विदेशातही अंद्धश्रद्धेचा पगडा, कुंडली पाहून केली फुटबॉल संघाची निवड; कोचच्या बडतर्फीची ‘अंनिस’ची मागणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | कुंडली पाहून फुटबॉल संघ निवड प्रकरणी राष्ट्रीय फुटबॉल कोच स्टीमक यांना तातडीने बडतर्फ करा आणि ह्या कामी ज्योतिषाला दिलेल्या पंधरा लाख रुपयांची नुकसान भरपाई फुटबॉल कोच आणि भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष यांच्याकडून वसूल करून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र अंनिसने प्रसिद्धी पत्रकाच्याद्वारे केली आहे.

भारतीय फुटबॉल संघाचे कोच इगोर स्टीमक यांनी आशिया कप पात्रता फेरीच्या सामन्याच्या दोन दिवस आधी भारतीय फुटबॉल संघाची संपूर्ण माहिती भूपेश शर्मा नावाच्या ज्योतिषाला दिली होती .प्रत्येक खेळाडूंच्या ग्रह स्थिती नुसार भूपेश शर्माने दिलेल्या सल्ल्या नुसार अंतिम संघात कोण खेळणार किंवा नाही हे ठरवले गेले होते. नुकतेच त्या वेळीचे एआयएफएफचे पदाधिकारी कुशल दास यांनी ज्योतिषाची मदत घेतली गेली होती आणि त्या साठी बारा ते पंधरा लाख रुपये खर्च केला गेला असे मान्य केले आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंनिस मार्फत डॉ हमीद दाभोलकर , मिलिंद देशमुख नंदिनी जाधव यांनी ही मागणी केली आहे

पत्रकात पुढे म्हंटले आहे कि,ज्योतिष या विषयाला कोणताही शास्त्रीय आधार नाही.ते एक छद्म विज्ञान आहे. ग्रह-गोल-ताऱ्यांचा शास्त्रीय अभ्यास करणाऱ्या विज्ञान शाखेला ‘खगोलशास्त्र’ असे म्हणतात आणि खगोल शास्त्राच्या उपलब्ध अभ्यास नुसार ग्रह-गोल-ताऱ्यांचा मानवी जीवनावर कोणताही प्रभाव पडत नाही. त्यामुळे अशा संपूर्ण अशास्त्रीय गोष्टी राष्ट्रीय संघ निवडताना वापर करणे हे अत्यंत चुकीचे असून जीवापाड मेहनत करणाऱ्या खेळाडूंच्या कर्तुत्वावर अविश्वास ठेवणारे आहे.

डॉ.जयंत नारळीकर ह्यांच्या पासून अनेक जेष्ठ खगोल वैज्ञानिकांनी ज्योतिषाला विविध चाचण्यांच्या माध्यमातून तपासून ते फोल असल्याचे सिद्ध केले आहे. जेष्ठ वैज्ञानिक जेम्स रेन्डी ह्यांनी जगाच्या अंताच्या विषयी केलेल्या पंचेचाळीस दाव्यांचा अभ्यास करून त्यांचा फोलपण सिद्ध केला होता. तसेच भारतीय वंशाचे नोबेल पारितोषिक विजेते व्ही. वेन्कटरामन ह्यांनी देखील ज्योतिषाची तुलना छद्मविज्ञानाशी केली आहे, ह्याची देखील आठवण ह्या निमित्ताने करू देण्यात आली आहे.

सध्याच्या शासनाने ज्योतिषाच्या सारख्या अ वैज्ञानिक गोष्टी अभ्यासक्रमात समविष्ट करण्याचा जो प्रकार चालवला आहे त्या मुळेच अशा गोष्टीना एक प्रकारे शासनाची मान्यता असल्या सारखी परिस्थिती निर्माण होत आहे जन्मवेळ, कुंडली अशा सारख्या कोणत्याही वैज्ञानिक आधार नसलेल्या गोष्टींचे यामुळे समाजात स्तोम माजते आहे आणि आपल्या कर्तृत्वा पेक्षा ज्यांचा आपल्या वैयक्तिक कर्तृत्वाशी काहीही सबंध नाही अशा गोष्टींवर अवलंबून राहणारी मानसिकता ह्या मधून निर्माण होते. ते समाजाच्या साठी अत्यंत घातक आहे असे देखील ह्या मध्ये नमूद केले आहे. एका बाजूला चांद्रयान -३ चंद्रावर पाठ्वाण्यातून विज्ञानवादी मानसिकता जोपासण्याचे महत्व अधोरेखित होत असताना अशा स्वरूपाच्या अशास्त्रीय गोष्टीना उत्तेजन देणे शासनाने टाळायला हवे असे देखील ह्या मध्ये म्हटले आहे.

ज्योतिषाला कुठलाही वैद्यानिक आधार नसून ते केवळ मनोरंजनाचे मध्यम आहे ही भूमिका शासनाने मान्य करावी अन्यथा ज्योतिषाचा ग्राहक संरक्षण कायद्यात समावेश करून ग्राहकांना सल्ला चुकल्यास नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग मोकळा करावा अशी देखील मागणी या पत्रकाच्या मार्फत करण्यात आली आहे.