फडणवीसांनी निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून पराभूत होतील; जयंत पाटलांचा टोला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राज्यातील पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं आहे. महाविकास आघाडीच्या विजयी उमेदवारांचं अभिनंदन करतानाच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. “फडणवीस यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवली तर महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव होईल”, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी फडणवीस यांना लगावला आहे.

“महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस वगैरेच्या वल्गना केल्या जात होत्या. तीन चाकी सरकार असं हिणवलं जात होतं. पण महाविकास आघाडीची ताकद या निवडणुकीत भाजपला लक्षात आली असेल. फडणवीसांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्याचा विचार केला तर महाविकास आघाडीच्या उमेदवाराकडून त्यांचा पराभव होईल इतकी भक्कम आघाडी आमची आहे”, असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील यांनी यावेळी विजय उमेदवारांचं आणि कार्यकर्त्यांचं अभिनंदन देखील केलं. “महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र आल्यावर काय होते, हे ही निकालाने दाखवून दिले आहे. महाविकास आघाडीच्या तीनही पक्षातील व मित्र पक्षातील सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन व महाराष्ट्रातील जनतेचे विनम्र आभार”, असं जयंत पाटील म्हणाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी, कामगार व मध्यमवर्गीय यांच्यासोबतच उच्चशिक्षित मतदारदेखील महाविकास आघाडीसोबत ठामपणे उभा आहे हेच या निकालाने सिद्ध झाल्याचंही ते पुढे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

 

 

Leave a Comment