मेट्रोच्या डीपीआरवर 7.5 कोटींची उधळपट्टी कशाला ? जलील यांचा सवाल

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करुन मेट्रोलाईन डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामाला तत्काळ स्थगिती देऊन नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या आशयाचे पत्र त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना पाठवले आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत औरंगाबाद शहरात विविध प्रकल्प राबविले जात असून जे प्रकल्प वास्तविकतेत शक्य आहेत आणि सर्वसामान्य नागरीकांच्या हिताचे आहेत, त्यावरच निधी खर्च करणे योग्य असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी पत्राद्वारे कळवले आहे.

खासदारांनी पत्रातून काय मागण्या केल्या?
– खासदार इम्तियाज जलील यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले की, औरंगाबाद शहरात मेट्रोलाईनचा डिपीआर महारेल संस्थेमार्फत तयार करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी बजेटममधून महारेल संस्थेस रुपये 7.5 कोटी अदा करण्यात येणार असल्याचे समजते. सेंट्रल अर्बन डेव्हलपमेंट कमिटीचा मी सदस्य असून सबब कमिटी संपूर्ण भारतातील विविध शहरात राबविण्यात येणारे विकासात्मक कामे व प्रकल्पांचे निरीक्षण करते. महारेल संस्था ही फक्त भरमसाठ फीस वसूल करुन जे शक्य होणार नाही असे डीपीआर बनवते, असे कमिटीच्या निदर्शनास आलेले आहे.

– मेट्रोलाईन प्रकल्प हा पूर्णपणे खाजगी तत्वावर चालतो. त्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडून कोणत्याही प्रकारचा निधी उपलब्ध करुन दिला जात नाही. मेट्रोलाईन प्रकल्प सुरु करण्यास हजारो कोटींची आवश्यकता असणार आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात महानगरपालिका निधी देऊच शकत नाही. मग मेट्रोलाईन प्रकल्पात हजारो कोटी रुपयांचा वाटा कसा व कुठून आणणार ? तसेच स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सद्यस्थितीत केंद्र शासनाकडून उर्वरित निधी मिळविण्यासाठी औरंगाबाद मनपाच्या वाट्याची रक्कम आतापर्यंत भरण्यात आली नाही. त्याकरिता मनपातर्फे अनेक प्रयत्न सुरु आहे.

– स्मार्टसिटी अंतर्गत महारेल संस्थेस मेट्रोलाईनचा डिपीआर बनविण्यास देण्यात येणारे रुपये 7.5 कोटी पूर्णपणे वाया जाणार आहेत. औरंगाबाद शहराचा विकास आराखडा पाहता सध्या तरी मेट्रोलाईन शक्यच नाही. सबब निधी शहरातील उद्याने व सद्यस्थितीत गरज असलेले लोकोपयोगी विकास कामे करण्यासाठी वापरावे. शहराला फक्त काही जंक्शन आणि विशेषत: जालना रोडवर उड्डाणपूल हवे आहे आणि ते अत्यंत महत्त्वाचे असल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी नमूद केले आहे.

Leave a Comment