सुरजागड खदानीविरोधातील आंदोलनाची धग प्रशासनाच्या फुंकरीने विझली?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

एटापल्ली (मनोहर बोरकर) : तालुक्यातील सुरजागड लोहखनिज पहाड़ीसह गडचिरोली जिल्ह्यातील इतर 25 खानींची लीज रद्द करण्याच्या मागणीसाठी सुरजागड पारंपारिक गोटूल समिती व जिल्हा महाग्रामसभाच्या वतीने पुकारलेल्या ठीय्या आंदोलनातील पुढाऱ्यांना पोलिसांनी अटक करून तिव्र जन आंदोलनाची धग फुंकर मारून पेटता दिवा (पनती) विझविल्या प्रमाणे विझविल्याचे समजने खरे ठरणार नाही.

गेल्या आठवड्यात आदिवासी नागरिकांनी आयोजित केलेल्या जहाल मोर्चा व बेमुदत ठीय्या आंदोलन थोपविन्याचा प्रयत्न लोहखनिज उत्खनन व वाहतूक करणाऱ्या लॉयलड्स मेटल कंपनी, त्रिवेणी अर्थमूव्हर्स कंपनी व प्रशासनाने सुरवातीपासूनच केला होता, मात्र जनतेचा रेटा असल्याने दोन्ही कंपन्या व प्रशासनाला मदत करणारे काही पुढारी हतबल झाले होते, त्यामुळे आंदोलन ठरल्या प्रमाणे होणार हे जिल्हा प्रशासनाच्या लक्षात आल्यानंतर तालुका प्रशासनाने जबाबदारीने आंदोलनाच्या पुढाऱ्यांच्या हालचालीकड़े बारकाईने लक्ष्य केंद्रित केले, सुरवातीपासूनच आंदोलकांकडून होणाऱ्या चुका प्रशासनाने हेरल्या, यात छापील जाहीर पत्रकात आंदोलनास समर्थन देणाऱ्या प्रमुख मार्गदर्शक म्हणून निमंत्रित केलेल्या, इतर मागास वर्ग कल्याण, मदत व पुनर्वसन मंत्री नामदार विजय वड्डेटीवार, जिल्हापरिषद अध्यक्ष अजय कंकडालवार व माजी आमदार नामदेव उसेंडी अशा काँग्रेस पक्ष पदधिकाऱ्यांना आयोजकाचे स्थान देण्यात आले, सच्चा आंदोलक नेते, गाव पाटील, आदिवासींच्या पारंपारिक इलाका समिती प्रमुख, पेरमा, भूमिया व पुजारी यांना डावलने, विराट अथवा भव्य मोर्चा ऐवजी जहाल मोर्चा असे शिर्षक देणे, अशी भरकट होत गेली, आणि इथुनच आंदोलनांची तिव्रता लयास गेल्याचे प्रशासन सतर्क झाले, त्यानंतर मोर्चा दरम्यान स्पीकर वाजविन्याच्या परवानगीसाठी आयोजकांनी जिल्हा महाग्रामसभा अध्यक्ष देवाजी तोफा यांचा नावाचा वापर करने व नामदार वड्डेटीवार यांचे नावाने प्रशासनावर दबाव टाकून परवानगी तात्काळ देण्याचे फर्मान करने, सुरजागड पारंपरिक इलाकामधील आदिवासींच्या हिताचे आंदोलनावर गैरआदिवासी व सुरजागड इलाका बाहेरील व्यक्ती पुढारी म्हणून पुढेपुढे करने, व पुढाऱ्यांच्या दरडोई होणाऱ्या ओल्या पार्टीची किनारही पोलिसांच्या नजरेतुन सुटली नाही, यासर्व बाबी आंदोलन संपविण्यासाठी तालुका प्रशासनला पुरेशा ठरल्या, आणि इथुनच आंदोलन उधळन्याचा प्रयोग करण्याचा डाव प्रशासनाने आखन्यास सुरुवात केला, यावेळी पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील यांनी तालुका प्रशासनाच्या वतीने मुख्य भूमिका वठविली हे मात्र विशेष!

लोहखनिज खान विरोधी आंदोलन मागे घ्यावे यासाठी आंदोलन स्थळी उपस्थित होऊन जिल्हाधिकारी संजय मीणा यांची आंदोलकांशी (ता.28) गुरुवारी चर्चा केली होती. सदरची चर्चा निष्फळ ठरल्यानंतर (ता.29आॅक्टोंबर) रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान पोलिसांनी ग्रामसभा प्रमुख तथा जिल्हापरिषद सदस्य सैनु गोटा, रामदास जराते, पंचायत समिती सदस्य शिला गोटा, जिल्हा महाग्रामसभा सचिव नितीन पदा, जयश्री वेळदा व अमोल मारकवार अशा सहा पुढाऱ्यांना पोलिसांनी अटक करून स्थानबद्ध केले होते.

यावेळी तीन हजाराहुन अधिक स्त्री, पुरुष आदिवासी नागरिकांना पोलिसांनी हाकलून लावून आंदोलन मैदान ताब्यात घेतले होते. आंदोलनाच्या पुढाऱ्यांना अटक झाल्यामुळे आंदोलक नागरिकांनी पुन्हा एटापल्ली टोला येथील अंगनवाडी केंद्र समोर ठीय्या आंदोलन सुरु करून अटक केलेल्या पुढाऱ्यांची पोलिसांच्या तावडीतुन रात्री उशीरापर्यंत सुटका करून घेताली होती, त्यानंतर काही काळासाठी आंदोलन स्थगित करण्यात आल्याची घोषणा आंदोलकांकडून करण्यात आली, सुरजागड इलाका बाहेरील व गैरआदिवासी पुढाऱ्यांच्या नेतृत्वातील आंदोलन स्थगित झाले आहे, मात्र सुरजागड इलाका पट्टीतील आदिवासी समाजाचे आंदोलन सुरुच आहे, ग्रामसभांच्या वतीने इलाक्याच्या सत्तर गावात सभा घेऊन पुढील आंदोलनाची रूपरेषा, शासन, प्रशासनाकडून आदिवासीच्या भोळेपनाचा घेतल्या गेलेला गैरफायदा, आंदोलनात गैरआदिवासी व सुरजागड इलाका बाहेरील पुढाऱ्यांचा झालेला शिरकाव पुढील आंदोलन वेळी कसा रोखता येईल, यावर विचारमंथन केले जात आहे. त्यामुळे सुरजागड लोहखनिज खान विरुद्ध ठीय्या आंदोलनाचे स्थळे जरी बदलती असले, तरी आंदोलन मात्र निरंतर सुरु आहे, प्रशासनाच्या चतुराइने फुंकर मारून दिवा विझविल्या प्रमाणे सुरजागड खदानीविरोधातील आंदोलनाची धग फुंकरीने विझली असे म्हणणे सोइस्कर ठरणार नाही, येणाऱ्या काळात सुरजागड खदान विरोधी आंदोलन पुन्हा पेटून उठेल हे मात्र नक्की, अशी चर्चा नागरिकांमध्ये केली जात आहे.

Leave a Comment