उत्तर प्रदेश : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमध्ये एक अजब घटना घडली आहे. अलीगढमधील छर्रा भागातील सिरौली गावात एक लग्न होत होतं. लग्न सोहळ्यात वर पक्षाचंही जंगी स्वागत करण्यात आलं. स्टेजवर वधू-वरांनी एकमेकांना पुष्पहारही घातला. त्यानंतर लग्नाच्या इतर विधींसाठी ते मंडपात पोहोचले. यानंतर मंडपात वधूला कुंकू भरण्याचा विधीसुद्धा पूर्ण झाला. मात्र जेव्हा कन्यादानाच्या वेळी मुलानं हळद लावण्यासाठी हात पुढे केला तेव्हा वधूनं आरडाओरडा केला आणि ती जोरजोरात किंचाळायला लागली.
यानंतर लगेच या वधूने पुढील विधी करण्यास नकार दिला कारण नवऱ्या मुलाच्या एका हाताची तीन बोटं नव्हती. या नवऱ्या मुलाने बोटं नसल्याची माहिती लपवून सर्वांना फसवल्याचा आरोप वधूकडून करण्यात आला आहे. तसेच वधूच्या कुटुंबियांना याबाबत कोणतीच माहिती न दिल्याचा आरोपसुद्धा तिने केला आहे. यामुळे दोन्ही बाजूच्या मध्यस्थींना ओलीस ठेवण्यात आलं होतं. दोन्ही कुटुंबियांच्या लोकांमध्ये जोरदार मारामारी झाली आणि रात्रभर एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरु होते कोणच कोणाचे ऐकायला तयार नव्हते.
याबाबत वराच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे कि हाताच्या बोटांबाबत वधूच्या कुटुंबियांना सांगितलं होतं. लग्नाचा कार्यक्रम जवळपास पार पडला होता पण वधूनं पाठवणीस नकार दिला. या सर्व प्रकाराची माहिती पोलिसांना देण्यात आली यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गावप्रमुखाच्या उपस्थितीत या प्रकरणावर तोडगा काढण्यात आला आणि त्यानंतरही वराला वधूविना रिकाम्या हाताने माघारी परतावे लागले.




