर शाळेतल्या मुली देखील घरी न बोलू शकणारे विषय अगदी सहजपणे न डगमगता तुम्हाला बोलून मोकळ्या होतात कारण त्या सगळ्यांना एक माहिती असत मोकळ होण्याचं आणि आपल्याला आधाराचा खांदा देणार एकच ठिकाण आहे आणि ते म्हणजे पाटील डी.डी.सर…..

मी तुमचा मोठेपणा सांगतोय असंही काही नाहीये ….जे मी अनुभवलय जे मी पाहिलंय त्यावरून सांगतोय ….आणि सांगतोय ते एकदम सत्य सांगतोय ….एक साधा सरळ शिक्षक म्हणलं की डोळ्यासमोर पाटील डी डी येत नाहीत असं होतच नाही …. अरे हा माणूस एवढा साधा निरागस वृत्तीचा आहे की बासचं…!!

सर मुख्याध्यापक झाले अस समजल त्यावेळी खूप आनंद झाला त्यावेळी मी ११वी ला होतो माझा आणि यशवंत चा काही संबंध उरला नव्हता….तरीही सरांचं अभिनंदन करण्यासाठी मन आतुर झालेलं…आणि सरांना कॉल केला …एक मन म्हणत होत की कदाचित मुख्याध्यापक झालेत म्हणल्यावर सर आधीसारखे राहिले नसतील…थोडे कठोर आणि साहजिकच मुख्याध्यापक म्हणल्यावर टाईट कॉलर चे झाले असतील….पण मात्र दुसर मन मला सारखं सांगत होत …कॉल कर ….कारण अख्खं यशवंत बदलेल पण त्यातले डी डी पाटील बदलन कदापि शक्य नाही …आणि मग मी कॉल केला ….सरांनी उचलला…माझा नंबर save होता…सरांनी ओळखल मला…मी अभिनंदन केलं…त्यावेळी सर एकच आपुलकीचा शब्द बोलले की …”वेळ भेटेल तेव्हा शाळेत ये आणि भेटून जा”….तेव्हा आणि तिथंच माझ दुसर मन जे विचार करत होत त्याचा विजय झाला…

सांगायचं एवढच की सरांना कोणत्याही गोष्टीची हाव नाहीये…आहे त्यात समाधानी असे हे व्यक्तिमत्त्व आहे…आणि ह्याच अंगी असणाऱ्या गुणांमुळे सर सगळ्या विद्यार्थ्यांचे मित्र, वडील बनलेत….
असो, तुमच्या विषयी बोलायला मला सुचाव लागतच नाही ….पुढचं लिहायला गेलं की कीबोर्ड थांबतच नाही…प्रसंगावर प्रसंग आठवतोय…..आणि तुम्ही १० वी मध्ये माझी एक सवय मात्र मोडली सर …ती देखील माझ्या ११-१२ वी च्या शैक्षणिक दृष्ट्या तेवढीच महत्त्वाची होती …ती म्हणजे सापासारखी जीभ बाहेर काढणे यावरून तुम्ही मला जवळ जवळ १५-२० मिन समजावलं होत….शाळेत हे ठीक आहे पण उद्या कॉलेज ला यावर तुला मित्रांचं ऐकुन घ्यावं लागेल वगैरे….आणि आमच्या ग्रुप मध्ये एकाला होती ही सवय आणि त्याची हालत पहिली मी….तेव्हा मी सगळ्या ग्रुप ला तुम्ही माझी काढलेली समजूत सांगितली होती…अशी आजकाल कोणी कोणाची समजूत घालत बसत नाही हो….पण त्या समजुतीतून तुम्हाला तुमच्या विद्यार्थ्यांबद्दल किती प्रेम आणि आपुलकी आहे हे स्पष्ट दिसून यायचं….आणि खूप सारे किस्से आहेत तुमच्या सोबतचे जे की मनात साठून आहेत…..लिखाणाची आवड आहे , साहित्यावर प्रेम आहे….म्हणून हा अट्टाहास …तुमच्याविषयी आजच्या शिक्षकदिनाच्या निमित्ताने लिहायला मिळालं….एवढ्या दिवस जे साठवून ठेवेल होत त्यातून मोकळा झालो…पण आजुन भरपूर आहे. ..नक्कीच लिहीन….
जाता जाता एक,

एक साधा शिक्षक असावा
तर माझ्या पाटील सरांसारखा,
अरे कोणत्याही गोष्टीचा मोह नाही त्यांना
तो माणूसच माझ्यासाठी सोन्यासारखा…

सर, एक आदर्श शिक्षक आणि
मित्र बनण्याच कौशल्य आहे तुमच्या अंगी,
म्हणूनच तुमचा अपघात झाल्यावर
विद्यार्थ्यांची हॉस्पिटल मध्ये बघायला गर्दी जंगी…

अरे वडीलांपेक्षा तुम्ही कमी नाही
त्यामुळे आमच्या मनी आहे तुमच्याविषयी आदर,
आणि म्हणूनच यशवंत च्या सगळ्या
विद्यार्थ्यांचे लाडके तुम्ही डी डी पाटील सर….डी डी पाटील सर…
आणि आता तुम्हाला खऱ्या अर्थाने मी लेखाला दिलेलं नाव पटल असेल अस मी समजतो आणि थांबतो…

जय हिंद..!! जय कर्मवीर..!!

तुमचाच लाडका विद्यार्थी,
ओंकार रमेश गावडे.

Leave a Comment