विद्वत मराठी लेखिका : दुर्गा भागवत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्वातंत्र्यदिन विशेष । दुर्गा भागवत (Durga Bhagwat) या मराठी लेखिका होत्या. इंदूर येथे १० फेब्रुवारी १९१० साली त्यांचा जन्म झाला. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यांत लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. त्यांचा फ्रेंच, जर्मन, इंग्रजी, संस्कृत, पाली या भाषा चांगल्या अवगत होत्या. १९७५ साली इंदिरा गांधींनी देशावर लादलेल्या आणीबाणीला स्पष्ट विरोध करणाऱ्या म्हणून दुर्गाबाई विशेष मान्यता पावल्या होत्या. सुस्पष्ट प्रामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते. दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. (Durga Bhagwat Information in Marathi)

त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. मुंबईतील एशियाटिक सोसायटीच्या त्या क्रियाशील कार्यकर्त्या होत्या. भारतातील सन्माननीय लेखिका म्हणून रशिया भेटीचे निमंत्रण त्यांना मिळाले होते. संशोधन व साहित्य या क्षेत्रात रमणाऱ्या दुर्गाबाईंना पाककलेतही रुची होती. पाकशास्त्रात त्या पारंगत होत्या. त्यांनी काही नवीन पाककृतीही तयार केल्या आहेत. त्या विणकाम, भरतकामही उत्तम करत. दुर्गाबाई अविवाहित होत्या, घरातील कामात त्यांना विशेष आवड होती.

गोखले अर्थशास्त्र संस्था, पुणे येथे दोन वर्षे समाजशास्त्रविभागाच्या प्रमुखपदी त्या होत्या. तसेच साहित्य-सहकार ह्या मासिकाचे वर्षभर संपादनही त्यांनी केले. हे अपवाद वगळल्यास त्यांनी संशोधन-लेखन यांसाठी नोकरी व्यवसायापासून मुक्तता घेतली. त्यांचा पहिला इंग्रजी ग्रंथ अर्ली बुद्धीस्ट ज्युरिस्पूडन्स हा होय. तसेच त्यांचा पहिला मराठी ग्रंथ राजारामशास्त्री भागवत. व्यक्तिचित्र व वाङमयविवेचन आणि पहिला मराठी ललितग्रंथ महानदीच्या तीरावर-गोंडजीवनावरील नवलिका, हा होय. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. (Durga Bhagwat Information in Marathi)

भाषाशास्त्रावरील ए डायजेस्ट ऑफ कम्पॅरेटिव्ह फिलॉलॉजी, बौद्ध व जैन धर्माच्या अभ्यासात हाती आलेल्या प्रेमकथांच्या अन्वयार्थांवर आधारित रोमान्स इन सॅक्रिड लोअर, मानववंशशास्त्राचे परिचायक ए प्राइमर ऑफ अँथ्रॉपॉलॉजी, भारतीय लोकसाहित्याच्या संशोधनावर आधारित ॲन आउटलाइन ऑफ इंडियन फोकलोअर व रिडल इन इंडियन लाइफ, लोअर अँड लिटरेचर हे त्यांचे काही इंग्रजी ग्रंथ. त्यांचे बरेचसे महत्त्वाचे लेखन लेखरूपांतही आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद होय.

शास्त्रीय भूमिकेतून भारतीय लोकसाहित्याचा जागतिक संदर्भात मूलमापनात्मक विचार करणाऱ्या लोकसाहित्याची रूपरेखा या ग्रंथात दुर्गाबाईंनी सांस्कृतिक अभिसरणाची प्रक्रिया सांगून भारतीय लोकजीवनाच्या दीर्घ परंपरेतून प्रतीत होणारे सांस्कृतिक एकात्मतेचे सूत्र विशद केले. धर्म व लोकसाहित्य या ग्रंथामध्ये या दोहोंचे परस्परसंबंध सामाजिक मानवशास्त्राच्या दृष्टिकोणातून पारखून घेतलेले आहेत. रवींद्रनाथांच्या लोकसाहित्य या ग्रंथाच्या अनुवादाला जोडलेल्या प्रस्तावनेतूनही दुर्गाबाईंची लोकसाहित्याभ्यासाची वस्तुनिष्ठ, शास्त्रीय भूमिका स्पष्ट होते. या तात्विक अभ्यासाला पूरक असे त्यांचे कार्य भारतातील विविध प्रांतातील लोककथांच्या मराठी अनुवादाचे आहे. शिवाय व्ही. फॉसबोल संपादित पाली जातकथांच्या आधारे त्यांनी जातककथा मराठीत आणल्या (सिद्धार्थ जातक). हेन्री डेव्हिड थोरोच्या ग्रंथाच्या वॉल्डनकाठी विचार विहार व चिंतनिका या अनुवादांतून तसेच ऑगस्ट डलर्थेलिखित थोरोच्या चरीत्राच्या अनुवादातून (काँकॉर्डचा क्रांतीकारक, १९६९) त्यांनी या अमेरिकन तत्त्ववेत्त्याचे जीवनकार्य व विचार मराठीत आणले. आदिमतेशी तद्रूप होऊ पहाणाऱ्या मुक्त चिंतक थोरोशी असलेले दुर्गाबाईंचे वृत्तिसाधर्म्य लक्षणीय आहे. राजारामशास्त्री भागवत यांच्याशीही दुर्गाबाईंचे कौटुंबिक नात्यापेक्षाही दृढ व जवळचे असे वैचारीक नाते आहे. आणि त्यातूनच विद्याव्रती राजारामशास्त्र्यांचे चरित्र व त्यांच्या साहित्याचे संपादनकार्य निष्पन्न झालेले आहे. एक ज्ञानधारक व समाजशास्त्रज्ञ म्हणून केतकरांविषयी दुर्गाबाईंना वाटणारी आदरयुक्त आत्मीयता व विस्तृत पटावर सामाजिक स्थितीगतीचा आलेख काढू पाहणारी, सामाजिक आवर्तनाचे भान ठेवणारी स्वतंत्र वळणाची मराठी कादंबरी निर्माण करण्यातील केतकरांच्या श्रेयाची जाण, यातून केतकरी कादंबरी हा त्यांचा समीक्षात्मक ग्रंथ निष्पन्न झाला. (Durga Bhagwat Information in Marathi)

साने गुरूजींनी प्रेरीत केल्याने दुर्गाबाईं प्रथम ललितलेखनाकडे वळल्या. महानदीच्या तीरावर ही गोंडजीवनातील प्रेमकथा त्यांची पहिली ललितनिर्मिती. पुढे दीर्घ आजारपणातील बंदिस्त एकांत वासाने त्यांना नव्याने ललितलेखनाची प्रेरणा दिली. ऋतुचक्र या मराठीतील अपूर्व पुस्तकाचे लेखन त्यातून घडले. विविध ऋतूंतील निसर्गाच्या बदलत्या लावण्यविभ्रमांचे चित्रांकन करणाऱ्या या गद्यकाव्यात्म ललितनिबंधातून निसर्ग आणि मानव यांच्यातला गूढ ऋणानुबंध प्रतीत होतो. अभिजात रसिकता, सौंदर्यसक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृत्ती, तीव्र संवेदनशीलता, तत्त्वज्ञवृत्ती, काव्यात्मता तसेच शास्त्राज्ञाचे डोळस, मर्मग्राही कुतूहल यांचे अपूर्व रसायन दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात आणि अनुषंगाने त्यांच्या ललित साहित्यात प्रत्ययास येते. भावमुद्रा (१९६०), पैस (१९७०), डूब (१९७५) या संग्रहातून कसदार ललितलेखनाचा एक स्वतंत्र बाज दिसून येतो. त्यांच्या संशोधक, जिज्ञासू वृत्तीचा एका वेगळ्या प्रक्रियेतून घडलेला स्वतंत्र आविष्कार त्यातही आढळतो. पैस मधल्या विविध लेखांना एकवटणारे सूत्र दुर्गाबाईंना प्रतीत झालेल्या धर्म कल्पनांच्या वेधाचे आहे. त्यांचे एका व्यापक, प्रगल्भ अर्थाने धर्मपरतेकडे जाणारे मन त्यातून दिसते. विद्वत्तेचा रसार्द्र, ललित आविष्कार असे पैस म्हणजे दुर्गाबाईंच्या ललितलेखनाचा एक उत्कर्षबिंदू आहे. (Durga Bhagwat Book List)

व्यासपर्व ही त्यांची आणखी एक कसदार निर्मिती. महाभारतातील प्रमुख व्यक्तिरेखांचा व त्यांच्या जीवनाचा सर्जक अन्वयार्थ लावणारे हे व्यासपर्व अलौकिकतेचा, अमानुषतेचा मानुषतेशी दुवा जोडून एका विशाल अनुभूतीचा प्रत्यय घडवते. परंपरेच्या संचितातून लाभलेल्या कथाबीजांतून साधलेली नवविर्मिती पूर्वा या त्यांच्या कथासंग्रहातून दिसते. रूपरंग मधून त्यांनी काही व्यक्तिचित्रे सादर केली आहेत, तसेच आत्मवृत्तात्मक असे स्फुटलेखन प्रासंगिकात व लहानी मध्ये आले आहे. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मोडणी आढळते, तशीच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेली गहिरेपणाची डूबही. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता अस्सल भारतीयत्व, सनातनत्वाचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललितनिबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे.

आणिबाणीच्या काळात दुर्गाबाईंनी लेखन विचारस्वातंत्र्याचा जोरदार पुरस्कार केला व त्यासाठी कारावासही पतकरला. विद्वत्ता, ज्ञानसाधना, नवनिर्मिती यांचे अनुशासन नोकरशाहीच्या हाती असू नये व खऱ्या लोकशाहीची प्रतीमा सिद्ध करण्यास विचारवंतांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे, अशी त्यांची भूमिका होती. मुक्ता व जनतेचा सवाल ही त्यांच्या त्या काळातील भाषण लेखांची संकलने आहेत. कराड येथे भरलेल्या १९७५ सालच्या एक्कावन्नाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले. त्यांच्या पैस ह्या ग्रंथास साहित्य अकादेमीचा पुरस्कार मिळाला आहे. मुंबई येथे वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांचं निधन झालं.

– प्रतिक पुरी
माहिती संदर्भ : मराठी विश्वकोश