कराड उत्तरेत वेळ बदलली : आ. जयकुमार गोरे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पुसेसावळी | कराड उत्तरच्या आमदाराला सहकार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले पण पदाचा उपयोग विरोधातील कार्यकर्त्यांना अडचणीत आणण्यात व त्यांच्यावर पोलीस केसेस करण्यात केला. परंतु आता वेळ बदललेली आहे. कार्यकर्त्यांनी चिंता करण्याची गरज नाही, आता चिंता करण्याची वेळ त्यांची आहे. असे प्रतिपादन भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा पासून सुरू झालेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा संवाद यात्रेदरम्यान कराड उत्तर मधील विविध मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी कराड उत्तरचे युवा नेते धैर्यशील कदम,भाजपा प्रदेश सचिव विक्रम पावसकर, रामकृष्ण वेताळ, महेश जाधव, महेंद्रकुमार डुबल, सागर शिवदास,चंद्रकांत मदने, सूर्यकांत पडवळ, शितल कुलकर्णी, सुनील शिंदे, रुपाली खोत, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना आ. गोरे म्हणाले, मोदीजींमुळे काश्मीरमध्ये तिरंगा ध्वज फडकत आहे. 370 कलम रद्द करून तेथील लोकांना न्याय दिला. वारकरी संप्रदयाच्या दृष्टीने महत्वाचा 1200 कोटींचा पालखी मार्ग मोदीजींनी उभारला आहे. त्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. गावागावात लोकांना घरे मिळावी, यासाठी प्रत्येक कुटुंबाला घर देण्यासाठी ग्राउंड लेव्हलवर काम करत करोडो कुटुंबांना मोदींच्या कार्यकाळात घरे मिळाली. केंद्राच्या मदतीने गावोगावी 30-32 कोटींचा निधी मिळू लागला आहे. रशिया युक्रेन युद्धात भारताची ताकद जगाला समजली.भारतीय नौदलात छत्रपती शिवरायांना सन्मान देण्याचे ऐतिहासिक कार्य मोदींनी केले.

यावेळी धैर्यशील कदम यांनी पंतप्रधान आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, पंतप्रधान गरीब कल्याण योजना, पंतप्रधान किसान सन्मान योजना, मुद्रा योजना, स्वच्छ भारत योजना, उज्ज्वला योजना, जल ही जीवन अभियान या योजनेतून जनतेला झालेला फायदा याची माहिती दिली. कराड उत्तर मधील जनतेला विकासापासून वंचित ठेवणाऱ्याना येथील जनता येणाऱ्या निवडणुकीत त्यांची जागा दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.