मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्थानकात ट्रेनमध्ये झोपलेल्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शनिवारी (1 फेब्रुवारी) रोजी घडलेल्या या घटनेमुळे मुंबईतील महिला सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
काय घडलं नेमकं?
मिळालेल्या माहितीनुसार, हरिद्वारहून आलेली 55 वर्षीय महिला तिच्या नातेवाइकासह वांद्रे टर्मिनस येथे उतरली. त्यानंतर नातेवाईक काही कामासाठी स्टेशनबाहेर गेले असताना ती काही वेळ प्लॅटफॉर्मवर बसली. झोप अनावर झाल्याने समोर उभ्या असलेल्या रिकाम्या ट्रेनमध्ये जाऊन ती झोपली.
त्या ठिकाणी काम करणाऱ्या एका हमालाने तिला पाहिले आणि काही वेळाने ट्रेनमध्ये जाऊन तिच्यावर बलात्कार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपी हमाल तिथून पळून गेला. महिलेचे नातेवाईक परत आल्यानंतर तिने त्यांना घडलेली घटना सांगितली. त्यांनी तत्काळ रेल्वे पोलिसांशी संपर्क साधला आणि त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेत त्याला अटक केली.
सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह
या घटनेनंतर रेल्वे पोलिस आणि प्रशासनावर टीका होत आहे. प्रत्येक प्लॅटफॉर्मवर सुरक्षारक्षक असण्याची आवश्यकता असतानाही त्या वेळी कर्मचारी उपस्थित नव्हते.या संदर्भात अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. प्लॅटफॉर्मच्या प्रभारी अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
मुंबई रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटीमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मुंबईत महिलांची सुरक्षा धोक्यात?
या घटनेमुळे मुंबईत महिला किती सुरक्षित आहेत? हा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. काही महिन्यांपूर्वीच मुंबई लोकलमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना घडली होती. अशा घटनांमुळे महिलांची सुरक्षितता आणि रेल्वे प्रशासनाच्या सुरक्षेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना रेल्वे स्थानकांवरील संशयास्पद हालचाली दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. तसेच सुरक्षा व्यवस्थेत मोठे बदल करण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.