‘टीम इंडिया’ समजून काम करा उद्धवजी ; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कंजूरमार्ग मेट्रो कारशेड वरून शिवसेना आणि भाजप मध्ये आरोप प्रत्यारोप होत आहेत. उच्च न्यायालयानं कांजूरमार्ग मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती दिल्यानंतर पु्न्हा एकदा राज्यातील राजकारण तापले आहे.दरम्यान, कांजूरमार्ग मेट्रो कारशेड प्रकरणात तुम्हाला श्रेय हवे असल्यास खुशाल घ्या, पण हा माझ्या आणि तुमच्या अंहकाराचा प्रश्न नाही. प्रकल्प अडवण्याचा कद्रूपणा सोडून चर्चा करुन मार्ग काढू या, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी भाजपला केलं होतं. मुख्यमंत्र्यांच्या या अवाहनानंतर चंद्रकांत पाटील यांनीही प्रतिक्रिया दिली आहे.

चंद्रकांत पाटील यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन पंतप्रधानांना भेटण्याचा सल्ला दिला आहे. तसंच, टीम इंडिया असं समजून काम करा, असंही म्हटलं आहे. ‘आरे कारशेडच्या प्रश्नांवर उद्धवजी यांच्या वक्तव्याचे भारतीय जनता पार्टी स्वागत करेत. पण मी राज्य सरकारला पुन्हा एकदा सांगू इच्छितो की, या प्रकल्पाचे ८० टक्के काम आमच्या सरकारच्या कार्यकाळात झाले आहे. तुम्ही सुरूवातीपासूनच याला इगोचा विषय बनविला, जर तुमच्या उपाययोजना वेगळ्या आणि मुंबईच्या हितासाठी असत्या आणि त्यासाठी तुम्हाला केंद्राची जागा हवी होती, तर तुम्ही मुख्यमंत्री या नात्याने पंतप्रधानांकडे निवेदन दिले असते. तुमच्याकडे प्रारंभी वेळ होता की, तुम्ही देवेंद्रजींना सोबत घेऊन सर्व तज्ज्ञांच्या अहवालाचा अभ्यास करून निर्णय घेऊ शकला असता,’ असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

पण आजही मेट्रो कारशेडवर तुमचे सर्व निवेदन अपूर्ण आहे. ते जनतेला भ्रमात पाडणारे आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. तुम्ही देवेंद्र फडणवीस यांना सोबत घेऊन मोदीजी आणि केंद्राच्या इतर विभागातील मंत्र्यांची भेट घेऊन तोडगा काढून मुंबईच्या हिताचा निर्णय घेऊ शकता. एक जनप्रतिनिधी आणि सर्वप्रथम महाराष्ट्राचा एक नागरिक म्हणून हाच माझा तुम्हाला सल्ला आहे,” असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना केलं आहे.

शरद पवार करणार मध्यस्थी –

दरम्यान, कांजूरमार्ग येथील कारशेडचा प्रश्न सोडवण्यासाठी शरद पवार प्रयत्न करणार असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले. “शरद पवार कांजूरमार्ग कारशेड प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. गरज पडली तर ते एक किंवा दोन दिवसांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनादेखील भेटतील. या मुद्द्यावर पवार मोदींशी चर्चा करतील,” अशी माहिती मलिक यांनी दिली. तसेच, मुंबईच्या विकासात अडथळा नको यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही प्रयत्न करत आहेत. या सर्वांत शरद पवार मद्यस्थी करत असल्याचे त्यांनी सांगितले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’